Friday, 28 July 2017

माना मानव वा परमेश्वर


माना मानव वा परमेश्वर

कृष्ण म्हटला की फक्त अल्लड,चोऱ्या करणारा,गोपींचे वस्त्र लपवणारा,खोटे बोलणारा किंवा कृष्णाला १६००० बायका असू शकतात तर आम्हाला...अशे अनेक कृष्णासंबंधीत लैंगिकतेवर मूर्खानी  पाचकळ जोक्स करून; इतकच त्याला मर्यादीत ठेवलं आहे.

राम जसा उच्चारायला सोपा तसं चरित्रही समजायला सरळ सोपं पण कृष्ण म्हणायलाही कठीण समजायला तर अथांग  गुंतागुंतीचं..

 सुधीरफडकेंनी कृष्णावर म्हटलेलं माझं एक खुप आवडतं गाणं आहे."माना मानव वा परमेश्वर...
यात सोळा हजार स्त्रीयांबद्दल एक अगदी योग्य ओळ आहे. त्यातील एक शब्द अमला हा आहे.पहिल्यांदा जेव्हा मी हे  गाणं  काही वर्षांपुर्वी ऐकलं तेव्हा तो शब्द "अमला" नसुन अबला असावा असं वाटुन गेलं होतं.पण नंतर "अमला" या शब्दाचा नीट अर्थ एका व्यक्तीने समजावुन सांगितला. आणि "अबला" ऐवजी "अमला" हे किती योग्य आहे हे कळल्यावर आणि त्या गाण्यातील खोली कळत गेल्यावर वाहहह...असं आतुन मनापासुन निघालं.

तरिही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा भोगी म्हणुनी उपहासा मी योगी कर्माचा........

नरकासुराच्या वधानंतर त्याच्या बंदीतील सोळा हजार स्त्रीयांची सुटका केल्यावरही मात्र त्यांना समाज कसा  स्विकारणार म्हणुन कृष्णाने त्यांना आपले नाव दिले!आणि हे करताना त्याने त्या नरकासुराच्या जनानखान्यातुन सुटका केलेल्या स्त्रियांना लाचार "अबला न म्हणता "अमला" म्हटलं आहे.म्हणजे मलिन नसलेल्या..
आणि आपण अजुनही शारिरीक वर्जिनिटी आणि तत्सम उथळ गोष्टीत अडकुन आहोत.
नवरीमुलगी वर्जिन आहे की नाही ह्याची टेस्ट करायला पहिल्या रात्री गादीवर पांढरी चादर टाकली जाते .बाहेर गावातील #पंचायतखोर माणसं आणि तसलेच खोर बढेबूढे टेस्टच्या निकालाची वाट बघत उभे असतात.
आणि चादरीवर रक्ताचे डाग  नसल्यास मुलीचाअपमान करून घटस्फोट दिला जातो.

#वर्जिनिटी ही शारिरीक नसुन मानसिक असते हे अजुनही आपल्याला समजले नाही.

यावरून कृष्ण हा किती समजसुधारक द्रष्टा होता हे दिसतं विधवा पुनर्विवाह याची सुरुवात प्रथम कृष्णाने केली असं म्हणता येईल.

गोप मित्रांसोबत सर्वांचे डबे एकत्र करून गोपालकाला  करताना वर्णभेद जातिभेदाभेद दूर करून सर्वांनी एकत्र एकीने राहावं हे कृतीतून दाखवलं.

इंद्रासारख्या अहंकारी राजाची व्यक्तीपूजा न करता जो #पर्वत जी #जमीन आपल्याला जगवते तिची पूजा करून निसर्गपूजा, निसर्गरक्षण करण्याचा स्पष्ट संदेश दिला.

गोकुळातील बालकांनी दही लोणी आहार घेऊन कुस्ती व्यायाम करावा हे त्याने स्वतः करून दाखवलं. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही मल्ल होते!

हाच मूळ हिंदू धर्म ही मूळ संस्कृतीआहे!
वर्णभेद, जातीभेद कुठेही मूळ धर्मात नाही.
स्त्री ला कुठेही अबला लाचार म्हणून वागणूक दिलेली नाही.
हे सगळं तण नंतर चुकीच्या लोकांमुळे निर्माण झालं.

आपल्या संपूर्ण आयुष्यात कृष्णाने मागे वळून पाहिलं नाही.एकदा वृंदावन गोकुळ सोडून मथुरेला आला तेव्हा पुन्हा शेवटपर्यंत कृष्ण कधीच वृंदावनाला गेला नाही.
मथुरा सोडून #द्वारकेला गेला त्यांनतर पुन्हा कधीही मथुरेला परत गेला नाही.

दहि लोणी चोरणारा..गोपींचे वस्त्र लपवणारा रास खेळणारा..अल्लड ,बाळ.. किशोर..कृष्णानेच पुढे कर्मकठोर #गीता सांगितली आणि खलप्रवृत्ती नष्ट करण्यसाठी अर्जुनाला अपल्याच कुटुंबियांवर बाण चालवायला सांगीतले!

सर्व काही अथांग खोल!

श्रीकृष्ण मला नेहमी समुद्रसारखा वाटतो प्रत्येकाला याचं प्रचंड आकर्षण वाटतं!
सागर किनारी बसून प्रत्येकाला काही न काही विचार सुचतात श्रीकृष्णवरही कित्येकाने वेगवेगळ्य पैलूंवर लिहिलंय
प्रत्येकाला तो आपला वाटतो
समुद्रासारखाच श्यामल वर्णीय
सागरासरखच अथांग

समुद्र जसा शेकडो हजारो प्रवाह नद्यानं स्वतःत सामावून घेत त्यांना आपलं नाव देतो ..#गंगेसी_मिळता_लेंड_ओहळ..
कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणी...

तसा हा श्यामल सागर प्रत्येकाला स्वतःत सामावून घेतो..

-अभिजीत पानसे

No comments:

Post a Comment