Sunday, 14 January 2018

चंदनवाडीकडे


 मी उठून आजूबाजूला बघू लागलो माझी बॅग दिसली नाही. समोर बघितलं ..डावीकडे  उजवीकडे शेजारी बघितलं.. पण बॅग नव्हती!

मागे वळून बघितलं आणि!

 हुश्श !बॅगवती डोक्याच्या मागे शांतपणे बसली होती. बॅग मी उशाशी ठेवली होती . आणि मी शेजारी आणि समोर बघत होतो.
“उशाशी बॅगळसा आणि तंबूला वळसा !”


माझ्या जीवात जीव आला . काही सेकन्ड्ससाठी छातीत श्वास अडकला होता. आय रिअली हॅड हार्ट इन माय माउथ!

मनगटावरील घड्याळ आपल्या दोन काट्यानी  सात वाजून पंधरा मिनिटे झाली दाखवत होते.
उशीर झाला होता. मी साडेसातला निघण्याचं ठरवलं होतं. तंबूतील इतर तिघेजण तेव्हाही झोपलेच होते. पण त्यांच्याकडे यात्रेचा बराच अनुभव होता. ते निश्चिंत लोक होते.

मला उठल्यापासूनच बरं वाटत नव्हतं. डोकं, शरीर जड झालेलं..खूप अस्वस्थ वाटत होतं. सगळयात त्रासदायक म्हणजे घसा खूप दुखत होता. आणि अजून तर यात्रा सुरूही झाली नव्हती.

थंडी खूप होती. मी बाहेर जाऊन प्रथम फ्रेश झालो. पाण्याची व्यवस्था छान होती. खूपसारे पोर्टेबल टॉयलेट्स होते. मला तेव्हा दिसलं की माझ्या तंबूच्या मागेच शौचालयाची ओळीने चाळ आहे. किती ती काळजी माझ्या पोटाची तंबुवाल्याला, देवाला बरे! सगळे लोक चंदनवाडीला जाणाऱ्या मार्गाने निघाले होते. मला उशीर झाला होता. याची किंमत नंतर चुकवावी लागेल याची कल्पना नव्हती तेव्हा मला!

मी मुखमार्जन आटोपलं, 'दशमद्वारमार्जन' मात्र केलं नाही. सिस्टम एकंदरीतच बिघडलं होतं.
पण मला सगळ्यात जास्त काळजी होती ती घश्याची. त्यामुळे मी काहीच खाऊ गिळू शकत नव्हतो.
तंबूत येऊन मी प्रथम घरून आणलेला 'आलेपाक' तीन चमचे खाल्ला. त्याने अंगात आतून गरमीही आली. बॅग उचलून निघालो. आतले तिघे जण तेव्हाही झोपलेच होते.

आदल्या दिवशीच जिथे लॉकररूममध्ये मोठी सॅक ठेवली होती तिथूनच जायचं होतं.
 लाऊडस्पीकरवरून सतत सूचना सुरू होत्या.
रस्त्यात फुलांनी डवरलेली गुलाबाची खूप झाडे होती. जवळील मेडिकल सर्टिफिकेट आणि अमरनाथ श्राइन बोर्डाकडून मिळालेला परवाना, जो मिळवायला मला काय काय 'जुगाड' करावा लागला तो असा सार्वजनिक मी नाही करू शकत, तो परवाना चेकिंग पोस्ट वर दाखवावा लागला. आणि तिथून बाहेर पडलो. मागे पहलगामचं तंबूस्तान राहीलं. "बचेंगे तो फिर मिलेंगे" मनात म्हणून मी समोर चालू लागलो.

थोड्याचवेळात लिडर नदी काठी डांबरी रोडवर आलो. तिथून प्रत्येकी शंभर रुपये घेऊन चंदनवाडीपर्यंत काश्मिरी लोकांच्या गाड्या सोडत होत्या. खरी चालण्याची  यात्रा चंदनवाडीपासूनच सूरु होते.

  सर्वजण आपापल्या समूहात आले असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य मिळत होतं. मी एकटा असल्याने मला 'सिंगल' सीटसाठी खूप अडचण येऊ लागली. अर्धा तास गेला पण एकाही गाडीत एक सीट रिकामी मिळत नव्हती. वेळ भराभर जात होता. साडेनऊ वाजायला आलेत.


तेवड्यात एक गंमत झाली. काही संन्यासी साधू लोकांनी, त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणून कोणी त्यांना गाडीत घेत नव्हते , म्हणून ते रस्त्यावर आडवे झोपलेत , रस्ता अडवून धरला. शेवटी पोलीसांनी मध्ये पडून  त्यांना उठवलं आणि एक गाडीवाल्याने बसवून त्यांना घेऊन गेला.
मीसुद्धा  रस्त्यावर आडवा झोपू का मला कोणी गाडीत घेत नाही म्हणून विचार केला! " निषेध निषेध ! ओरडू का! " अरे कोणी जागा देता का रे जागा !या तुफानाला! हे तुफान आता थकलंय! पोट बिघडलेल्या अवस्थेने गळंलंय!
आवो कुछ तुफानी करते है! असं वाटून गेलं. पण पोलीस पार्श्वभागावर लाठीप्रहार करतील ही जाणीव झाल्याने मी विचार सोडून दिला.

तेवढ्यात एका चालकाने मला आवाज दिला, त्याच्या गाडीत एक जागा रिकामी होती.
 आमचा रथ चंदनवाडीकडे , लीडरनदीच्या साक्षीने दौडू लागला. शब्द अपुरे पडतात असं अप्रतिम , सुंदर सृष्टीसौंदर्य दिसू लागलं. चंदनवाडीला जाताना उंचावर वळवळणाचा रस्त्याने जात होतो. खाली खळाळत लिडर, वर निळंशार आकाश, उंचच हिमालय पर्वताची शिखरे, त्यावर घनदाट देवदारचं जंगल.
मध्ये पुन्हा एकदा तपासणी झाली. चंदनवाडीला पाऊणतासात पोहचलो. प्रचंड गर्दी. मी रांगेत उभा राहिलो. ती शेवटची आणि महत्वाची तपासणी रांग होती. चंदनवाडीलाही तंबू आणि लंगर दिसलेत.
तेवढ्यात एक लाठी विकणारा छोटा मुलगा दिसला. दोन हातात दोन जाड्या देवदारच्या लाठ्या विकत घेतल्या.
 तपासणी होऊन बाहेर आलो. आता शड्डू मांड ठोकण्याची वेळ आली होती. अभि तो पार्टी सुरू हुई थी!


अमरनाथयात्रा का खास आणि वेगळी आहे याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. अनेक लोक हातात फ्रुटी, चॉकलेट्स , टॉफिज, बिस्किटचं पाकिटं आणून देत होते. कोणी अॅपल ज्यूसची बाटली आणून दिली.  लंगरमध्ये गरम जेवण, न्याहारी सगळं मिळत होतं.  एक ठिकाणी मला "बनारसी पान" चंही लंगर दिसला.
चहा , कॉफी, सरबते  सगळ्यांची सरबराई होती. आपण फक्त तिथे जाऊन हवं ते घ्यायचं . हे सर्व देताना कुठलाही वागण्यात कोरडेपणा, किंवा तुसडेपणा दिसत नव्हता, तथापि अत्यन्त अर्जवतेने ते बोलावत होते, खाण्यास आवाहन करत होते.
कलियुगातील कर्ण अमरनाथ यात्रेत दिसत होते.
मी त्या सगळयांना मनोमन नमस्कार केला आणि पूढे चालू लागलो.
सगळ्यात मोठं उभं उंचंच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे "पिस्सु टॉप". अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात, एक पिस्सु टॉप, दुसरा शेषनाग.
पिस्सु टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सु टॉपने दिला.

No comments:

Post a Comment