Friday, 27 July 2018

कर माझे जुळती

चार एक वर्षांपूर्वी मी आणि एक मित्र पहिल्यांदाच जम्मूला फिरायला गेलो होतो. तावी नदीच्या पलीकडे अखनूर किल्ला, अमर महल बघायला जात असताना एका चौकात एक सैनिक वेशातील पुतळा दिसला. खाली नाव बघितलं “कॅप्टन विक्रम बत्रा” लिहिलं होतं. चौकाचं नाव होतं कॅप्टन विक्रम बात्रा चौक. तेव्हा मित्रानेच सांगितलं की हे कारगिल युद्धात शहीद झाले होते. कारगिल युद्ध आणि त्यातील एकेक गोष्टी सांगितल्या. आणि विक्रम बत्रा यांनी म्हटलेलं वाक्य “ये दिल मांगे मोर” हे तेव्हा कळलं.

1999च्या उन्हाळ्याच्या शेवटी एकीकडे वर्ल्डकप सुरू असताना देशभरात वर्ल्डकप, क्रिकेटचा ‘माहोल’ होता. दुसरीकडे कारगिल घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. पण कोणाला सुरुवातीला देणंघेणं नव्हतं.
जो तो फक्त वर्ल्डकपमध्ये बुडाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धापेक्षा भारताने पाकिस्तानला क्रिकेट मॅच मध्ये कसं हरवलं यातच मग्न होते.

जूनच्या शेवटी वर्ल्डकप संपला तेव्हा लोकांनी कारगिल युद्ध, पाकिस्तान या गोष्टींना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.
तोवर “कारगिल घुसखोरी” पासून  “कारगिल युद्ध” असा बातम्यांतही बदल झालेला होता. मग सगळ्यांना त्यातील गांभीर्य कळले.

शाळेत असताना तेव्हा काहीही संबंधही नव्हता या गोष्टींशी, यातील गांभीर्य कळलं नव्हतं. कसलं कारगिल, कुठे आहे ते नक्की. मुळात ‘घुसखोरी’ म्हणजे काय नक्की, हेच मला कळत नव्हतं, हे आठवतं.

नंतर देशभरात आवाहन सुरू झाले सैनिकांना मदतीसाठी आर्थिक  मदत करण्यासाठी.

जुलैमध्ये शाळा सुरू झाल्यावर  मित्र सुट्टी संपल्यावर परत शाळेत भेटल्यावर काही दिवसांपूर्वी भारत कोणाच्या चुकीने झिम्बाब्वेविरुद्ध हरला, वर्ल्डकपमधून बाहेर कसा गेला,  पाकिस्तानला काय हरवलं याच गप्पा होत होत्या.

शाळाशाळांमधून सैनिक मदतीसाठी मुलांना पाच रुपये, दहा रुपये ओळखीच्या लोकांकडून जमवायला सांगितलं होतं. आम्हीही मित्र हातात कागद पेन आणि  डबा घेऊन फिरलो होतो. आवडीने नाही तर शिक्षकांनी सांगितल्यामुळे. कोणी एक रुपया, दोन रूपये. पाच रूपये कोणी दिलेत तर फार आनंद व्हायचा. आम्हाला तेव्हा इतकंच कळत होतं की पाकिस्तानसोबत कारगिलला युद्ध, जे दूर कुठेतरी हिमालयात सुरू आहे, त्यासाठी सैनिकांना मदत म्हणून पैसे जमवायला सांगितले आहे.

कित्येक वर्षांनी जेव्हा कारगील युद्ध म्हणजे नक्की काय..कळलं तेव्हा त्यातील भयाण गांभीर्य आणि भारतीय सैनिकांनी केलेला प्राणत्याग आणि गाजवलेला पराक्रम याची जाणीव झाली. देशाला जोडणारा एकमेव राष्ट्रीय हायवेवर नियंत्रण राहिलं. पुन्हा काश्मीरचा काही भाग 1947 प्रमाणे पाकिस्तानकडे गेला नाही. देश अबाधित राहिला.
आज लेह लडाखला काश्मीरमधून जाता येतंय.
#पेंगॉंग लेकजवळ फोटो काढता येतंय. थ्री एडियट्सचा क्लायमॅक्स शूट करता येतोय.

तेव्हा मित्रासोबत कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पुतळा, त्यांच्या नावाचा चौक, जम्मू शहरात त्यांच्या नावाने हॉस्पिटल बघून फार आनंद झाला.
तेव्हाही म्हटलं होतं की देशभरात त्याच त्या ठराविक नावांचे रोड, चौक नकोत. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचेही नाव सार्वजनिक स्थळांना, रस्त्यांना द्यायला हवेत.

पुण्यात #मेजरताथवडे उद्यान आहे. मला या उद्यानाचं नाव विशेष आवडतं. कारण त्याला शहीद सैनिकांचं नाव दिलेलं आहे.
मेजर प्रदीप ताथवडे हे 2000 मध्येआतंकवादयांविरुद्ध चकमकीत शहीद झाले होते.

बहुतेकवेळी राजकारण्यांचेच नाव देण्याऐवजी जास्तीत जास्त शहिद सैनिकांचे वा युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय योद्ध्यांचेही नावं द्यायला हवीत. असं वाटतं. कॅप्टन विक्रम बत्रांच्याच शब्दांत सांगायचे तर “ये दिल मांगे मोर!"

#कारगिलविजयदिवस

- Abhijeet Panse

No comments:

Post a Comment