कृष्ण म्हणजे रोमँस, कृष्ण म्हणजे सखा, प्रेमाचं प्रतीक, खोडकर हे जास्त प्राचिलीत आहे. पण कृष्णाची कर्तव्य कठोर भूमिका झाकोळते. कृष्ण हा अध्यात्माचं संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.
भक्तिमार्ग, कर्म मार्ग, ज्ञानमार्ग असे तीन आध्यात्मिक मार्ग जे म्हणतात, हे तिन्ही श्रीकृष्णापासून सुरू होतात, कृष्णात येउन मिसळतात.
ज्ञान मार्ग:- “मृत्य म्हणजे शरीर बदल फक्त..” “हे विश्व माझ्यात आहे मीच या विश्वात आहे..” हे त्याने अर्जुनाला सांगितलं.
अर्जुनाला रणांगणावर विराट दर्शन देऊन मी जे दिसतो ते शरीर म्हणजेच मी नाही, मी संपूर्ण विश्व आहे. जीवन आणि मृत्यू दोन्ही माझेच रूप आहेत. हे समजावून सांगून अर्जुनाला ‘ज्ञान’ दिलं.
कर्म मार्ग:- अर्जुन त्याच्या नातेवाईकांना मारण्यासाठी मानसिकरित्या दुबळा, इमोशनल झाला असता त्याला युद्ध करणे हेच तुझं कर्तव्य आहे. रिझल्ट डजंट मॅटर, सांगितलं. त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली.
भक्ती मार्ग:- कृष्ण भक्तीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही. भक्तीमार्गाचा महास्रोत आहे तो. राधा, मीरा अनेक संत कृष्णभक्त प्रसिद्ध आहेत.
पण एक प्रसंग मला विशेष आवडतो कृष्ण चरित्रातील. उद्धव आणि राधेचा.
उद्धव हा महाज्ञानी होता. सत्य म्हणजे काय हे त्याला कळत असे. श्रीकृष्ण म्हणजे काय प्रकरण आहे हे त्याला ज्ञानाच्या अनुषंगाने कळलं होतं. श्रीकृष्ण हे निराकार ईश्वरी रूप आहे , शरीर नाही. हे ज्ञान त्याला होतं.
पण त्याच्यात भक्ती नव्हती. प्रेम नव्हते. भक्ती मार्गाला उद्धव कमी लेखात असे. सगुण रूप, नामस्मरण वगैरे हे अज्ञानी लोकांचं काम आहे असा त्याचा विश्वास होता.
त्यामुळे त्याच्यात कोरड्या ज्ञानाचा अहंकार वाढला होता. श्रीकृष्णालाही त्याची कल्पना होती.
एकदा कृष्ण महालात म्लान चेहऱ्याने दुःखी होऊन बसला होता. उध्दवाने त्याला कारण विचारलं असता, म्हणाला, की मला वृंदावनातील गोपींची, नंदची, राधेची आठवण येतेय. म्हणून मी दुःखी झालोय.
कृष्णाचं उत्तर ऐकून उद्धव आश्चर्यचकित झाला. कृष्ण जो साक्षात ईश्वर, त्याला मुळात कोणाची आठवण, ‘अटॅचमेंट” कशाला वाटायला हवी. कारण मूळ ज्ञान हे आहे की सर्वजण आत्मा, चैतन्य आहे. बाकी सगळी माया आहे. खोटं आहे.
भावना, प्रेम , विरह हे चूक अज्ञानी लोकांचं काम हे तो कृष्णाला सांगू लागतो.
उद्धव कृष्णाला समजावतो की तुम्हीच ईश्वर आहात, मग या मायेला का फसता आहात!?
ते ऐकून कृष्ण म्हणाला की धन्यवाद उद्धवा मला सत्याची जाणीव करून दिल्याबद्दल. पण आता हेच ज्ञान तू वृंदावनात जाऊन गोपीकांनाही सांग. त्यांनाही सत्य कळू दे. डिटॅचमेंटचं महत्व समजू दे. तेही माझ्या विरहात तळमळत आहेत. त्यांना सत्य, ज्ञान दे.
गावातील अडाणी, भोळ्या अज्ञानी गोपिकांना समजवून सांगणे काय कठीण म्हणून उद्धव रथात बसून तोऱ्यात वृंदावनात जातो.
वृंदावन जेथे भक्ती मातीमातीत, फुलात, पानात , हवेत ओथंबून वाहते. ( सध्या मात्र तेथे फक्त ढोंगीपणा, फसवेगिरी वाहते, धर्माच्या नावाने ब्लॅकमेलिंग चालते.) तेथे गेल्यापासून त्याला विचित्र अनुभव येऊ लागतात. त्याला त्रास होऊ लागतो. कारण त्याच्याकडे कोरडं ज्ञान तर असतं पण कृष्णाच्या ईश्वराच्या भक्तीचा , प्रेमाचा ओलावा नसतो.
वृंदावनात गोपिका कृष्ण विरहात तळमळत, दुःखी असतात. जेव्हा गोपिका कृष्णाबद्दल विचारतात, तो कसा आहे, तो आमची आठवण करतो का..
उद्धव त्यांना सांगतो तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही त्याला अजूनही तुमचा गोकुळातील कान्हा समजताहात. त्याला शरीर समजत आहात.
तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याला कोणता आकार नाही, शरीर नाही, नाम् नाही. तो अजन्मा आहे. त्यानेच सांगितलं तुम्हाला की त्याला विसरून जा. तो कधीच परत गोकुळात येणार नाही. त्याच्या मोहात अडकून, प्रेम, भक्ती, आसक्ती सोडून ज्ञानी व्हा.
हे सगळं (कोरडं) ज्ञान ऐकून त्या गावातील, साध्या गोपिका त्यालाच मूर्खात काढतात, “नको तुझं काही ज्ञान. तो आमचा कान्हाच आहे. आमच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम आहे!”
गोपिका उद्धवाला राधेकडे घेऊन जातात. राधाही विरहात तळमळत , दुःखी बसली असते. सगळ्यात कृष्णाला शोधत असते. कृष्ण कधी येईल प्रत्येकाला विचारत असते. उद्धव राधेलाही तेच ज्ञानाच्या सत्य गोष्टी सांगतो. कृष्णाचं मूळ रूप समजावून सांगतो. परब्रह्म फक्त शरीरूपी दिसतंय ते खोटं आहे. कृष्णाला मनुष्य शरीर समजून हे कृष्णाबद्दलचं ; त्याच्या लीला आठवून , प्रेम, आसक्ती, विरह मूर्खपणा आहे. तो सगळीकडे आहे तत्वरुपात. शरीराने फक्त मथुरेला आहे.
राधा म्हणते कृष्ण कायम आमच्या सोबत शरीर रूपानेही असतो. आमचं प्रेम हीच भक्ती आहे. तो मुळात कधीच आमच्यापासून दूर नसतो.
उद्धव त्यावर म्हणतो की कृष्ण शरीररुपाने जवळ असणं ही फक्त तुमची मनोकल्पना आहे. भास आहे विरहात तळमळणाऱ्या अज्ञानी व्यक्तीचा.
राधा उद्धवाला म्हणते “तू आमच्या कृष्ण प्रेमाला मनोकल्पना समजतोय! तुला बघायचंय कृष्ण आत्ताही इथेच आहे?”
त्या क्षणाला श्रीकृष्ण राधेजवळ अवतीर्ण होतो.
उद्धव आश्चर्यचकित होतो. तो कृष्णाला स्पर्श करून बघतो. तो भास नसतो. कृष्णाचा स्पर्श तो अनुभवतो.
तो कृष्णाला पुन्हा पुन्हा स्पर्श करून भास नसल्याचं निश्चित करतो.
कृष्णाचा त्याला स्पर्श होत राहतो.
कृष्ण आणि राधा त्याच्याकडे बघून स्मित करत असतात.
"कृष्णा तू मथुरेत शरीररूपाने असताना इथे कसा!" विचारल्यावर कृष्ण सांगतो, मी सांगितलं ना मी फक्त भक्तीने पकडल्या जातो. जेथे प्रेम , भक्ती तेथे मी असतोच. येतोच. कृष्ण अंतर्धान पावतो.
त्या क्षणाला उद्धवातील अहंकार संपतो. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच्यात भक्ती प्रेम जागृत होतं. राधा गोपिकांबद्दल , त्यांच्या अपार कृष्णप्रेमाबद्दल आदर जागृत होतो. भक्तीची शक्ती कळते. उद्धव त्या क्षणापासून “राधे राधे” करत “राधे कृष्ण” म्हणत भक्तीत न्हाहून , नामस्मरण करतच पायी गोकुळातून मथुरेला येतो. शरीराची, कपड्यांची शुद्ध नसते. धुळीत मातीत माखलेला, मुखी “राधे कृष्ण” “राधे राधे” प्रेमाने, भक्तीत नामस्मरण सुरू असतं.
उध्दवतील अहंकार संपला असतो.
मुळात उद्धव , राधा- गोपी, अर्जुन हे सगळे आपापल्या मार्गावर योग्य असतात. उद्धव महाज्ञानी होता. पण माझाच योग्य मार्ग आणि इतरांचा अध्यात्मिक मार्ग चुकीचा हा अहंकार त्याच्यात होतो. त्यामुळे त्याला भक्ती मार्गाचंही श्रेष्ठत्व समजण्यासाठी हे सगळं घडवतो.
हेच आजच्या काळात धर्माबद्दल होतं आहे. माझाच धर्म श्रेष्ठ दुसऱ्याचा छोटा. आपल्या धर्माशी अतिलिप्त अनहेल्दी अटॅचमेंट होऊन इतरांचा राग. इथूनच थिंग्स स्टार्ट टू गो रॉंग.
“#योगमार्ग” हा ही एक स्वतंत्र वेगळा रस्ता. पूर्वी योगी या मार्गानेही ईश्वरी तत्व प्राप्त करून घ्यायला योगसाधना करायचे.
“पिंडी ते ब्रह्मांडी” हे यांचं तत्व. हा मार्गही कृष्णापासून सुरू होतो, त्यातच मिळतो.
बालकृष्णाने लोणी खाल्लं म्हणून यशोदा कृष्णाला मुख उघडायला सांगते , तेव्हा त्याच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दर्शन तिला होतं.
जे बाहेर आहे तेच आत आहे, आतीलच बाहेर आहे. “पिंडी ते ब्रह्मांडी”.
ज्ञान, कर्म, भक्ती, योग सर्व अध्यात्मिक मार्ग यांचा संबंध आणि अधिष्ठान कृष्ण आहे. म्हणून तो खास आहे. संपूर्ण आहे.
कृष्णाच्या बाबतीत ‘#नामस्मरण’ हा शब्द मला विशेष आवडतो. या शब्दात सगळं काही येतं. ‘नाम’ म्हणजे भक्ती येते. ‘स्म’ म्हणजे अहं ब्रह्मास्मि, म्हणजे मीच ईश्वर आहे, हे ‘ज्ञान’ही येतं. ‘रण’ म्हणजे युद्धभूमी. जिथे कर्म योग सांगितला. प्रॅक्टिकल आयुष्यही ‘रण’.
कृष्ण हा म्हणून मला संपूर्ण वाटतो.
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment