Sunday, 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

No comments:

Post a Comment