Friday, 5 January 2018

एका कोळीयाने



एका ‘कोळी’याने
दर दोन मिनिटानंतर "कसं असतं ना...!" अशा वाक्याने सुरवात करणे, अगदी ठराविक टीव्ही सिरिअलबाज साचेबद्ध भाषा बोलणे, प्रेक्षकांच्या अंगावर "क्लोज अप्स"चे धाड धाड आवाज करणारे बॉम्ब गोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणे, सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे,किंवा अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिका या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी 6 ते 10 मानसिक शोषण  होतं. पण सांगणार कुणाला, करणार काय! अश्यावेळी चार तास आपापले चलदूरध्वनी काढून सोशीअल साईट्स वर रमणे हा एक पर्याय सोशिक तरुण मंडळीकडे असतो.

टीव्ही मालिकांच्या रुक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात 'लगान' मधील गावकऱ्याप्रमाणे आम्ही तरुण मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो..

"जब जब धरतीपे पाप का आतंक बढा तब उसे खतम करने जाते है त्रिदेव!" (नव्वदच्या दशकात नसिरुद्दीन शहाच्या व्हॉइस-ओव्हर मध्ये समस्त मानव जातीला दिलेला विश्वास शेवटी खरा ठरला. 

टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा तरुण गावकऱ्यासाठी "घनन घनन घन...करून वरुणदेव धावून आला.

हो ते आलेत..त्यांनी पाहिलं..(आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत..जिंकताहेत. त्या लाईफ सेवर गोष्टीच नाव म्हणजे "वेब सिरीज"!!!!

टीव्ही वा चित्रपटात संवादाचा भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सर बोर्डाची  टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकानाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही.

म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, "आणि कसं असतं ना.." असे सतत वाक्य अंगावर टाकावी लागतात. जे तरुण प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात. पण वेब सिरीज या "यू ट्यूब" वर किंवा त्यांच्या 'अॅप'वर असल्या कारणाने तिथे सेन्सर ची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्यांचा फकफकाट या पासून 'पहलाज' ..परहेज करावा लागत नाही. हे सारं पदार्थ वेबसिरीजमध्ये मोकळेपणानं वाढलेलं असतं प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात.
आणि आजच्या तरुण पिढीचं हे वाक्यच आहे "गूगल हमारी माता है और यू ट्यूब हमारा पिता!"

शिवाय पाच मिनिटाच्या एपिसोड नंतर दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनःस्ताप वेब सिरीज मध्ये नसतो.

इथे सासूचे चार दिवस चार हजार ना होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते.आणि अति परिचयात अवज्ञा टळते. वेब सिरिझचे जास्तीत जास्त 5 ते 7 एपिसोड्स असतात.

पण या सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळे, नाजूक, जड विषयांना हात घालून सिरीज तयार केली जाते. जे प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालतात, स्पर्श करतात.

यामुळे वेब सिरीज चं प्रस्थ, क्रेज वाढतेय.

पर्मनंट रूममेट्स, लिटल थिंग्स, ट्रिपलिंग, लव बाईट्स, आयेशा हे काही हिट आणि लोकप्रिय सिरीज आहेत.

"पर्मनंट रूममेट्स" ही सर्वार्थाने लोकप्रिय, हृदयाला स्पर्श करणारी, मनापासून हसवणारी, विचार करायला लावणारी सिरीज आहे.

बिस्वपती सरकार याने पर्मनंट रूममेट्स चा पहिला सिझन लिहिला. बंगाल हे साहित्य, कला, विचारवंत यासाठी शतकांपासून प्रसिद्ध आहेच. शुजित सरकार दिवाकर बॅनर्जी, सुजॉय घोष इत्यादी उच्च स्तरीय बंगाली दिगदर्शक प्रसिद्ध आहेतच.

आता हा पर्मनंट रुमेंट्स लिहिणारा आणखी एक हुशार, आजच्या काळातील बंगाली लेखक.

प्रफुल व्यास  हिंदी रंगभूमीशी जोडलेला अभिनेत्याला आजवर काही चित्रपटात छोट्या भूमिका करताना पाहिलं आहे. त्यात त्याचं खरं अभिनय कौशल्य कधी दिसलंच नाही. पण प.रु.मधून मात्र त्याला मनसोक्त, मोकळेप्रमाणे स्वतःच कौशल्य दाखवता आलं. त्याच्याकडे असलेली जबरदस्त अभिनयाची जाण, शरीराची भाषा, विनोदाचं टायमिंग हे सारं या सिरीज मधून दाखवता आलं. कोणीही प्रेमात पडेल असा अभिनय.. भूमिका त्याने साकारली आहे.

निधी सिंग ही आजवर यु ट्यूब वर छोटे छोटे व्हिडीओजमध्ये काम करायची. तिची स्वतःची अशी खास ओळख नव्हतीच.

पण तिने पर्मनंट रुमेंट्स मध्ये साकारलेली भूमिका तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते.

प्रचंड अभिनय क्षमता, आवाजावर पूर्ण नियंत्रण, संवाद, शब्दफेक अगदी आजच्या काळातील भूमिकेसाठी योग्य ..या सिरीजमुळे निधी सिंग राष्ट्रीय स्तरावर स्टार झाली आहे.

तिने नुकतेच दोन चित्रपट स्वीकारले असून एकाचं शूटिंगसुद्धा आटोपलं आहे.

पर्मनंट रुमेंट्स ही गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची जे तीन वर्षांपासून "लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्यापूर्वी 15 दिवसच सोबत घालवले आहेत. मिकेश चौधरी आणि तानिया नागपाल असे हे दोघे.

मिकेश हा बराचसा बावळट, मनाने अत्यंत  चांगला, त्याच्या नोकरीच्या कामात हुशार असलेला, सतत ऑन लाईन शॉपिंग करत असलेला आणि त्यात फसणारा, अमेरिकेत तीन वर्षे नोकरीसाठी राहिलेला तरुण मुलगा असतो जो भारतात, मुंबईत तानियाला सरप्राईज म्हणून एक महिना लवकर येऊन, सरळ विमानतळावरून तानियाच्या फ्लॅटवर जातो आणि तिला सरळ लग्नासाठी प्रपोज करतो.

तानिया म्हणजे निधी सिंग ही व्यावहारिक, काहीशी तापट, नात्यात गोंधळ उडालेली आणि संपूर्ण दोष मिकेश ला देणारी, लग्नाचा निर्णय घेताना प्रचंड गोंधळात पडलेली आणि त्याचं नैराश्य राग मिकेशवरच काढणारी तरीही नात्याचं महत्व जाणणारी ही मुलगी. निधी सिंगने अप्रतिम रंगवली आहे.

यांच्यासोबत इतर पात्रे रंगावणारे कलाकारही तितकेच जबरदस्त ताकदीचे आहेत. प्रत्येक एपिसोड हा पूर्णतः वेगळा विषयावर, संवाद अगदी सहज, आजच्या काळातील आणि आवडणारे.
कुठलीही ठराविक "स्लॅपस्टिक कॉमेडी" न करता नैसर्गिकपणे परिस्थितीजन्य आणि शाब्दिक विनोद.. सर्व भावभावनांचा अंतर्भाव असलेली ही वेब सिरीज. पहिला सिजन खूप लोकप्रिय झाल्यावर दुसरा सीझन आला यात चित्रपटात अनेक चांगल्या भूमिका करणारा दर्शन जरीवाला, असरानी सुद्धा आहे.

असरानीने त्याच्या तारुण्यानंतर एक आजवरची  चांगली भूमिका केली आहे.

एक विघ्नसंतोषी ,खवट म्हातारा असरानीने अप्रतिम रंगवला आहे.

आणि या संपूर्ण सिरीजमध्ये विनोदी आणि अप्रतिम भूमिका काम केलंय ते पूर्णतः नवोदित कलाकार दीपक कुमार मिश्रा याने.

थ्री एडिट्स मध्ये आमिर खान, आर माधवन बड्या अभिनेत्यांसमोर पाहिल्यादाच काम करणारा ओमी वैद्य जसा मनाला भावून गेला.. आणि भाव खाऊन गेला अगदी तसाच हा दीपक मिश्रा सपोर्टींग रोलमध्ये असलेला भाव खाऊन जातो.आवडतो.

वेब सिरीज बघताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते की प्रचंड टॅलेंट असलेले कलाकार आपल्याकडे आहेत. आणि जे आता स्वतःचा मार्ग स्वतः तयार करून त्यावर मार्गक्रमण करीत यशस्वी होताहेत.

आणि इथेच इंटरनेट सिरीज वेगळं प्लॅटफॉर्म ठरतं.

आणि ते प्रेक्षकांनाही भावतं.

म्हणून येत्या काळात वेबसिरीजची क्रेज वाढणार हे नक्की.

No comments:

Post a Comment