Tuesday, 26 December 2017

विक्रमादित्य आणि पाठीवरील वेताळ

http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5422318523962953798

बेसकॅम्पच्या बराच आधी बस थांबली. माझी जड बॅग उचलायचं जीवावर येत होतं, खूपच थकवा जाणवत होता, पण पर्याय नव्हता, पाठीवर रकसॅकचा संसार उचलून "मै बंजारा".." "दिवाना मैं चला उसे ढुंढने बडे प्यार से.." भाव मनात दाटीत चालू लागलो. डाव्या हाताला वेगाने खळाळत, आवाज करत लिडर  नदी वाहत होती. पर्वतांमध्ये तिचा जन्म झाला होता , आकाशाचा फिरोजा रंग आणि अवतीभोवतीच्या निसर्गाच्या हिरवा रंग स्वतःत शोषून घेत वाहत होती. किंचित हिरवा जास्तीत जास्त फिरोजा रंग , आणि फेसाळता शुभ्र रंग असे त्रिरंगी नदी आपल्याच नादात धावत होती.
वाहताना नाद खळाळता नाद निर्माण करीत होती. तो खळखळाट , नाद खूप कर्णमधुर वाटत होता. वातावरणात चैतन्य ओतत होता.

प्रवाहाचा हिरवा ,निळा रंग हा शेवाळाचा नव्हताच!
 पाण्याचा नदीत कुठेही शेवाळ साचलं नव्हतं, शेवाळाला साचायला संधीच देत नव्हती ती, ती वेगाने जात होती, जगत होती, वर्तमानात राहून मार्गकंठीत होती. भूतकाळात वा भविष्यकाळात जगताना उदासीनतेचं शेवाळ साचत असतं, ती मात्र हातात नसलेल्या या दोन्ही काळांना फाट्यावर मारून फक्त वाहण्यावर, वर्तमानात लक्ष केंद्रित करत होती.

काही मूर्ख लोक तिच्यात प्लास्टिक बॅग्स , वस्तू टाकीत होते. भारतीयांची ही खोड सतत शिक्षा मिळाल्याशिवाय जाणार नाही.

मी समोर पोहचलो तेव्हा प्रथम आर्मीचे तपासणी केंद्र दिसलं. तिथे मेटल डीटेक्टरद्वारे बॅगेची, माझी तपासणी झाली. एका बाजूने खूप तंबू लागलेले दिसत होते.

 पुढे दोन किमी चालल्यावर बेस कॅम्पची प्रवेश स्थानापाशी पोहचलो, येथेही खूप आर्मी सैनिक होते, सतत लाऊड स्पीकरवरून सूचना सुरू होत्या. पुन्हा कसून तपासणी झाली आणि आत प्रवेश मिळाला.
समोर एक छोटासा रिकामा भाग असलेला चौक होता. तिथे एका भागात अमरनाथ गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता, किती फूट रास्ता ,काय काळजी घ्यावी यामबंधी मोठा फोटो आणि  फलक लावला होता. दोन मोठया तंबूत पलंगासहित दवाखाना, मेडिकल स्टोअर होतं.

समोर जाताच काही काश्मिरी तरुणांनी तंबूसाठी गळ घालत विचारणे सुरू झाले , किती जण आहात, आमच्या तंबूत सीएफएल लाईट आहे, कोणी म्हणत त्यांच्या तंबूत मोबाईल चार्जिंगची सोय आहे.एकटा आल्याचा तंबू मिळवताना अडचण होऊ शकते हा अंदाज होताच. पण कुठलिही अडचण न येता तंबू ठरला आणि त्या काश्मिरी मुलासोबत तंबूस्तानाकडे जाऊ लागलो.  खूप एकसारखेच दिसणारे तंबू लागले होते. उंचच उंच वृक्षांमध्ये छोट्याश्या जंगलामध्ये तंबू ठोकले होते. ते एक टुमदार तंबूंचं छोटं गावच वाटत होतं.
मी त्या काश्मिरी माणसामागे चालत होतो. अनेक तंबू मागे पडल्यावर  शेवटी त्याने त्याचा टेंट दाखवलं. त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देऊन पावती घेतली.
तंबूत जाऊन मी माझ्या पाठीवरील वजनदार वेताळाला खाली उतरवले.

आत दोघेजण होते. ते खूप निवांत बसले होते. जणू या यात्रेचा पूर्वानुभव त्यांच्याकडे होता.
त्यांच्याशी  बोलणं झाल्यावर कळलं की ते बरेच अनुभवी आहेत. त्यांनी काही मौलिक अनुभवी बोल, सूचना दिल्यावर मला मी जम्मूतच केलेल्या एका मोठ्या चुकीची जाणीव झाली. ते म्हणाले इतकी मोठी बॅग सोबत बाळगून जाणं केवळ अशक्य आहे, त्यापेक्षा इथेच बॅग लॉकरमध्ये ठेवा आणि परत येथेच येऊन बॅग घेऊन जम्मूला परत जा.

मला संपुर्णपणे जाणीव झाली मी केलेल्या मोठ्या चुकीची! मी जम्मू बेसकॅम्पमध्येच बॅग ठेवली नाही ही मोठी चूक झाली होती. तेव्हा आठवलं होतं की बहुतेक लोक मोठ्या बॅग्स , सामान जम्मूतच लॉकरमध्ये ठेवून पायी चढण्यासाठी पाठीवर छोटी बॅग घेऊन आले होते.

सगळयात मोठा हिमालयाइतका प्रश्न हा पडला की मी माझा पाठीवरचा वजनदार वेताळ इथेच ठेवला तर मला परत येथे यावं लागेल, आणि दर्शनानंतर गुफेपासून माझा परतीचा मार्ग पहलगाम नसून बालताल होता. आणि बालताल आणि पहलगामचा दूर दूर जवळपास संबंध नाही.
काय करावं! माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारलेल्या , संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली.
 पहलगाम ते अमरनाथ गुंफा हा तीन रात्री मुक्काम असलेला दूरचा मार्ग आहे.
मी त्या मार्गाने जात होतो.
अमरनाथ गुंफा ते बालताल हा फक्त सात ते आठ तासांचा प्रवास आहे , त्यामुळे जवळपास शंभर टक्के पहलगामहुन जाणारे लोक त्या मार्गाने परतीचा प्रवास करतात. यामुळे  त्यांचे दोन्ही रस्त्यांवरील प्रवास होऊन वर्तुळ पूर्ण होतं. मी ही तेच करणार होतो. परंतु मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत येथे पहलगामला यावं लागणार होतं !
बॅगरूपी वेतळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणे केवळ त्रिकाळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के !
काय करावं! वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी अडचण नाही दिलं तर मस्तकाचे शकलं होणार,  संकटात सापडलेल्या राजा विक्रमादित्याप्रमाणे माझी अवस्था झाली!

तेव्हा मी पाठीवर रकसॅक घेऊन जीवावर उदार होण्यापेक्षा जीवावर मोठा दगड ठेऊन , गुफेतील दर्शनानंतर बालताल या छोट्या रस्त्याने सगळ्यांसोबत परत जाणे रद्द करून  ज्या मार्गाने गेलो पुन्हा त्याच दूरच्या मार्गाने परत येथे पहलगाम बेसकॅम्पलाच यायचे ठरवले.

तंबुतील त्या दोघांनी सुचवल्याप्रमाणे पाठीवरील मोठा वेताळाला पहलगामला लॉकरमध्ये सुरक्षित ठेऊन छोटी बॅग विकत घेउन त्यात अगदी कामाचे गरम कपडे घेऊन चढायचं ठरवलं , आणि एक पाठीवरील छोटी हलकी 'बॅगवती' घेण्यासाठी मी बाहेर पडलो.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1780627652233761&id=1654907014805826

No comments:

Post a Comment