Thursday, 22 February 2018

चलो अमरनाथ

"मी त्याला बघितलं! तो मला स्पष्ट दिसला!हो मी त्याला बघितलं!" स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या काश्मीर यात्रेमध्ये अमरनाथाचे दर्शन घेतल्यावर भगिनी निवेदितांना म्हटलेले हे वाक्य मी त्यांच्यावर लिहिलेल्या एका चरित्रात्मक पुस्तकात , मी दहावीत असताना वाचले त्यातील काश्मीर निसर्ग वर्णन वाचून अमरनाथ या काहीही माहिती नसलेल्या 'गोष्टीबद्दल' आकर्षण निर्माण झाले. आणि स्वामी विवेकानंद त्या काळात खडतर यात्रा करून अमरनाथचे दर्शन घेऊ शकतात तर मग आज आधुनिक काळात आपण नक्कीच अमरनाथला एकदा जायचंच हे तेव्हा ठरवलं होतं.

 शालेय वयात जे वाचतो त्याचा मनावर प्रभावी ठसा उमटतो. त्याच काळात कैलास मानस सरोवरावरील एक पुस्तक वाचून कैलास मानस यात्रा करण्याचं ठरवलं होतं. सिंदबादच्या सफरी वाचताना मी ही, त्याच्यासोबत समुद्र पादाक्रांत करायचो. तेव्हा ज्या ज्या प्रवासासमबंधीत इच्छा निर्माण झाल्या त्यातील अमरनाथ यात्रा ही त्यातल्या त्यात सोपी आणि छोटी आहे आणि आवाक्यातील आहे हे पुढे कळल्यावर अमरनाथ यात्रा करायचीच हे ठरवलं होतं.

'यात्रा' या शब्दाचा अर्थ फार संकुचित वाटतो. एक ठिसूळ धार्मिक आवरण असतं या शब्दाला सतत. त्यामुळे हा यात्रा शब्द तरुण लोक एन्जॉय करत नाही.

शिवाय कोणी तरुण कोण्या 'यात्रेला' जायचं म्हणतो तर वयाने मोठ्या लोकांकडून म्हटलं जातं की यात्रा वगैरे हे म्हातारपणी करायच्या असतात.
पण मला ही गोष्ट कधीच पटत नाही. यात्रा असो वा व्यायाम, वा अभ्यास यासाठी शरीर आरोग्य महत्वाचे असते त्यामुळे या गोष्टी योग्य मेळ साधून तरुण वयातच करता येऊ शकतात. करायला हरकत नसते.

 त्यामुळे मी यात्रा या धार्मिक आवरणाखाली असलेल्या शब्दाला 'ट्रेक' संबोधतो. ट्रेक म्हटलं की एक एनर्जी मिळते, तरुण शब्द वाटतो, शिवाय शब्द 'सेक्युलर' वाटतो.

हिमालयाचं एक आकर्षण मला लहानपणापासून होतं. 2013 पासून मी अमरनाथला जाण्याचा प्रयत्न करत होतो. 2013 वेळी सर्व तयारी झाली होती. पण जुलै 2013 ला केदारनाथ प्रलय झाला , कुटुंबीयांनी स्पष्टपणे मला जाउ देण्यासाठी नकार दिला. 2014 मध्ये सर्व कागदी औपचारिकता पूर्ण झालेली, रेल्वे आरक्षण झाले. जाण्याच्या दोन दिवस आधी कधी नव्हे ती तब्येत खूप खराब झाली. त्यामुळे रद्द करावं लागलं.
2015 मध्ये नेपाळ मध्ये भूकंप झाला. हिमालय हादरला. त्याचे पडसाद उमटतातच सर्व पर्वतरागांमध्ये !तरीही जाण्याचे ठरवले पण जाण्याच्या तीन दिवस काही कारणांमुळे पुन्हा रद्द झाले. तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होता. खूप नाराज झालो.
पुन्हा घरुन कडक विरोध नेमीप्रमाणे झालाच.
 2016 मध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे तारखेसंबंधीत सर्व कागदी औपचारिकता पार पाडली.आरक्षण झालं. सगळं ठरलं 11 जुलै हा निघण्याचा दिवस जवळ आला. आणि 8 जुलै ला "बुऱ्हाण वाणी" चा खातमा झाला. संपूर्ण काश्मीर खोरं पेटुन उठलं,

 संचारबंदी झाली. अमरनाथ यात्रा खोळंबली. मी आरक्षण रद्द केलं.
दरवर्षी मी अमरनाथ ला जातोय हे एक दोन महिन्यांपासून बऱ्याच जणांना सांगायचो. घरील मंडळी कायम विरोधी पक्षाप्रमाणे विरोधात असायची. 'एकट्याने ' जाण्याचा ठराव मंजूर करायची नाही.

सलग चार वर्षे जाण्यात अपयश आल्याने  यावर्षी 2107 मध्ये मी खूप उत्सुक नव्हतो. मीच स्वतः न जाण्याचा निर्णय घेतला. पण जसजसा मे महिना सरू लागला. पुन्हा नेहमीप्रमाणे इच्छा होऊ लागली. तरीही मी त्या उत्साहाला , इच्छेला दुर्लक्ष करीत गेलो. जून महिण्याचा एक आठवडा संपला आणि मी किमान नेहमीप्रमाणे औपचारिकता पूर्ण करून आपली बाजू सुरक्षित करून टाकावी म्हणून यावेळी प्रथम रेल्वे आरक्षण केले. मी नेहमी अमरनाथयात्र सुरू होते त्या पहिल्या दिवसासाठीच माझी नोंदणी करत होतो. यावेळी ही मला पहिल्या दिवशीच निघायचे होते. त्यामुळे यात्रेचा पहिला दिवस धरून त्याप्रमाणे चार दिवसाआधीचं आरक्षण केलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी बँकेतील औपचारिकता, परवाना काढला. यावेळी अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरू होणार होती. आणि मला यावेळी प्रथम बँकेतूनच अडथळा आला, 29 ,30 जून तारखा भरल्या होत्या. 1 जून उपलब्ध होतं.मी यांत्रिकतेने होकार दिला. माझं रजिस्ट्रेशन 1 जून चं झालं. आणि आरक्षण झाले होते 28जून नुसार!
पण मी यावर्षीही जाण्याची शक्यता आणि उत्साह कमीच होता त्यामुळे मी जास्त विचार केला नाही.

यावेळी मी कोणालाही माझ्या जाण्याबद्दल बोललो नाही.महेंद्रसिंग धोनीसारखं अति आवाज उत्साह न प्रदर्शित करता शांतपणे खेळत शेवटपर्यंत सामना न्यायचा आणि मग 'अटॅक' करायचा ठरवलं.

25 जून तारीख चार दिवसांवर येऊन ठेपली तोवर सगळं ठीक होतं.आणि मी क्रीज सोडून पहिला अटॅक केला, घरी सांगितलं मी अमरनाथ ला जातोय. घरन काही विशेष विरोध झाला नाही उलट पाठिंबा मिळाला! बॉल सीमारेषेपलीकडे जाऊन पडला! सिक्सर! पूर्वी सेहवागप्रमाणे सुरवातीलाच अति आक्रमक खेळायचो आणि माझी विकेट जायची! यावेळी धोनीच्या टेक्निकप्रमाणे खेळलो! महेंद्रसिंग धोनी जिंदाबाद!

 पण मी स्वतः कुठलीही तयारी यावेळी केलेली नव्हती. दोन दिवसंपूर्वी कपडे, गरम कपडे , रक सॅक धुतली, आणि पाऊस सुरू झाला! कपडे वाळतील की नाही याचा ताण आला! यावेळी पावसामुळे मॅच हारतो की काय परिस्थिती निर्माण झाली! यात तर डकवर्थ लुईस सिस्टम सुद्धा मदतीला येत नाही!

पण सूर्यदेव यावेळी प्रसन्न झालेत. वरूण देव आणि सूर्य देवमध्ये मांडवली होऊन, वरूणाने आपली झड थांबवून , घट्ट जाड कापसासारखी ढगांची दुलई दूर सारून सुर्याला पुन्हा निळ्या आकाशात तळपू दिले.

 आदल्या दिवशी घरी पी
पोहचलो. दुसऱ्या दिवशी 25 तारखेला दिल्लीपर्यंतच रेल्वे चे आरक्षण होते. दिल्ली ते जम्मू  आरक्षण उशीर केल्याने मिळाले नव्हत

सव्वीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता पाठीवर रक सॅक सखीला उचलून इंद्रप्रस्थाच्या जमिनीवर पाऊल ठेवले.
मला गाडीतच कळले होते की घाईत मी मोबाईलचं चार्जर, पॉवर बँक चा बॉक्स घरीच विसरलोय.पुढील 8दिवस विना मोबाईल राहायचा मी निर्णय गाडीतच घेतला होता. पण काहीतरी आठवण म्हणून फोटोज हवेतच! शिवाय घरी आई बाबा आजीला कशाला ताणात ठेवायचं म्हणून मोबाईल चार्जर शोधू लागलो. पण आश्चर्य म्हणजे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आजूबाजूला कुठेही मोबाईलचे दुकाने नव्हती.

10 किलो वजन असलेली सॅक पाठीवरू घेऊन मी आजूबाजूला चालत चालत जुन्या दिल्ली स्टेशनला जाऊन पॊहचलो तरीही एकही दुकान सापडलं नाही. मला  आश्चर्य वाटत होतं .तिथून ऑटो करून काश्मिरी गेट ला पोहचलो. कारण बस तिथूनच मिळणार होती. बसचे पाच पट वाढून सांगितलेले भाव बघता "दिल्ली के ठग" ही संकल्पना एकदा पूर्ण पटली. पावणे साडेतीनला शालिमार एक्सप्रेस जम्मूसाठी होती. 3 वाजता एक मोठं दुकान मला दिसलं तिथून चार्जर घेतलं आणि वेगाने रेल्वे स्टेशनकडे ऑटो करून निघालो. पोहचलो तेव्हा पंधरा मिनिटं बाकी होते आणि तिकीट लाईन ची लांबी बघता गाडी मिळने कठीण वाटत होते. पावसाळ्यातील दमट वातावरणातील ऊन स्वास्थ्यासाठी घातक असतं. दिल्लीच्या विषम वातावरणातील ते ऊन आधीच जालीम!
मला ताप आल्याप्रमाणे अस्वस्थ वाटू लागलं. उगीचच मी खूप अतिमेहनत केली होती.
मी अस्वस्थतेमुळे तिथेच तिकीट रांगाजवळ खाली अर्धा तास बसून राहिलो. पाच वाजता ट्रॅव्हल बस कंपनीने

बस निघेन म्हणून सांगून रात्री साडे बाराला गाडी निघाली.दुसऱ्या दिवशी एक वाजता कटराला पोहचलो.माझ्याकडे दोन पर्याय होते ,1 तारखेला पहलगाम हुन निघायचे असल्याने 2 दिवस मला कुठेतरी घालवायचे होते. जम्मूहुनच पुढे काश्मीरमध्ये जाण्यासाठी गाड्या मिळणार होत्या पण जम्मूला यात्रेकरुंची प्रचंड गर्दी असणार म्हणून मी कटराला गेलो. समोर मोठा वैष्णो देवीचा पर्वत दिसत होता.

जम्मू आणि काश्मीर राज्यात आपले सिमकार्ड्स चालत नसल्याने फोन बंद झाला होता. पण एकदा सोशल मिडियाची चव लागली की व्यक्ती त्याशिवाय जास्त काळ राहू शकत नाही. मी आधी 10 दिवस फोन शिवाय राहण्याचे ठरवले होते पण न राहवून तेथील नवं सिमकार्ड घेतलं. आणि ते योग्यच झालं.दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सूरु झाला त्यामुळे एकाजागी बसून सोशल मीडियावर , फोन वर वेळ घालवला.
30 तारखेलाही सकाळपासून खूप पाऊस सुरू होता पण मला लवकरात काश्मीर खोऱ्यात जायचं होतं.मी जम्मूला पोहचलो पण मला कोणतीही लोकल सुमो गाड्या मिळाल्या नाहीत. नंतर कळलं की यात्रेच्या काळात गाड्या सहज मिळत नाहीत. ऑटोवाल्यानीही मला जम्मू प्रवासी केंद्र, अमरनाथ यात्रेकरूंच्या बेस कॅम्पलाच जायला सांगितले. शहराच्या बाहेर असलेल्या कॅम्पच्या 2 किमी बाहेर आवारात पोहचलो आणि इथून मला खऱ्या अर्थाने अमरनाथ यात्रा म्हणजे काय आणि ती खास याचा अंदाज येऊ लागला. जागोजागी यात्रेकरुंची ,बॅगेची तपासणी सुरू झाली.कॅम्पच्या आत प्रवेश करण्यापूर्वी पाच ठिकाणी माझी, बॅगेची, आणि राजिस्ट्रेशन कार्डची कसून तपासणी झाली.

पाऊस सुरूच होता.
इथून सुरू झाला एक वेगळा अनुभव.. सर्वार्थाने काहीसा वेगळा, विचार करायला लावणारा..माणुसकीचे, दातृत्वाचे प्रदर्शन करणारा..समृद्ध करणारा..

No comments:

Post a Comment