दिवसभर प्रचंड पाऊस सुरू होता. लोक दिवसभर तरीही येत होते.कोणी व्हरांड्यात बसलेले , दाटीवाटीने बसलेले रात्र काढण्यासाठी तिथेच कोणी प्लास्टिक अंथरून पय जवळ घेऊन झोपपेले..पावसाचं पाणी तिथपर्यंत येत होतंच. मी विचार करत होतो का हे इकडे येतात? इतका त्रास सहन करत , जीव धोक्यात घालून का ,कशासाठी येतात, काय मिळतं यातून त्यांना! खरंच देवासाठी हे येतात तर देव काय फक्त हिमालयातच आहे का? शिव, शंकर महादेव हा फक्त घराबाहेरच उंच पर्वतावर, आत गुहेतच असतो का!
मग संत लोकांनी म्हटले की ईश्वर आपल्या आतच असतो! म्हणजे काय!
गणपती अथर्वशीर्षात म्हटलंय " त्वम मूलाधारस्थितोसी नित्यम!" म्हणजे गणपती शरीराच्या आत मूलाधार , म्हणजे शेवटच्या मणक्यात स्थित असतो.
मग मंदिरात का जातात लोक!?
दरवर्षी लोक मरतात अमरनाथ यात्रेत, केदरनाथला शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. वैष्णोदेवी, हिमालयात दर्शनाला जाताना गाड्याना अपघात होतो,काही वर्षांपूर्वी सताऱ्याजवळील काळूबाईला लोक चेंगराचेंगरीत मेले होते. अश्यावेळी देव यांना वाचवत नाहीत का!
तरीही लोक कुटुंबापासून दूर शेकडो किमी अंतरावर का जातात!
मी तरी का आलो इथे! फक्त निसर्ग बघायला? अनुभव घ्यायला!
आणि शेवटी तो नेहमीचा प्रश्न , देव खरंच आहे का?
या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीपरत्वे, काळ, वेळ परत्वे, दृष्टिकोनपरत्वे कदाचित असतात.
दुसऱ्या दिवशीचं पहाटे चार वाजताच्या बसचं आरक्षण मिळालं होतं.
सर्व जण आपापल्या कुटुंबियांसोबत, सहकाऱ्यांसोबत जागा राखून झोपले, बसले होते.
प्रचंड मोठे तीन मजल्यावर एकूण 10 सभागृह होते.आणि ते सर्व गच्च भरले होते. फोन चार्जिंगसाठी प्रत्येकाची कसरत सुरू होती.
जवळच्या एका हॉलमधून घोषणा झाली यात्रेकरुंनी जेवायला यावे. सतत उत्साहाने, प्रेमाने सतत एक व्यक्ती जेवण्यासंबंधी सूचना देत होती. मुसळधार पावसात शेडमध्ये सर्व जण रांगेत लागून हॉलमध्ये प्रवेश करत होते.अत्यन्त चविष्ट उत्तर भारतीय गरम जेवण, साजूक तुपातील गोड शिरा खाउन सर्वजण तृप्त होत होते.
दिवसभर सलग पाच मिनिटे ही न थांबता रात्रभरही मुसळधार पाऊस सुरू होता .लोकांमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याच्या गोष्टी सुरू होत्या पण मला कल्पना होती की उद्या बसेस निघणे अत्यन्त कठीण असणारे कारण राष्ट्रीय महामार्ग 1 अत्यन्त नाजूक आहे. दरडी कधीही कोसळतात.
पहाटे पाऊस थांबलेला होता.अंधारात आकाशाकडे बघता काहीही कळत नव्हतं.अंधारात तसेही सत्य कळत नाही. म्हणून प्रकाशाचं महत्व असतं.
पहाटे लोक तयार होऊन ,बॅग्स घेऊन खाली जमू लागले. मी गॅलरीतच बसून खाली चाललेली लोकांची धावपळ बघत होतो. आणि थोड्याच वेळात अपेक्षेप्रमाणे घोषणा झाली, काश्मीर खोऱ्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळल्यामुळे बंद झाला आहे.त्यामुळे आज बसेस, जथ्था जाणार नाही.
पाऊस बंद झालाय ही मनाला दिलासा देणारी एक गोष्ट होती त्यावरही पाणी पडलं. पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पहाटे साडे चारला शक्तिशाली हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशात पुन्हा पावसाच्या जोरदार धारा स्पष्ट दिसू लागल्यात.
आकाशातील कृष्ण ढग आणि मनावर निराशेचे काळे ढग आणखी गडद होऊ लागलेत. मला कदाचित यात्रा रद्द करावं लागणार हे वाटू लागलं. कारण दोन दिवस उशिरा तारीख मिळाल्याने परतीचं आरक्षण अगदी तंतोतंत होतं, आणि शिवाय इथे आदल्या दिवशीचा एक दिवस वाया गेला होता, आणि पुन्हा त्या दिवशीही जथथा निघणार नाही घोषणा झाली होती. पाऊस थांबला नाही तर अजून किती दिवस इथे अडकून राहतील नक्की नव्हतं. तब्येत अस्वस्थ दिल्लीपासूनच झाली होती. पोटाने असहकार , 'अस्वीकार' मोहीम चालवली होती. सगळं काही 'झिडकारून' टाकत होतं. फोनमधील ऊर्जेचं चैतन्य संपल्याने तो बेशुद्ध झाला होता. लोक फोन चार्ज करायला संडास बाथरूममधील सॉकेट सुद्धा तपासून बघत होते. गर्दी अजून वाढतच होती.
यावर्षीही अमरनाथला जाणं इथे येऊन रद्द होतय खात्री होऊ लागली. खूप एकाकी निराश वाटू लागलं. पाऊस मुसळधार सुरूच होता.
सकाळी चे सहा वाजलेत. गडद काळ्या ढगांची चादर अंधुक उजेडात दिसू लागली. निराशेने मी आत डॉरमेट्रीमध्ये माझ्या जागी गेलो. माझी मिलिटरी प्रकारातील दहा किलोची अवाढव्य बॅग माझ्या बेडिंगवरती पहुडली होती. रात्रभर झोप न झाल्याने आणि मनात कुठेतरी नकळत आपोआप प्रार्थना सुरू होती की पाऊस थांबावा.
थोड्यावेळाने उठलो.बाहेर आलो बाल्कनीतून समोर बघितलं की आनंदाचा आशेचा 'किरण' दिसला.
क्षितिजावर काळे ढग दूर होऊन निळसर पिवळं आकाश दिसत होतं.त्यातून प्रकाश येत होता. प्रकाशाचं असं असतं तो कधीच नष्ट होत नाही जिथून जागा मिळेल तिथून बाहेर येतो. चिवट असतो. सकारत्मक असतो.
सकाळी नऊ वाजेपर्यंत छान ऊन पडलं. जम्मूला आल्यापासून सतत पाऊस ,दमट वातावरण अनुभवल्यावर चार दिवसानंतर आकाश जरा स्वच्छ होऊन सूर्यप्रकाश दिसत होता. आल्हाददायक आणि उत्साह दाटला. लोक खाली येऊ लागलेत. आजचा दिवस रिकामा होता. खलील सभागृहात कीर्तन, प्रवचन सुरू होत. तेथील भंडारात सकाळचा चहा, दुपार रात्रीचं जेवण मिळत होत. पण मी माझ्या पोटाच्या असहकार मोहिमेत भरडला जात होतो. दिवसभर मी काहीच खाल्लं नाही. रात्री संध्याकाळी स्टेजवर काही कलाकारांनी शंकर पार्वती वेशात सुंदर नृत्य सादर केले. दिवसभर न्यूज चॅनलचे पत्रकार येत होते.
पण अजून दुसऱ्या दिवशी बद्दल ही साशंकता होती.
रात्रीचे साडे आठ झाले मी गळून गेलो होतो. पण रात्री एक चक्कर मारायला खाली आलो.तेव्हा लाऊड स्पीकरवर घोषणा झाली की सगळ्या यात्रेकरूंनी तयार असावे आज रात्रीच अडीच वाजता बसेस पहलगाम, ला निघणार!
लोक उत्साहात बम बम भोले चा बोलू लागलेत!
वातावरण उत्साहपूर्ण झालं मी ताबडतोब जिथे मिळेल तेथे मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट शोधू लागलो. लोक रात्री अकरा वाजतपासून अंघोळीला जाऊ लागलेत. बरेचजण जितका आराम करता येईल तितका घेण्यासाठी झोपलेत कारण हा जम्मू ते पहलगाम दहा अकरा तासांचा असणार होता.
मी एकटा असल्याने झोपण्याचा धोका पत्ककरणार नव्हतो.
रात्री पाऊण वाजताच मी तयार होऊन बाहेर पडलो. काही अंतरावर बसेस एक मोकळ्या मैदानात लागल्या होत्या. आपापल्याला पावतीवर दिलेल्या क्रमांकाच्या बसमध्येच आणि दिलेल्या सीट नंबरच बसायचं होतं.
जवळपास शंभर बसेस मैदानभर लागल्या होत्या. मी माझी बस शोधत होतो पाठीवर वजनदार सॅक उचलून मी संपूर्ण मैदान, पुन्हा पुन्हा सर्व बसेस बघितल्यात पण माझ्या क्रमांकाची बस काही दिसली नाही. दमट वातावरणात घामाने चिंब झालो होतो, शिवाय खूप थकलो ,अस्वस्थ वाटू लागलं. भीतीही दाटली की मला माझी बस दिसली नाही आणि संपूर्ण जथा निघाला तर! कारण लोक आता आपल्या बसेस मध्ये बसले होते. तेवढ्यात एक काश्मिरी माणूस हातात कागद घेऊन क्रमांक तपासून चालकसोबत बोलताना दिसला. शक्ती एकवटून त्याच्यापर्यंत जाऊन चौकशी केली.तेव्हा त्याने कागद बघून सांगितलं अजून त्या क्रमांकाची बस यायची आहे.
हुश्श मला खूप हायसं वाटलं पण इतक्या लवकर येऊन इतकी मेहनत वाया गेली होती. शिवाय प्रचंड थकवा, घामामुळे बरं वाटत नव्हतंच.
पाच मिनिटात बस आली. नशिबाने विंडो सीट मिळाली. तोवर साडे तीन वाजले होते. आर्मी च्या गाड्या, खूप सैनिक, मोठ्या हुद्द्यावरचे ऑफिसर्स दिसत होते.
प्रत्येक बस ची कसून तपासणी झाली. बसचं इंजिन सुरू झाल्याचा आवाज आला ,समोर शस्त्रसज्ज सैनिकांची एक गाडी सर्वात पुढे निघाली त्यामागे आमच्या बसेस निघाल्यात. आणि सर्वात शेवटी शस्त्रसज्ज जवानांची गाडी असा आमचा jathha निघाला. संपूर्ण परिसर बम बम भोले जयजयकराने निनादला!
सकाळी सूर्यप्रकाशात जे दिसलं ते रौद्र हिमालयाचे दर्शन होतं.
मोठ्या घराएवढे दगडं,पाषाण, दरडी रस्त्याच्या बाजूला लागले होते. प्रचंड चिखल, माती होती. स्पष्टपणे कळत होतं या दरडी परवाच्या पावसामुळे वरून कोसळल्या आहेत. आदल्या दिवशी
यात्रा रद्द करणे किती योग्य होतं हे कळलं.