Monday, 18 December 2017

मला कावळा शिवला

19-9-2017
सर्व पित्री अमावस्या


* मला कावळा शिवला *

 एरवी "ब्लॅक इज इन " म्हणत काळा रंग आवडता म्हणणारे, "ब्लॅक इज ए स्टेटमेंट" सांगणारे काळ्या कावळ्याला मात्र  झिडकारतात.
साधा भोळा(?) अहंकार नसलेला ,सर्व साधारण मध्यम वर्गीय घरातील सदस्याप्रमाणे आठवड्यातील दोन दिवस मांसाहार करतो , मिळेल ते खातो, कधी शिजवलेले अन्न कधी फक्त कच्चे धान्य , कच्चे मांस ग्रहण करतो. जेवणाचे अजिबात चोचले नाहीत.

 हो तो कधी भिंतीच्या काळ्या कपारीत , कोणाच्या जखमांवर चोचा मारतो.पण ती त्याची मूळ वृत्तीच म्हणा! माणसांमधील काक जमात काय कमी टोचा मारतात!

अश्या या कावळ्यासाठी आज माझे मन भरून आले आहे.
रेसिस्ट हिंदी चित्रपट सृष्टीनेही कावळ्यांना नेहमी दुय्यम वागणूक दिली.
गोऱ्या रंगाच्या कबुतरांना "कबुतर जा जा .." म्हणवत भाग्यश्री पटवर्धन सारख्या 'हिमालयीन' दगड अभिनेत्रीकडून टॉपलेस सल्लूला प्रेम पत्र पाठवुन शुभ्र कबुतराची संदेशवाहक म्हणून इमेज तयार केली.

 कावळा हा नैसर्गिक संदेशवाहक असताना फक्त रंगाच्या भेदभावामुळे त्याला डावलण्यात आले. ही माझी कडक तक्रार आहे.
काय हरकत होती "कौवे जा जा जा कौवे जा..पहिले प्यार की पहिली चिट्ठी .."

मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटात ही '' चढ गया उपर रे अटरिया पे लोटन कबुतर रे"  ऐवजी "चढ गया उपर रे अटरीया पे..कौवा रे!" असं का नाही!
रेसिस्ट समाज कुठला ! म्हणून इथे फेअर अँड लवली किलोने विकल्या जाते.

अन्यायग्रस्त कावळा मग या पंधरा दिवसात म्हणून तुम्हाला एटीट्युड दाखवतो.
हर कौवे के दिन आते है!

असो समाजाने दूर केलेल्या या कावळ्याला ज्ञानेश्वर माऊलीने मात्र त्याला प्रेमाने 'काऊ' म्हटले आहे. तुझ्या पायात सोन्याचे वाळे घालीन म्हटले.
 "..उड उड रे काऊ तुझे सोनेनी मढविन पाउ"

कावळ्यांना अतींद्रिय दृष्टी असते, ते पितरांना संदेश पोचवतात हा फक्त भारतातच समज आहे हा गैरसमज होय. गूढ सौंदर्य,लूक असलेली क्रिस्टिना स्टूवर्ट (twilight फेम) कुमार वयातील एक गूढ ,भयपट ,आत्म्यासंबंधित चित्रपट आहे .त्या सिनेम्यात तिला सतत कावळे दिसत असतात. अचानक घरात कावळे येत असतात. त्या चित्रपटाचं नाव 'मेसेंजर्स' आहे. त्या चित्रपटात कावळे आत्म्यांचे संदेश पोहचवतात, त्यांना अतींद्रिय दृष्टी असते हे दाखवले आहे.

अश्या या समाजाने डावललेल्या काक पक्ष्याचा माझा काही वर्षांपूर्वी जवळून संबंध आला होता. अगदी पहिल्या वर्गापासून कावळे चिमण्यांना तांदूळ टाकत असल्याने या डोमेस्टिक पक्ष्यांबद्दल इतर कोणत्याही पक्ष्यापेक्षा जास्त भावनिक जवळीक आहे.

एकदा अंगणातील कदाचित आंब्याच्या झाडावरील घरट्यात गर्भिणी कावळी ची बाळंतपण झाले. बाळ बाळंतीण सुखरूप होते. ओली बाळंतीण ताबडतोब अन्न शोधार्थ निघून गेली. काही दिवस झाले असावेत. नंतर काय झाले माहिती नाही. काही दिवसांनी एके दिवशी  एक पंख तुटलेलं एक कावळ्याचे पिल्लू अंगणात दिसू लागले. त्याला भरवायला त्याचे पालक यायचे. त्या पिल्लाला उडता येत नव्हते. मी रोज मूठभर तिन्ही वेळ तांदूळ त्यांना टाकायचो.

काही दिवसात ते पिल्लू थोडं मोठं झालं. माझी खोली घरात नसून लागूनच बाहेर स्वतंत्र होती. त्या पिल्लाला उडता येत नव्हते. पण तुरुतुरु चालत असे. काही दिवस  अंगणात  राहिल्याने कावळ्याची भीती चेपली असावी. त्यांनतर ते सरळ माझ्या खोलीत यायचे , पाऊस असताना , दुपारी पलंगाखाली येऊन बसायचे. संपूर्ण खोलीत तुरुतुरु फिरायचं. खोलीत फिरून झालं की स्वतःहून बाहेर जायचं. तर कधी हकलावं लागायचं. (Anurag Trivedi आठवतं का?)

सगळ्यांनी त्याला प्रथम विरोध केला. पण त्याची ती एक पंख नसलेली अवस्था बघता आणि माझी खोलीत शिरायला काहीच हरकत नसल्यामुळे मी त्याला बिनदिक्कतपणे आत येऊ द्यायचो.
काहीवेळा खुर्चीत बसून टेबलावर काही वाचत असताना, लक्ष नसताना पायाखालून ते जायचं तर त्याचा स्पर्श पायाला व्हायचा तेव्हा दचकायचो. अंगावर शहारे येऊन 'eeeee' वालं फीलिंग यायचं.
त्या दिवशी पहिल्यांदाच मला कावळा शिवला होता.

पण नंतर काही वेळा असाच त्याचा स्पर्श झाल्याने ते eee च्या भावना जरा कमी झाल्यात. आणि नियमितपणे मला  कावळा शिवायला लागला.

त्या कावळ्याला भेटायला अनेक कावळे येत. त्याला आंब्याच्या झाडावरून , गच्चीच्या , कंपाउंड भिंतीवरून बसून ते कावळे खाली अंगणातील  त्याच्याकडे लक्ष ठेवीत. सुरवातीला त्याचे पालक रोज त्याला खाऊ घालीत. पण नंतर त्यांना त्या पिल्लाचा घरातील वावर,रोजचे टाकले जाणारे  तांदूळ  बघून त्यांनाही ते माणसाळलेले बघून सुरक्षित आहे जाणवल्यावर त्यांचं रोजचं येणं कमी झालं.

इकडे त्याचा माझ्या खोलीत वावर अगदी सराईतपणे होऊ लागला. आम्ही दोघेही खोली शेअर करत होतो. संध्याकाळी फक्त ते स्वतःहून बाहेर निघून जायचं. किंवा हाकलायला लागायचं. कारण रात्री झोपेत आपल्या खोलीत एक कावळा सुद्धा आहे ही कल्पना पचवू शकत नव्हतो.सकाळी उठल्यावर पुन्हा काव काव करताना अंगणात दिसायचं .मी त्याला मूठभर तांदूळाची न्याहारी द्यायचो.

दोन महिन्यात तो पूर्ण वाढ झालेला एक कावळा झाला. त्याचं तुरुतुरु चालणं खोलीत येणं, संपूर्ण अंगणात फिरणं छान सुरू असायचं.
पण काही दिवसांनी तो म्लान वाटू लागला.तांदूळ, पोळीचा तुकडा खाईनासा झाला. शेवटी काहीही झालं तरी त्याला त्याचं नैसर्गिक कर्म करता येत नव्हतं. ज्यासाठी त्याचा जन्म झाला होता. त्याला उडता येत नव्हतं.
एक दिवस त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.
रोजचा दिसणारा , वावरणारा एक सदस्य नाहिसा झाला होता.
आजोबांनी त्या कावळ्याला दूर बाहेर नेऊन पुरून टाकले.

अश्या प्रकारे मला कावळा शिवण्याचा पिरेड सम्पला.

- अभिजित पानसे



No comments:

Post a Comment