Wednesday, 27 December 2017

बाळासाहेबसाहेब गेलेत

एकदा गुरुचरित्र पारायण करावं अशी खूप इच्छा होती.म्हणून 2012 च्या दिवाळीत करण्याचं ठरवलं.
त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी पाहिल्यांदा केलं  होतं.तेव्हा सात दिवस पूर्णपणे श्री दत्त गुरूंचा शाब्दिक, वाचिक, काल्पनिक, भावनिक सहवास लाभल्याने शेवटी ते निजगमनाला जातात तेव्हा मला खूप रडु आलं होतं. डोळ्यातून सतत अश्रूपात ..शब्द बोलले ..वाचले जात नव्हते.माझ्यासोबत असं नेहमी होतं. गजानन महाराजांचीही पोथी पूर्णपणे समरस होऊन वाचतानाही 19 व्या अध्यायात ते समाधी घेतात तेव्हाही गहिवरून येतंच.

 012 नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या दिवसात पारायण सुरू केल्यावर बाळासाहेब ठाकरेंना हॉस्पिटल ला ऍडमिट केल्याची बातमी आली.आणि नंतर रोजचे अपडेट्स न्यूज चॅनल वर येत होते.

बाळासाहेब ठाकरेंना काही होऊ शकतं याची कल्पनाही करवत नव्हती. ते बरे होऊन बाहेर येतील आणि पुन्हा त्यांच्या शैलीत दोन्ही हाताने "जय महाराष्ट्र" म्हणून लोकांना अभिवादन करतील ही शंभर टक्के खात्रीच होती.
पण हे हृदयाचा विश्वास होता.वीस दिवसंपूर्वी दसरामेळ्यावात व्हिडिओद्वारे त्यांनी केलेलं छोटेखानी भाषण, त्यांची शारिरीक अवस्था, आणि त्यांचे 'ते' शब्द ऐकता मन भरून आलं होतंच.ती अवस्था आठवताना बुद्धी काहीतरी कटू भविष्य सुचवत होती.

 मी रोज अध्याय वाचण्यापूर्वी आणि वाचून उठताना दररोज  बाळासाहेबांच्या तब्येतीसाठी मानापासून प्रार्थना करायचो.

17 तारखेला पारायणा चा शेवटचा दिवस होता.उशिरा बसल्याने दुपारचे साडे तीन वाजले होते. शेवटचे दोन अध्याय वाचायला बाकी होते.आणि देवघरातून मला माझ्या बाबांचे आईला सांगतांनाचे  शब्द ऐकू आलेत, " बाळासाहेब गेलेत गं!!"

 टीव्ही चा आवाज वाढलेला होता.सगळं कानावर पडत होतं. आणि अगदी शपथपुर्वक खरं सांगतोय की त्याचवेळी इकडे गुरुचरित्रात "श्री गुरु" आपला अवतार त्यागायला निजगमनाला निघाले होते.#शैलगमन.

माझ्या डोळ्याना  सतत अश्रुधारा लागल्या होत्या. समोरचे शब्द दिसत नव्हते.उच्चारणे तर अशक्यच झाले होते.आणि ते अश्रू ते दुःख फक्त बाळासाहेब ठाकरे  गेल्याबद्दल होतं.

मी कसंतरी शेवटचे दोन अद्याय वाचून ग्रंथ  पूर्ण करून उठलो.गुरुचारित्र पारायण केल्याचा कुठलाही आनंद मनात नव्हता.
ग्रंथाला नमस्कार करून त्यावर एक गुलाबाचं फुल ठेवलं.बाळासाहेबांसाठी पुढच्या प्रवासाला प्रार्थना केली.

विषण्ण अवस्थेत उठलो आणि पहिले घरची दिव्यांची सिरीज बंद केली.

बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्या दिवशी घरातील मोठी व्यक्ती गेल्याचं फिलिंग आलेलं असेल.

त्या दिवशी सतत "डॉक्टर नितु मांडके" यांची आठवण येत होती.

"बाळासाहेब ठाकरे" सारखं खणखणीत व्यक्तिमत्व, स्पष्ट विचार,आणि ते ही उघडपणे मांडणारा सर्वार्थाने लोकप्रीय हृदयसम्राट  "लोकनेता"  बघितला नाही.!!

श्री बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर नितु मांडके यांना कधी भेटू शकलो नाही व प्रत्यक्ष कधी बघितलं नाही याचं दुःख नेहमी मनात राहील.

-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment