Saturday, 6 January 2018

नमस्ते बिच



7 जानेवारी 2018, सकाळ -सप्तरंग

नमस्ते योगा!

दर दोन मिनिटानंतर "कसं असतं ना...!" अशा वाक्याने सुरवात करणे, अगदी ठराविक टीव्ही सिरिअलबाज, साचेबद्ध भाषा बोलणे, प्रेक्षकांच्या अंगावर "क्लोज अप्स"चे धाड धाड आवाज करणारे बॉम्ब गोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणे, सासूचे चार दिवसच सांगून ते हजारांच्याही पलीकडे नेणे, किंवा अगदी चावुन चावुन चोथा झालेल्या विषयांवरील टीव्ही मालिकांची शिक्षा देणे या सर्व कारणांमुळे घरातील तरुण मंडळीसकट आता बुद्धिवादी, चाणाक्ष लोकांचं त्यांच्या घरातच दररोज संध्याकाळी 6 ते 10 मानसिक शोषण होतं. पण सांगणार कुणाला, करणार काय! अश्यावेळी चार तास आपापले चलदूरध्वनी काढून सोशीअल साईट्स वर रमणे हा एक पर्याय या सोशिक बुद्धिवादी मंडळीकडे असतो.

टीव्ही मालिकांच्या रुक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात 'लगान' मधील गावकऱ्याप्रमाणे आम्ही मंडळी आकाशाकडे डोळे लावून होतो..

"जब जब धरतीपे पाप का आतंक बढा तब उसे खतम करने जाते है त्रिदेव!" (नव्वदच्या दशकात नसिरुद्दीन शहाच्या व्हॉइस-ओव्हर मध्ये समस्त मानव जातीला दिलेला विश्वास शेवटी खरा ठरला.)

टीव्ही मालिकेच्या शुष्क वाळवंटात आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आम्हा हेल्दी मनोरंजन आवडणाऱ्या गावकऱ्यांसाठी "घनन घनन घन..बदलिया बरसे.." करून इंटरनेटरुपी ,युट्युब रुपी ऍप रुपी वरुणदेव.. धावून आला.

हो ते आलेत..त्यांनी पाहिलं..(आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत..जिंकताहेत. त्या लाईफ सेवर गोष्टीच नाव म्हणजे "वेब सिरीज"!!!!

टीव्ही वा चित्रपटात संवादाचा भाषेचा स्तर वापरताना, दृश्य दाखवताना सेन्सर बोर्डाची  टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळे मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकानाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही.

म्हणून नेहमीप्रमाणे साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय, "आणि कसं असतं ना.." "तू पहिले शांत हो..." असे सतत वाक्य अंगावर टाकावी लागतात. जे चाणाक्ष प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्यात जातात. पण वेब सिरीज या "यू ट्यूब" वर किंवा त्यांच्या 'अॅप'वर असल्या कारणाने तिथे सेन्सर ची कात्री नसल्याने बोल्ड संवाद, शिव्यांचा फकफकाट याला काही उगाच चाळणी नसते.
हे सारे पदार्थ वेबसिरीजच्या ताटात मोकळेपणाने वाढलेले असतात. प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात.

आणि आजच्या इंटरनेट पिढीचं (यात तरुण, वृद्ध, नवी जुनी पिढी असा भेदभाव नाही) हे वाक्यच आहे "गूगल हमारी माता है और यू ट्यूब हमारा पिता!"

शिवाय पाच मिनिटाच्या एपिसोड नंतर दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनःस्ताप वेब सिरीज मध्ये नसतो.

इथे सासूचे चार दिवस चार हजार ना होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळे थोडक्यात मजा होते.आणि अति परिचयात अवज्ञा टळते. वेब सिरिझचे जास्तीत जास्त 5 ते 7 एपिसोड्स असतात.

पण या सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू म्हणजे निरनिराळे, नाजूक, जड विषयांना हात घालून सिरीज तयार केली जाते. जे प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालतात, स्पर्श करतात.

यामुळे वेब सिरीज चं प्रस्थ, क्रेज वाढतेय.

भारतात हिंदी आणि आता प्रादेशिक भाषेत वेब सिरीज निर्मिती होण्यापूर्वीच काही वर्षांपासूनच विदेशात वेब सिरीजचं प्रस्थ आणि त्याचा चाहता वर्ग तयार झालाय.
अनेक प्रसिद्ध , सुपरहिट लोकप्रिय इंग्लिश वेबसिरीज भारतातही लोकप्रिय आहेत.
यातील काही वेब सिरीजचे 'सिजन्स' काही वर्षांपासून सुरू आहेत. या सिरीज बघताना  कधी वेळ जातो कळत नाही, आणि कधी सिजन संपतो जाणवतही नाही. आणि सिजन संपल्यावर मनात  एक प्रकारची पोकळी निर्माण होते, आता काय करायचे ! पुढील सिजन कधी येणार! हे "सिजनल फ्रुट" पुन्हा कधी खायला मिळणार!

पण काही सिरीज या 'सिजनल' नसतात. चार ते पाच एपिसोडस् मध्ये संपतात. या सिरीज ही लोकप्रिय आहेत याचे म्हणजे कारण त्यांची वाट बघत बसावे लागत नाही.

"नमस्ते बिच" ही अशीच एक अगदी शॉर्ट वेब सिरीज आहे. मुख्य म्हणजे या वेब सिरीजला भारतीय स्पर्श आहे.

सध्या आध्यात्मचा सिजन सुरू आहे. आध्यात्म हे 'एन्डोर्स' केल्या जातंय अगदी उचभ्रू वर्गीयांमध्ये ते पाश्चिमात्य देशातही.
"स्पिरिचुली लिबरटेड" असणं, 'ऑरा' , स्पिरीच्युअॅलिटी, एनर्जी, वाईब्स, ग्रॅटीट्यूड असे जड शब्द वापरणे, ऋषिकेश वा हिमालयातील एखाद्या 'योगा' (योग नाही) आश्रमात जाणे हे आजचे उचभ्रू लोकांचे, तरुण लोकांत  'ट्रेंडी' आहे.
अश्यातच
जिमपेक्षा 'योगा' क्लासला जाणे हे स्पिरिचुअल वगैरे मानल्या जातं.

ज्या प्रकारे भारतात पाश्चिमात्य वातावरण , प्रभाव आहे म्हंटलं जातं, उथळ पाण्याला खळखळाट असलेले  सतत तो प्रभाव मुद्दाम दाखवत असतात. त्यामागे अट्टहास असतो. तसंच विदेशातही भारतीय 'योगा' आणि 'आयुर्वेदा'चा प्रभाव आहे. तिथेही ते जरा 'स्टँडर्ड' , 'कूल' 'स्पिरिचुअल' मानलं जातं. आणि तिथेही ते शो ऑफचं साधन आहे.

 ही वेब सिरीज त्यावरच आहे. एक अमेरिकन मुलगी, '  'सबिन' ही लॉस अँजेलीसला स्थायिक व्हायला येते. तिथे ती एका योग क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करते. पण जिमला गेल्यावर, मॅकडॉनल्ड , गोवा ट्रिपला गेलं की सोशिअल मीडियावर फोटो टाकलेच पाहिजे, तथापि बरेचदा फोटो टाकता यावेत म्हणूनच तिथे जातात, त्याचप्रकारे त्या योग क्लासमध्येही फक्त शो ऑफ, पब्लिसिटी यालाच महत्व असतं . तिला सुरवातीलाच तिचे इन्स्टाग्रामवर 'फॉलोअर्स' किती आहेत, विचारलं जातं.
अरे हो, फेसबुक, ट्विटर हे जरा आता आऊटडेटेड मानलं जातं; सध्या 'इन्स्टाग्राम' इज "न्यू कूल"!

इथून तिचा "योगा टीचर" म्हणून काम सुरू होतं. सुरवातीला तिला स्पर्धक म्हणून कोणी मनाने स्वीकारत नाही , तीसुद्धा प्रथम नवी असल्याने अवघडते, प्रामाणिक काम करते.
तेथील व्यवस्थापनातील मुलींवर भारतीय योगा, अध्यात्माचा प्रभाव असल्याने त्या पेटीवर ( हार्मोनियम) हरे राधे राधे ...शाम" गात असतात .
नवं अध्यात्मिक व्यक्तींमध्ये जो उथळपणा, तोंडी जे शब्द असतात, ते तेथील योगा क्लासमध्ये काम करणाऱ्या मुलींमध्येही असतो, त्यामुळे सतत तोंडात, 'थँक्यू '  म्हणण्याऐवजी 'ग्रॅटीट्युड' हा शब्द असतो. ही मुळातच संपूर्णपणे विनोदी आणि विडंबन सिरीज असल्याने बघताना मजा येते.

एक दिवस तिच्याच क्लासमध्ये शिकणारा विद्यार्थी च तिच्याकडून शिकून स्वतःचा  योगा आणि 'प्राणायामा' कोचिंग क्लास काढतो .

मनुष्य कितीही नव्या ट्रेंड्स गोष्टींमध्ये स्वतःला कूल म्हणून  घ्यायला गुंतू लागला , तरीही ताण आल्यावर तो मुळात जसा आहे तेच बाहेर येतं. अध्यात्मचा बुरखा जास्त वेळ पांघरता येत नाही. अंगावरची खोळ एक दिवस पडतेच.
त्याचप्रमाणे एक दिवस ती ड्रग्स घेते.

भारतात चायनीज पदार्थ फार लोकप्रिय आहेत. पण ते अस्सल चायनीज पदार्थ नाही तर 'भारतीय' चायनीज पदार्थ असतात. त्याचप्रकारे भारतीय योग शिकवताना स्वतःसुद्धा परिपूर्ण नसल्याने प्राणायामाच्या , शवासनाऐवजी भलतंच शिकवते, पण तेथील विद्यार्थी लोकांना ते आवडतं . आणि त्या दिवसापासून तिचेही इन्स्टाग्रामवर 'फॉलोवर्स' वाढतात.  ती ही स्वतःचे योगा करतानाचे फोटोज  इन्स्टाग्रामवर टाकते.याच साठी केला होता अट्टाहास!

प्रधानमंत्री मोदींनी आंतरराष्ट्रीय "योगा दिन" सुरू करण्यात पुढाकार घेतल्यानंतर जगभरात योगाचं ग्लॅमर आणखी वाढलंय. त्या धर्तीवर भारतीय स्पर्श असलेली प्राणायामा, सूर्य नमस्कार वगैरे असलेली ही ''नमस्ते बिच" ही इंग्लिश वेबसिरीज बघण्यात मजा येते.

ही सिरीज यातील प्रमुख पात्र 'सबिन',  म्हणजे समर चेसंट या अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखिकेनेच लिहिली आहे. ती या पात्रासाठी योग्यच वाटते.

या सिरीजमधील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यातील लिखाण, संवाद. अगदी मस्त विडंबन जमलंय. लेखिकेची निरीक्षणशक्ती यात दिसून येते.

या वेबसिरीजची एक वेगळी आणि माझ्यासाठी आवडती बाजू म्हणजे ही अगदी छोटी सिरीज आहे. अर्धा तासात संपूर्ण सिरीज बघून होते. इतर सिरीजप्रमाणे पुढील सिजन्सची वाट बघावी लागत नाही, शिवाय अगदी छोटे भाग आहेत.
एक गंमतीदार, हलकीफुलकी ही भारतीय स्पर्श असलेली वेबसिरीज आहे.

No comments:

Post a Comment