Wednesday, 27 December 2017

शिवाजी महाराज , दक्षिणेतील मंदिरे आणि महाराष्ट्र



मागे एका दाक्षिणात्य मित्राने उपहासाने म्हटलं होतं ,"आमच्याकडे किती प्रचंड मोठे सुंदर मंदिरे आहेत.तुमच्या महाराष्ट्रात काहीही नाहीत.फक्त खूप भग्न अवशेषच आहेत!"
त्याला सांगितले ,जेव्हा उत्तरेपासून मध्य भारत ,कर्नाटक दक्षिणेपर्यंत मुघलांचे आणि इतर पातशहांचे साम्राज्य पसरले होते.पसरत होते.तेव्हा केवळ महाराष्ट्रात या गुलामगिरीविरुद्ध एक ताठ कण्याचा राजा उभा राहिला.स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून येथील प्रजेला आश्वासित केले.त्यामुळे स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या मातीत संघर्ष झाला.म्हणून  येथील मंदिरे ,वास्तू उध्वस्त करण्यात आलीत. अनेक युद्ध महाराष्ट्राने छातीवर झेलली कारण "शिवाजी महाराजांनी "या मातीतल्या माणसात स्वाभिमान, आणि स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले.

जेथे हाडाचे लढवय्ये #राजपूत सुद्धा मुघलांची 'जी हुझूरी 'करत होते तेथे शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर कोणत्याही पातशहाची जहागिरी स्वीकारून आरामात आजन्म चाकरी करू शकले असते.पण त्यांनी संघर्षाचा, आत्मसन्मानाचा ,स्वराज्याचा मार्ग स्वीकारला.म्हणून इथल्या मातीत मोडेन पण वाकणार नाही ही कडवी वृत्ती निर्माण झाली.

महाराष्ट्रात शिवाजी जन्मला आणि लढला म्हणून मुघल दक्षिणेकडे संपूर्ण शक्तीनिशी आणखी सरकू शकले नाही.निजामशाही ,आदिलशाही बुडाली,मुघलांची सर्व शक्ती महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे खर्ची पडत गेली.म्हणून #तामिळनाडू ,केरळ वाचलेत.
महाराष्ट्रने स्वतःच्या छातीवर वार झेलून एकप्रकारे टोकाच्या दक्षिणेकडील राज्यांचे रक्षण केले.आणि तेथील वास्तूंचे, अवाढव्य अप्रतिम मंदिरांचे रक्षण झाले.

महाराष्ट्रातही सिन्नरचे गोंदेश्वर, खिद्रपूरचे कोपेश्वर, बदलापूरचे अप्रतिम असे स्थापत्त्यपूर्ण वास्तु, मंदिरे आहेत. आणि जे हजारो उध्वस्थ मंदिरे, वास्तू अवशेष आहेत ते योध्याच्या अंगावरील युद्धातील जखमेचे व्रणाप्रमाणे आहेत.

लोक दक्षिणेकडील मंदिरांचे कौतुक करतात.पण त्यामागे अप्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांचे ,महाराष्ट्राचे कर्तृत्व आहे हे लक्षात येत नाही.

जय शिवाजी !

- अभिजित पानसे

No comments:

Post a Comment