Wednesday, 27 December 2017

कोकण- कोल्हापूर-जोतिबा- सावंतवाडी-माणगाव -डोंगर जंगल गुफा रोमांचकारी प्रवास भाग 2

ऑगस्ट 013
प्रवासवर्णन भाग 2 सावंतवाडी,माणगाव

वाडीहुन दुपारी निघायला मला अंमळ उशीर झाला होता.जयसिंगपुरला  बसस्टँडवर बसची वाट बघत असताना एक छान दृश्य दिसलं.

      (सकाळचा चंपक लूक)

पाउस येत असल्याने सगळे लोक आत उभे असताना  बसेस बाहेर दूर थांबायच्या. एक मुसलमानी पेहरावातला पन्नास साठ वर्षाचा एक मुसलमान माणुस छत्री घेउन बाहेरच उभा होता. बस आली की की ती कुठे जातेय आणि तिकडे जाणारे कोणी आहेत का हे आतल्या लोकांना शुद्ध मराठीत हसतमुख मुद्रेने सांगायचा आणि विचारायचा.
 एका वृद्ध बाईंना मिरजेला जायचं होतं.बस आली की तो त्या बाईंना मिरजेची बस नाही म्हणुन सांगायचा. "येइलच आता!" त्यांना म्हणायचा.

हा माणूस मला फार आवडला.सर्व जण असे सद्भावाने राहिलेत तर समाज किती आनंदी आणि  सकारात्मक वातावरण निर्माण होईल असं वाटून गेलं.

थोड्याच वेळात मिरजेची बस आली त्याने त्या बाईंना बसपर्यंत छत्री देत  पोहचवले. त़्यानंतर सांगलीची बस आली.तो त्यात निघुन गेला.
काही लोकं त्यांच्या छोट्याश्या कृतीने लक्षात राहतात. मनाला वेगळा आनंद देउन जातात.

कोल्हापुरची बस उशीरा आल्याने मी दुपारी साडेपाचला कोल्हापुरला पोहचलो. उशीर झाल्याने ज्योतिबा रद्द करावं लागलं.
सावंतवाडीला जाण्याची चौकशी करू लागलो. तेव्हा माहिती मिळाली की सध्या सावंतवाडीची थेट बस नाही.६ वाजता कणकवलीची बस येइल.तिथुन सावंतवाडीची बस मिळू शकेल.
नाहीतर रात्री दहाला पणजीला जाणाऱ्या बसने थेट सावंतवाडीला जाता येईल.

पण पुन्हा रात्री अवेळी अनोळखी छोट्या गावी पोहचणं मला नकोच होतं.आणि मुळात तिथुन सावंतवाडी वा माणगावची बस मिळेल की नाही याची शाश्वती नव्हतीच. म्हणुन रात्रीच्या बसने जाण्याचा निर्णय घेतला.

 समोर बसेसचं येणं जाणं..सततच्या अनॉउंसमेन्ट्स सुरू होत्या..
महा. राज्य डेपोच्या लाल पांढऱ्या, हिरव्या पांढऱ्या बसेस मध्ये ऑड बसेस आऊट असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसही येत जात होत्या.
कुठल्याही सीमालगत भागात गेल्यास अशी विविधता दिसतेच.
नाशिक बस स्थानकावर गुजरात राज्याच्या
बसेस दिसतात. सोलापूरला तर आंध्र, तेलंगाणा, कर्नाटक राज्याच्या बसेस साठी वेगळी स्थानकही प्रसंगी असतात.

पुढच्या मिनिटाला मला अनाउंसमेंट ऐकु आली ती ज्योतीबाला जाणाऱ्या बसची!!
आणि मी स्वत:ला रोखु शकलो नाही.

जाऊन येऊन जास्तीत जास्त दोन तासाचा प्रवास होता. माझ्याकडे साडेतीन तास होतेच.रिस्क घ्यायला हरकत नव्हती.

घेतलं ज्योतिबाचं नाव आणि घुसलो बसमध्ये! ज्योतिबाच्या नावानं चांग भलं

 बसने शहराबाहेर पडल्यावर एक टर्न घेतला तेव्हा पन्हाळा 16 किमी फलक दृष्टीस पडला.मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभु देशपांडेंवर रचलेल्या पोवाड्यातील शब्द आठवलेत.

"श्री बाजी विव्हळ पडला! मागुति तत्क्षणी उठला! बेहोष वीर परि वदला!
तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्युला!!

अगदी लहानपणी DD10 वर "ज्योतीबाचा नवस" हा कोल्हापूर चित्रपटसृष्टीतला तत्कालीन स्टार 'सूर्यकांत' यांचा चित्रपट पाहिला होता. तेव्हा ज्योतिबाची पहिल्यांदा चलचित्र तोंडओळख झाली होती . त्या दिवशी दर्शनाचा योग आला होता.

भरभर पायऱ्या उतरून ज्योतिबाचं फक्त पाच सहा सेकंद दर्शन घेतलं आणि परत निघालो. अंधार झाला असल्याने डोंगराचं सौंदर्य बघता आलं नाही.

रात्री पणजीला जाणारी बस आली. कंडक्टरने सावंतवाडीला पहाटे तीन सव्वा तीनला पोहचणार सांगितलं.
शेवटी पुन्हा तेच झालं! मी कधीही न पाहिलेल्या गावात अवेळी पोहचणार होतो.

पण माझ्या शिवाय इतरही कोणी सावंतवाडीला उतरणारे असतीलच या विचाराने जरा बरं वाटलं!रात्री कणकवली आलं बरेच लोकं उतरलेत. आता थोड्या वेळाने सावंतवाडी येणार म्हणुन मी जागरूक होउन बसलो.

तीन वाजता सावंतवाडी आल्याचं कंडक्टरचा रात्रीचा जड आवाज ऐकु आला. मी सॅक पाठीघेउन उतरू लागलो.मागे वळुन पाहिलं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं!
सावंतवाडीला उतरणारा मी एकटाच होतो. इतर सर्व डोकी मागे टेकून कोणी एकमेकांच्या खांद्यावर पडुन लवंडुन झोपली होती.

लोकांचे बरे गोव्याला जाण्याचे प्लँन्स यशस्वी होतात!!

खाली उतरल्याबरोबर बस पुढे ताबडतोब गोमंतकाकडे निघुन गेली.
आजुबाजुला सर्वत्र सामसूम! कोल्हापुर मोठं शहर असल्याने रात्री स्टँडवर काही लोकं होते पण इथे या गावी चिटपाखरूही नसणार हे पक्कच होतं.

आत स्टँडमध्ये गेलो. एक ट्यूब लाईट अस्पष्टसा आवाज करत प्रकाश फेकत होता. माझा अंदाज चुकला होता. मी आत एकटा नव्हतो. इथेही  सिमेंटच्या बर्थवर काही जणं झोपले होते. पण ती तीन चार काळी पांढरी भटकी कुत्री होती.

चिटपाखरूही नसणार हा अंदाज सपशेल चुकला होता साक्षात  तीन चार सस्तन प्राणी श्वान कंपनि सोबतीला होती. मी जरासा दुर जाउन बसलो.माझी चाहुल लागताच; आपल्या रात्रीच्या अड्ड्यावर कोण आलंय हे एक दोघांनी डोळे उघडुन मान वर करून माझ्याकडे बघुन घेतलं. पण मी त्यांना निरूपद्रवी.प्राणी वाटल्याने शेपुट थोडंसं हलवत पुन्हा मान खाली करून ते झोपी गेले.

कुत्रा हा माझा आवडता प्राणी. जगातील प्रत्येक अन् प्रत्येक नात्यात प्रेम हे टर्म्स अँड कंडिशन्स आर अपलाईड या क्लॉजने येतं. फक्त कुत्रा हाच याला अपवाद आहे. निस्वार्थपणे तो त्याच्या वा मालकाच्या शेवटापर्यंत प्रेम करतो.

कुत्रा ही शिवी कशी काय होउ शकते. ते तर बिरूद व्हायला हवं. माणूस कुत्र्यासारखा वागला तर फार उच्च स्तरावर जाईल.

मी तिथेच मान मागे रेलुन पेपर वाचत बसुन होतो. आमच्यामध्ये camaraderie निर्माण झाली होती.
एकमेकास कंपनि देउ अवघे झोपु समस्त!

 दोनेक तासांनी वर्तमानपत्रांचे गठ्ठे कलेक्ट करणारे विक्रेते येउ लागले. त्यांनी माणगावला जाणारी पहिली बस साडेसातला जवळच असलेल्या दुसऱ्या छोट्या बसस्टँडवरून मिळेल हे सांगितलं. उजाडु लागताच मी चक्कर टाकुन आलो.एक मोठा सुंदर तलाव दिसला .एकंदर सावंतवाडी हे खुपच लोभस स्वच्छ रस्त्यांचं शांत निसर्गसौंदर्याने नटलेलं अस्सल कोंकणी शहर वाटलं.

माणगावच्या बसमध्ये बसलो. बस छोट्या रस्त्यांवरून धावु लागली. अधुनमधुन लहान सहान खेडेगावांमधुन शाळेची छोटी मुलं उत्साहात आवाज करत आत चढत होती.खिडकीतुन आजुबाजुचं हिरवा निसर्ग बघता बघता; दोन दिवसांपासुन झोप न झाल्यामुळे थंड हवा चेहऱ्यावर आदळू लागताच माझं होय होय होय नाही नाही नाही सुरू झालं.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment