17जून 2017
चॅम्पिअन्स ट्रॉफी , भारत आणि पाऊस
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतला ऑस्ट्रेलिया आहे. चौथ्यांदा भारत फायनलला गेलेला बघितला आहे.नेहमीच चांगला खेळतो. शिवाय ही चॅम्प ट्रॉफी भारतासाठी फलदायी ठरलेली आहे. या स्पर्धेतून भारताला आजवर 3 मोठे खेळाडू मिळालेयत.
चॅम्पिअन्स ट्रॉफी म्हणजे क्रिकेट जगताचा लघूमेळा , मिनी वर्ल्ड कप. पूर्वी या स्पर्धेला नॉक आऊट स्पर्धा म्हटले जाई. यात हरणाऱ्या टीम ला पुढे जाण्याची संधी कमी असे.
2000 सालची नॉक आऊट चॅम्पियनशिप स्पर्धा भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली. या स्पर्धेतून दोन महान खेळाडू आपली पहिलीच मॅच खेळत होते तेही बलाढ्य ऑस्ट्रेलिया सोबत.दोघेही डावखरे!
अत्यंत आकर्षक गोलंदाजी शैली असलेला एक वेगवान गोलंदाज,ज्याने ऑसी कॅप्टन स्टीव्ह वा ला क्लीन बोल्ड केले होते.
दुसरा जिगरबाज डावखरा बॅट्समन ज्याने त्याच मॅचमध्ये, त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये ऑसी बॉलर्सना फोडून काढले होते, आणि पुढे हे दोघे तत्कालीन कॅप्टन सौरव गांगुलीच्या गळ्यातील ताईत बनले. असे ते ग्रेट लेफ्टी खेळाडू , झहीर खान आणि युवराज सिंग!!
या स्पर्धेतही भारत ऑस्त्रेलिया , दक्षिण आफ्रिका सारख्या मोठ्या टीम्स ना हरवून फायनलला पोहचला होता. पण त्याकाळात भारत फायनल ला हरण्याचं एक दृष्ट चक्र सुरू होते जे पुढे nat वेस्ट सिरीज फायनल ,लोर्डसलाच संपले.
भारत अंतिम सामना न्यूझीलंडकडुन हारला.
पुढे 2002 मध्ये नशिबाने आणि नेहमीच्या दक्षिण आफ्रिकेच्या कमनशीबाने भारताने साऊथ आफ्रिकेला अविश्वसनीयरित्या हरवले. तोंडी आलेला सोपी घास आफ्रिकेने पुन्हा टाकला. त्यातही युवराजने पकडलेला अप्रतिम कॅचमुळे भारत तो सामना जिंकला. सलग दुसऱ्यांदा फायनल ला पोहचला.
फायनल श्रीलंकेविरुद्ध होती. इथे मात्र भारताचं नशीब खराब ठरलं. पहिली बॅटिंग करताना लंकेला अत्यन्त कमी रन्समध्ये रोखलं , तेंडुलकर आणि मार्केटमध्ये नवाच आलेला पण जबरदस्त नाव कमावत असलेला वीरेंद्र सेहवागने बॅटिंग सुरू केली. पण वरुण राजने वरून काडी केली. मॅच पूर्ण झाली नाही. 25 ओव्हर्सही खेळ झाला नसल्याने डकवर्थ लुईस हे दोन बेभरवशाचे भुताटकी दूरच राहिलेत.
दुसरा दिवस फायनल साठी राखीव होता. पुन्हा एकदा फायनल खेळल्या गेली. पुन्हा श्रीलंकेची प्रथम बॅटिंग, हरभजनची चांगली बॅलिंग, आणि पुन्हा श्रीलंकेने फार कमी रन्स केलेत. पुन्हा भारत सहज मॅच जिंकणार वाटत होतं. पुन्हा एकदा सेहवाग सचिन ने जबरदस्त सुरवात केली. सेहवागने गलीवरून सिक्स हाणला आणि पुन्हा एकदा वरुण राजाला पोटात कळ आली, पान्हा फुटला, आणि तो धो धो बरसू लागला. मॅच पूर्ण होऊ शकली नाही. भारत श्रीलंका दोघांना संयुक्तरित्या विजयी घोषित करण्यात आले.
त्यानंतर पुढेही ट्रॉफी झाली पण 2013 ची चॅम्पिअन्स ट्रॉफी भारतासाठी मस्त ठरली.
या स्पर्धेतून एका वाया गेलेल्या.. जात असलेल्या आपल्याच मस्तीत असलेल्या खेळाडूचं पुनर्वसन झालं. एकेकाळी ज्याला मुंबईचा पुढचा सचिन तेंडुलकर म्हटले जात त्याचा #विनोदकांबळी होत होता तो मस्तीखोर सांड या ट्रॉफितून जरा जबाबदार बैल झाला. रॉ हिट करणारा तो रोहित!
शिवाय जणू इंग्लडमध्ये क्रिकेट खेळत लहानाचा मोठा झालेला असा (फक्त) इंग्लन्ड मध्येच आणि (फक्त) चॅम्पिअन्स ट्रॉफीतच खेळणारा Hype over the substance असलेला शिखर धवनचही पुनर्वसन याच स्पर्धेतून झालं.
भारत फायनलला पोहचला पण यावेळीही वरून वरुण भौ ने काडी केलीच. पावसामुळे मॅच कॅन्सल होणार असं पक्कं झालं पण चमत्कार घडल्यागत शेवटचे तीन तास मॅच ला मिळाले.
50 ओव्हर्स ची मॅच 20 20 मॅच झाली.
भारताची बॅटिंग खास झाली नाही. इंग्लन्ड अगदी सहज मॅच जिंकत होते पण शेवटच्या क्षणाला धोनीचे नशीब फळफळे . लाडक्या इशांत शर्माला बालिंग दिली , आणि आधीच्याच ओव्हरमध्ये मार खाल्लेल्या इशांत शर्माने सोपी शॉर्ट बॉल टाकुनही इंग्लन्डचा दक्षिण आफ्रिका झाला. भरभर विकेट्स फेकल्यात. शेवटी रैनाने भारतीय खेळपट्टी वाटावी इतकी फिरणाऱ्या पट्टीवर इंग्रजांची चांगली शाळा घेतली. भारत चॅम्पिअन्स का चॅम्पियन बनला!!
पण खरी गंमत या अंतिम स्पर्धेच्या प्रेझेन्टेशन सेरेमनी ला झाली. #अरुणलाल हा अत्यन्त गचाळ, बैलबुद्धी कॉमेंटेटर आहेच पण त्या दिवशी तो तितकाच गोंधळला अँकरसुद्धा आहे हे ही कळलं.
त्याबद्दल उद्या.
उद्याच्या फायनलमध्ये पावसाची अवकृपा न होता , डकवर्थ लुईस या बेभरवश्याच्या भुताटकी वेताळा पासून दूरच राहून भारताने अंतिम सामना जिंकावा ही सदिच्छा!
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment