नौहट्टा , जामिया मशीद, श्रीनगर अंतिम भाग
बाहेर काही पावलं गेल्यावर एक विचार आल्याने पुन्हा परत हॉटेल रूमवर आलो आणि सेल, कॅमेरा खोलीतच ठेवला. मशिदीच्या भागात काही आणीबाणीचा प्रसंग उदभवल्यास सेल आणि कॅमेरा ला काही होऊ नये हा उद्देश. स्वतःपेक्षा गॅजेट्सची काळजी ! मन, विचारांवर गॅजेट्सचं नियंत्रण ,बदलेली विचारसरणी ,जीवनशैलीचं ते उघड प्रमाण होतं.
लाल चौकात येऊन नौहट्टाचा ऑटो केला. रस्त्यात खेळाच्या साहित्याचं एक मोठं दुकान दिसलं.त्याच्या बाहेर शाहिद आफ्रिदीचं भलं मोठं होर्डिंग लागलं होतं.
थोड्याच वेळात ऑटोने झेलमचा पूल पार केला. छोटे छोटे घर..गल्ल्या ..'मोहल्ले' दिसू लागलेत. चित्रपटात काश्मीर दाखवताना जे लाकडी घरं दाखवतात तसे बिलकुलही प्रत्यक्षात नव्हतं. सर्वसामान्यप्रमाणे सिमेंटचे घर होते.उतरत्या टीनाच्या छपरचे घरे जास्तीत जास्त होती.प्रत्येकच छपराचा रंग गर्द हिरवा होता.खूप दाट लोकवस्ती होती. जवळपास प्रत्येकजण आबालवृद्ध काश्मिरी पेहरावावतच वावरताना दिसले. बाहेर स्त्रिया त्यामानाने फार कमी पण डोक्यावरून ठराविक पद्धतीने ओढणी घेऊन पेहरावातच दिसत होत्या.
रस्त्यावर जाडजूड बकरे , लोकरीने संपूर्णपणे आच्छादलेले मेंढे विकायला होते.
नौहट्टा चौकातून ऑटो गेला तेव्हा रस्त्यावर एके ठिकाणी फुटलेल्या काचेच्या बाटल्या दिसल्यात.ते बघून थोडं दडपण आलं. आदल्या दिवशी घडलेल्या गोंधळाची ती उरलेली निशाणी असेल का!
ऑटो वाल्याला त्या भागातील सुरक्षेबद्दल विचरल्यावर तो म्हणाला की काहीही काळजी ची गरज नाही .बिनदिक्कतपणे बघून या.
दरम्यान अजून दाट लोकवस्तीच्या भागातून जायला लागलो तसा थोडा ताण वाढू लागला .खूप मोठा बाजार होता. तिथेच ऑटो थांबला.त्याने थोडं चालत जायला सांगितलं. जवळच जामामशिद आहे म्हणला.
मला सोडून तो परत निघून गेला.आणि मी माझा' मोर्चा' त्या दाट बाजारातून,वस्तीतुन समोर वळवला.
दुकानात , बाहेर उंबऱ्यावर अनेक म्हातारे , मध्यमवयीन ते तरुण मंडळी हुक्का ओढत बसले होते. मी चालताना प्रत्येकाची दृष्टी माझ्यावर होती.
डावीकडे दोन तीन दुकानात मुंडी नसलेले बाकी पूर्ण सोललेले बकरे टांगून ठेवलेले होते.तिथला इसम मात्र उघडया शरीराने हातातील कोयत्याने गुळगुळीत मोठ्या चपट्या लाकडावर मांसावर सपासप कोयता चालवत तुकडे करण्यात गुंग होता.
मोबाईल रिचार्जेसची ,मोबाइल्सची दुकानं होती. आपल्याकडे कमी प्रस्थ असलेली 'एअरसेल' सेल्युलर कंपनीची जाहीरातिचं , रिचार्जच्या दुकानाचं प्रमाण ठळकपणे जास्त होतं.
एक दोन क्रिकेटबॅट चे दुकान होते. एका दुकानाबाहेर दाढी नसलेल्या "इंझमाम उल हक"चा जुना फोटो होता.
सोनेरी दोऱ्याने ,चमकीने उर्दू अक्षरे लिहीलेल्या हिरव्या चादरी , वेगवेगळे खडे, माळा विकणारे दुकानं होती,मोरपिसाचे झाडू टांगले होते.
छोट्या छोट्या गल्लीत अनेक घरं होती. एका बोळीत छोटी मुले क्रिकेट खेळत होती.
रस्त्यात पुन्हा एके ठिकाणी कडेला दगडं विटा,फुटलेले काच दिसलेत आणि आदल्या दिवशी घडलेला काय गोंधळ झाला असेल याची पुसटशी कल्पना आली. पुन्हा काही सेकंदासाठी हृदयाचे ठोके वाढलेत.
संपूर्ण भागात एकाही ठिकाणी हिंदी अक्षरात काहीही लिहिलेलं दिसलं नाही. सगळीकडे फक्त उर्दू पाट्या ,भिंतीवर उर्दू , दुकानाचे नावही त्याच भाषेत. क्वचितच कुठे इंग्लिश शब्द दिसलेत.
तेवढ्यात समोर मशिद दिसली. आत प्रवेश केला आणि धक्काच बसला! त्या अत्यंत गजबजलेल्या भागात इतकी सुंदर विशाल वास्तू असू शकते कोणि विचारही करू शकणार नाही! उतरत्या छपर, वरून निमुळत्या आकाराची ती वास्तु होती. युरोप मधील एखाद्या विद्यापीठाची वास्तू आणि परिसर शोभावा असं ते स्थापत्य होतं. समोर एक मोठं कारंज होतं. संपूर्ण परिसर योग्य निगा राखलेल्या गवताने हिरवागार होता. तो मोठा परिसर चालत जाऊन आत मशिदीत शिरलो.
आतमध्ये 'ऊद'चा सुंगध दरवळत होता. उग्र ऊद असो वा सौम्य राळ , मला लहानपणापासून शेणाच्या गौरीवर उद, राळ टाकल्यावर दरवळणारा हा सुगंध प्रचंड आवडतो. गावात लहानपणी मित्रांसोबत तलावाजवळील टेकडीवरील दर्ग्यावर जायचो तिथे ऊद जळत असायचा .तेव्हापासून हा ऊदाचा गंध मनात बसलाय. खाली तलावा शेजारील शिवमंदिरात राळेचा सुवास दरवळायचा. घरातही देवी नवरात्रात राळ, ऊद जळतेच. त्यामुळे हा सुगंध अगदी मनात भरलेला आहे. तिथेही तोच सुगन्ध होता.
खाली हिरवे मुलायम गालिचे अंथरले होते. आत काहीजण साठ सत्तरीतले काश्मिरी जॅकेट घातलेले म्हातारे स्कल कॅप, घालून बसले होते. दोघांच्याही बोटात टपोरा फिरोजा होता. एक क्रीम रंगाची पठाणी घातलेला तरुण मुलगा हातातील शुभ्र मुलायम पिसांच्या झाडुने धूळ झटकल्यासारखा आतल्या वस्तू, खांबांवर झाडू मारत होता.
आतील लाकडी स्थापत्य अप्रतिम होतं. कलाकुसर सुंदर होती. सोनामर्गच्या कावा विकणाऱ्या नियाजने जामा मशिदीत बत्तीस खांब आहेत सांगितलं होतं. उभ्यानेच मी ते लाकडी नक्षीदार खांब मोजण्याचा दोनदा प्रयत्न केला पण दोन्हीवेळा काही खांब मोजताना सुटायचे नाहीतर तेच ते अधिकवेळा मोजले जायचे.
आतील लोक माझ्याकडे मधूनच एकटक बघताहेत मला जाणवत होतं. तिथे वावरताना मनावर दडपण होतेच. पण समोर एक दृश्य दिसले आणि मनावरील ताण पूर्णपणे गेला. एक सोनेरी चश्मा लावलेली मध्यमवयीन विदेशी स्त्री बाहेर मनापासून संपुर्ण वास्तूचे अवलोकन करत होती.ते बघून विचार आला ही विदेशी स्त्री जर बिनदिक्कतपणे या भागात येऊ शकते तर मला 'माझ्या' देशात फिरायला कसली भीती!
संपूर्ण परिसर बघून बाहेर आलो.नौहट्टा चौकात ऑटो करून हॉटेलला घाईत परत आलो. मळखाऊ काळ्या ट्रेक पॅण्टला पुन्हा सॅकमध्ये कोंबून आर्मी रंगाची स्वच्छ कार्गो घातली आणि श्रीनगर सोडण्यासाठी बाहेर पडलो.
श्रीनगर ते जम्मू बसेस होत्या ,पण तिथल्या लोकांनी #बनिहालपर्यंत जाणाऱ्या एक ट्रॅकच्या रेल्वेबद्दल सांगितल्यावर रेल्वेने जायचं ठरवलंच.कारण जास्तीत जास्त लोकल वाहनांमधूनच जायचं होतं.त्याचं थ्रिल वेगळं असतं. बहुतेक लोकांना श्रीगनर खोऱ्यात रेल्वे आहे हे माहिती नाही.
नौगाम रेल्वे स्टेशन ला भडक रंगीत छोट्या लोकल बसमधून गेलो. तिथे एक पुरातन पडकी वास्तू होती .
एक तासाने रेल्वे आली .ही रेल्वे आपल्या रेल्वेतून वेगळी आहे.
दुपारी 4 वाजता भारतातील तेव्हाचा सर्वात लांब बोगदा पार करून बनिहाल या काश्मीर खोऱ्याच्या उंबरठ्यावरील गावात पोहचलो.
पण खरा पहाडी हिमालयातील घाटांचा भयंकर प्रवास आता सुरु होणार होता. हिमालयाची ती बाजू ओलांडून मैदानी भागात जायचं होतं. बनिहाल स्टेशनाच्या बाहेर जम्मूसाठी सुमो, इतर वाहने होती.
दुपारी 5 च्या सुमारास सुमो सुरु झाली. त्या अरुंद घाटात गाडीचालकाच्या अत्यंत रफ आणि अतिवेगाने चालवण्यामुळे कधीही अपघात होऊन खाली चिनाब, झेलममध्ये विसर्जित होऊ या दडपणात रात्री पावणे दोनला जम्मू ला येऊन पोहचलो.
सुर्यास्ताअंतर बाहेर अंधार झाल्यावर खिडकीतून दिसणं बंद झाल्यावर गाडीतील काश्मिरी गाण्याच्या पार्श्वभूमीसोबत संपूर्ण प्रवासात काश्मीर वास्तव्यचे क्षण आठवत होते आणि एक प्रश्न भेडसावत होता. जामा मशिदीसारखे सुंदर वास्तू "प्रार्थनास्थळ " भयाचे, द्वेषाचे स्थळ का होतात??
(समाप्त)
-अभिजीत पानसे
बाहेर काही पावलं गेल्यावर एक विचार आल्याने पुन्हा परत हॉटेल रूमवर आलो आणि सेल, कॅमेरा खोलीतच ठेवला. मशिदीच्या भागात काही आणीबाणीचा प्रसंग उदभवल्यास सेल आणि कॅमेरा ला काही होऊ नये हा उद्देश. स्वतःपेक्षा गॅजेट्सची काळजी ! मन, विचारांवर गॅजेट्सचं नियंत्रण ,बदलेली विचारसरणी ,जीवनशैलीचं ते उघड प्रमाण होतं.
लाल चौकात येऊन नौहट्टाचा ऑटो केला. रस्त्यात खेळाच्या साहित्याचं एक मोठं दुकान दिसलं.त्याच्या बाहेर शाहिद आफ्रिदीचं भलं मोठं होर्डिंग लागलं होतं.
थोड्याच वेळात ऑटोने झेलमचा पूल पार केला. छोटे छोटे घर..गल्ल्या ..'मोहल्ले' दिसू लागलेत. चित्रपटात काश्मीर दाखवताना जे लाकडी घरं दाखवतात तसे बिलकुलही प्रत्यक्षात नव्हतं. सर्वसामान्यप्रमाणे सिमेंटचे घर होते.उतरत्या टीनाच्या छपरचे घरे जास्तीत जास्त होती.प्रत्येकच छपराचा रंग गर्द हिरवा होता.खूप दाट लोकवस्ती होती. जवळपास प्रत्येकजण आबालवृद्ध काश्मिरी पेहरावावतच वावरताना दिसले. बाहेर स्त्रिया त्यामानाने फार कमी पण डोक्यावरून ठराविक पद्धतीने ओढणी घेऊन पेहरावातच दिसत होत्या.
रस्त्यावर जाडजूड बकरे , लोकरीने संपूर्णपणे आच्छादलेले मेंढे विकायला होते.
नौहट्टा चौकातून ऑटो गेला तेव्हा रस्त्यावर एके ठिकाणी फुटलेल्या काचेच्या बाटल्या दिसल्यात.ते बघून थोडं दडपण आलं. आदल्या दिवशी घडलेल्या गोंधळाची ती उरलेली निशाणी असेल का!
ऑटो वाल्याला त्या भागातील सुरक्षेबद्दल विचरल्यावर तो म्हणाला की काहीही काळजी ची गरज नाही .बिनदिक्कतपणे बघून या.
दरम्यान अजून दाट लोकवस्तीच्या भागातून जायला लागलो तसा थोडा ताण वाढू लागला .खूप मोठा बाजार होता. तिथेच ऑटो थांबला.त्याने थोडं चालत जायला सांगितलं. जवळच जामामशिद आहे म्हणला.
मला सोडून तो परत निघून गेला.आणि मी माझा' मोर्चा' त्या दाट बाजारातून,वस्तीतुन समोर वळवला.
दुकानात , बाहेर उंबऱ्यावर अनेक म्हातारे , मध्यमवयीन ते तरुण मंडळी हुक्का ओढत बसले होते. मी चालताना प्रत्येकाची दृष्टी माझ्यावर होती.
डावीकडे दोन तीन दुकानात मुंडी नसलेले बाकी पूर्ण सोललेले बकरे टांगून ठेवलेले होते.तिथला इसम मात्र उघडया शरीराने हातातील कोयत्याने गुळगुळीत मोठ्या चपट्या लाकडावर मांसावर सपासप कोयता चालवत तुकडे करण्यात गुंग होता.
मोबाईल रिचार्जेसची ,मोबाइल्सची दुकानं होती. आपल्याकडे कमी प्रस्थ असलेली 'एअरसेल' सेल्युलर कंपनीची जाहीरातिचं , रिचार्जच्या दुकानाचं प्रमाण ठळकपणे जास्त होतं.
एक दोन क्रिकेटबॅट चे दुकान होते. एका दुकानाबाहेर दाढी नसलेल्या "इंझमाम उल हक"चा जुना फोटो होता.
सोनेरी दोऱ्याने ,चमकीने उर्दू अक्षरे लिहीलेल्या हिरव्या चादरी , वेगवेगळे खडे, माळा विकणारे दुकानं होती,मोरपिसाचे झाडू टांगले होते.
छोट्या छोट्या गल्लीत अनेक घरं होती. एका बोळीत छोटी मुले क्रिकेट खेळत होती.
रस्त्यात पुन्हा एके ठिकाणी कडेला दगडं विटा,फुटलेले काच दिसलेत आणि आदल्या दिवशी घडलेला काय गोंधळ झाला असेल याची पुसटशी कल्पना आली. पुन्हा काही सेकंदासाठी हृदयाचे ठोके वाढलेत.
संपूर्ण भागात एकाही ठिकाणी हिंदी अक्षरात काहीही लिहिलेलं दिसलं नाही. सगळीकडे फक्त उर्दू पाट्या ,भिंतीवर उर्दू , दुकानाचे नावही त्याच भाषेत. क्वचितच कुठे इंग्लिश शब्द दिसलेत.
तेवढ्यात समोर मशिद दिसली. आत प्रवेश केला आणि धक्काच बसला! त्या अत्यंत गजबजलेल्या भागात इतकी सुंदर विशाल वास्तू असू शकते कोणि विचारही करू शकणार नाही! उतरत्या छपर, वरून निमुळत्या आकाराची ती वास्तु होती. युरोप मधील एखाद्या विद्यापीठाची वास्तू आणि परिसर शोभावा असं ते स्थापत्य होतं. समोर एक मोठं कारंज होतं. संपूर्ण परिसर योग्य निगा राखलेल्या गवताने हिरवागार होता. तो मोठा परिसर चालत जाऊन आत मशिदीत शिरलो.
आतमध्ये 'ऊद'चा सुंगध दरवळत होता. उग्र ऊद असो वा सौम्य राळ , मला लहानपणापासून शेणाच्या गौरीवर उद, राळ टाकल्यावर दरवळणारा हा सुगंध प्रचंड आवडतो. गावात लहानपणी मित्रांसोबत तलावाजवळील टेकडीवरील दर्ग्यावर जायचो तिथे ऊद जळत असायचा .तेव्हापासून हा ऊदाचा गंध मनात बसलाय. खाली तलावा शेजारील शिवमंदिरात राळेचा सुवास दरवळायचा. घरातही देवी नवरात्रात राळ, ऊद जळतेच. त्यामुळे हा सुगंध अगदी मनात भरलेला आहे. तिथेही तोच सुगन्ध होता.
खाली हिरवे मुलायम गालिचे अंथरले होते. आत काहीजण साठ सत्तरीतले काश्मिरी जॅकेट घातलेले म्हातारे स्कल कॅप, घालून बसले होते. दोघांच्याही बोटात टपोरा फिरोजा होता. एक क्रीम रंगाची पठाणी घातलेला तरुण मुलगा हातातील शुभ्र मुलायम पिसांच्या झाडुने धूळ झटकल्यासारखा आतल्या वस्तू, खांबांवर झाडू मारत होता.
आतील लाकडी स्थापत्य अप्रतिम होतं. कलाकुसर सुंदर होती. सोनामर्गच्या कावा विकणाऱ्या नियाजने जामा मशिदीत बत्तीस खांब आहेत सांगितलं होतं. उभ्यानेच मी ते लाकडी नक्षीदार खांब मोजण्याचा दोनदा प्रयत्न केला पण दोन्हीवेळा काही खांब मोजताना सुटायचे नाहीतर तेच ते अधिकवेळा मोजले जायचे.
आतील लोक माझ्याकडे मधूनच एकटक बघताहेत मला जाणवत होतं. तिथे वावरताना मनावर दडपण होतेच. पण समोर एक दृश्य दिसले आणि मनावरील ताण पूर्णपणे गेला. एक सोनेरी चश्मा लावलेली मध्यमवयीन विदेशी स्त्री बाहेर मनापासून संपुर्ण वास्तूचे अवलोकन करत होती.ते बघून विचार आला ही विदेशी स्त्री जर बिनदिक्कतपणे या भागात येऊ शकते तर मला 'माझ्या' देशात फिरायला कसली भीती!
संपूर्ण परिसर बघून बाहेर आलो.नौहट्टा चौकात ऑटो करून हॉटेलला घाईत परत आलो. मळखाऊ काळ्या ट्रेक पॅण्टला पुन्हा सॅकमध्ये कोंबून आर्मी रंगाची स्वच्छ कार्गो घातली आणि श्रीनगर सोडण्यासाठी बाहेर पडलो.
श्रीनगर ते जम्मू बसेस होत्या ,पण तिथल्या लोकांनी #बनिहालपर्यंत जाणाऱ्या एक ट्रॅकच्या रेल्वेबद्दल सांगितल्यावर रेल्वेने जायचं ठरवलंच.कारण जास्तीत जास्त लोकल वाहनांमधूनच जायचं होतं.त्याचं थ्रिल वेगळं असतं. बहुतेक लोकांना श्रीगनर खोऱ्यात रेल्वे आहे हे माहिती नाही.
नौगाम रेल्वे स्टेशन ला भडक रंगीत छोट्या लोकल बसमधून गेलो. तिथे एक पुरातन पडकी वास्तू होती .
एक तासाने रेल्वे आली .ही रेल्वे आपल्या रेल्वेतून वेगळी आहे.
दुपारी 4 वाजता भारतातील तेव्हाचा सर्वात लांब बोगदा पार करून बनिहाल या काश्मीर खोऱ्याच्या उंबरठ्यावरील गावात पोहचलो.
पण खरा पहाडी हिमालयातील घाटांचा भयंकर प्रवास आता सुरु होणार होता. हिमालयाची ती बाजू ओलांडून मैदानी भागात जायचं होतं. बनिहाल स्टेशनाच्या बाहेर जम्मूसाठी सुमो, इतर वाहने होती.
दुपारी 5 च्या सुमारास सुमो सुरु झाली. त्या अरुंद घाटात गाडीचालकाच्या अत्यंत रफ आणि अतिवेगाने चालवण्यामुळे कधीही अपघात होऊन खाली चिनाब, झेलममध्ये विसर्जित होऊ या दडपणात रात्री पावणे दोनला जम्मू ला येऊन पोहचलो.
सुर्यास्ताअंतर बाहेर अंधार झाल्यावर खिडकीतून दिसणं बंद झाल्यावर गाडीतील काश्मिरी गाण्याच्या पार्श्वभूमीसोबत संपूर्ण प्रवासात काश्मीर वास्तव्यचे क्षण आठवत होते आणि एक प्रश्न भेडसावत होता. जामा मशिदीसारखे सुंदर वास्तू "प्रार्थनास्थळ " भयाचे, द्वेषाचे स्थळ का होतात??
(समाप्त)
-अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment