Showing posts with label सिंधुदुर्ग-माणगाव-डोंगरावरील जंगलातील गुफा प्रवास. Show all posts
Showing posts with label सिंधुदुर्ग-माणगाव-डोंगरावरील जंगलातील गुफा प्रवास. Show all posts

Wednesday, 27 December 2017

कोल्हापूरातील तो माणूस, कोंकण माणगाव रोमांचकारी प्रवास वर्णन भाग 1

आज वासुदेवानंदसरस्वती महाराजांची जयंती.
जन्मगाव माणगाव प्रवास वर्णन.
कोल्हापुरातील त्या माणसाचा अनुभव.

ऑगस्ट 2013

भाग पहिला



तीन चार वर्षांपुर्वी मी एका ओळखिच्या व्यक्तीला भेटायला पुण्याला जाण्यासाठी संध्याकाळी निघालो.ऑगस्ट..श्रावण संपायला आला होता. घरून निघताना एका न्युज चँनलवर "आपला गाव आपला गणपती" असं कोणता तरी प्रो सुरू होता. त्यात कोल्हापूरच्या एक दशभुजा गणपती मंदीराची माहिती दाखवत होते.

मला पुरातन वास्तु मंदीर बघायला फार आवडतात म्हणुन विचार केेला की कधी कोल्हापुुरला गेलो की शोधु हे मंदीर.

दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचुन ; भेटुन रात्री परत निघालो.तेव्हा वाटलं की नृसिंह वाडीला दर्शन करून यावं. पास होताच.
तेव्हा कोल्हापुरला जाणाऱ्या जांभळ्या पांढऱ्या स्वच्छ आराम बस मध्ये बसलो.

वेळेचा अंदाज नीट न आल्याने रात्री २:३०AMला कोल्हापूर बस स्टँडला उतरलो. सर्वत्र सामसूम !!

बस स्थानकावर काही माणसं झोपली होती. पणआत समोरच एका खुर्चीवर एक पोलीस हवालदार बसले होते. तेही खुर्चीवर डुलक्या देत होते.माझी चाहुल लागल्याने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझं निरिक्षण केलं. काहीच बोलले नाहीत. मी इकडे तिकडे थोडं घुटमळलो.चार्टवर वाडीला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या बसेसचा वेळ पाहिला.

ते हवालदार अधुन मधुन माझ्याकडे मान वळवुन पाहताय हे माझ्या लक्षात येत होतं.

उगाच त्यांना काही संशयास्पद वाटु नये म्हणुन शेवटी मी त्यांच्या पुढ्यात रिकाम्या सिमेंटच्या बाकड्यावर येउन बसलो.इतर बाकावर काही माणसं ; कोणी अंगावर नेटकी चादर घेउन कोणी तसेच झोपले होते. अधुन मधुन; चावणारे डास उडवायला त्यांची हाताची हालचाल होत होती.

आत आल्यापासुन माझ्या कानावर सतत दुरवरचा बोलण्याचा गाण्याचा आवाज पडत होता.नक्कीच कुठेतरी मोठ्या आवाजात टिव्ही सुरू होता.

मी समोर येउन बसल्याने म्हणा किंवा खुर्चीत अवघडुन बसुन डुलक्या देण्याचा कंटाळा आला म्हणा ते हवालदार आता जागे झाले होते.

 त्यांना मंदिर कधी उघडतं वगैरे माहिती विचारली..

त्या आधीच्या वर्षीच नवरात्रात पहिल्यांदाच कोल्हापुरला आल्यावर पायीच शहर बघत मंदीरापर्यंत गेलो होतो आताही तसंच जावं ठरवलं आणि जाण्यास उठलो.

 त्या पोलिसांनी ताबडतोब मला मागून आवाज दिला विचारलं "कुठं चाल्ले? मंदिरकडं?"

मी हो म्हटल्यावर त्यानी अगदी स्पष्ट सांगीतलं "आता इतक्या रात्री जाऊ नका शहर आता सुरक्षित राहीलं नाही! तुम्हाला रस्त्यात कोणी पकडन आणि लुटू शकतं!उजाडल्यावर जावा!

असा स्पष्ट इशारा दिल्यावर मला वास्तवाची जाणीव झाली

मी काही मिनिटं तिथंच बसलो. मग सहज समोरच्या मोकळ्या भागात फिरावं म्हणून गेलो तर इतक्या वेळचा तो आवाज कुठून येतोय ते कळलं समोर एक पान टपरी होती; तिथे मोठ्या आवाजत टीव्ही सुरु होता.
घशाला कोरडही पडली होती. त्याच्याकडे पाण्याची बॉटल मिळेल म्हणून तिथे गेलो.

 मोठ्या आवाजात एक कुठलातरी सुमार  तेलुगू  पिक्चर सुरु होता. जोरजोरात नाटकी संवाद आणि अंगावर येणारे क्लोज अप्स  शॉट्स बॉटलने पाणी पिताना मी पाहत होतो.
त्या ठेल्यावर तीन चार अजून माणसे होती. दारूचा तिव्र भपकारा येत होता.

माझ्या उजव्या बाजूला एक उंच आडदांड इसम उभा होता

अर्धी बॉटल पाणी पिऊन बॉटल सॅक ला मागे अडकवली. घड्याळात 2: 55 झाले होते.

त्या ठेल्या वाल्याला मंदीर कधी उघडतं रस्ता कुठे वगैर मी हिंदीत प्रथम विचारलं.

त्याने शुद्ध मराठीतुन मला सांगितलं.
कुठून आलात वगैरे त्याने विचारलं.

त्या तेवढ्याच टपरीवर माणसांचा काय तो वावर होता .पण आंबलेलं शरीर आणि त्या कर्कश तेलुगू डायलॉग आणि किंकाळ्या मात्र तिथे उभं राहु देत नव्हत्या.

म्हणुन थोडं समोर रस्त्यावर पाय मोकळे करावे म्हणुन चालत गेलो.सगळीकडे चिडीचुप्प होतं.

आजुबाजुला अंगावर येणारी शांतता असली की मन अनेक विचारांनी अशांत होउन उठतं.

 तितक्यात मागुन एक माणुस आला म्हणला "चला मी अंबाबाईच्या मंदिरात सोडतो.."
मी नाही नको म्हटलं.तो म्हंटला "माझं घर त्याच रस्त्यावर आहे मी तुम्हाला सोडतो.."

मला आठवलं पानटपरीला माझ्या उजव्या बाजुला असलेला हाच तो माणुस. आता मी त्याला नीट पाहात होतो. सहा फुट वा त्याहुन थोडा नक्कीच उंच होता. डार्क रंग. दाट दाढी मिशी  होती. शरीराने प्रचंड आडदांड..डोक्यावर एकही केस नाही.

मी त्याला नाही म्हटलं.पण तो मला पुन्हा म्हटला की त्याचं घर त्याच रस्त्यावर आहे.

मला एकदम थोड्याच वेळापुर्वी त्या पोलीसाने दिलेला इशारा आठवला की हे शहर हा भाग सुरक्षीत नाही कोणीतरी तुम्हाला गाठेन आणि लुटू किवा इजा करू शकतं..."

माझा हँम्लेट झाला काय करावं?जाउ की जाउ नये?!

पण माझं अगदी स्पष्ट एक प्रिन्सिपल आहे . मी पुढच्या व्यक्तीवर बिनदिक्कत विश्वास टाकतो.तो त्याने मोडला तर तो व्यक्ती त्याच्या कर्माने मी माझ्या कर्माने! लॉ ऑफ कर्मा नेव्हर फेल्स!

मी त्याला हो म्हटलं. कारण पहाटेच मंदिर उघडल्यावर दर्शन झालं की वाडीला जायला मला भरपुर वेळ मिळणार होता.तसंच कित्येक वर्षांपासुनची #ज्योतीबाला जायची इच्छाही पुर्ण होउ शकेल. .हे तिन्हींचं इक्वेशन पुर्ण होणार होतं.म्हणुन मी त्याला हो म्हटलं.पण मन साशंक होतं. त्याच्याकडे पाहुन कोणीही त्याला कृर म्हटलं असतं.

त्याने त्याची तिथेच असलेली बाइक आणली ; मी मागे बसलो. आणि आम्ही मंदिराकडे  निघालो.

तो मला प्रश्न विचारून माहिती माझ्याबद्दल माहिती घेत होता..कधी कोल्हापुरला आले होते काय..कोणी इथे राहतं का वगैरे ..

हे सगळं शंकास्पद वाटल्याने मी मोघम उत्तर देत होतो. मुळात मी असं अनोळखी शहरात अनोळखी माणसासोबत उशीरा रात्री त्याच्यावर विश्वास टाकुन त्याच्या घरी जाण्याला कोणीही ऱ्याशनल व्यक्तीने मुर्खात काढलं असतं .

संपुर्ण रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.हँलोजनच्या दिव्यांचा प्रकाशात रिकाम्या मेन रोडच्या आजुबाजुचे बंद दुकाने दिसत होती.

मी नकारात्मक विचार करत होतो की हा माणुस जास्तीत जास्त काय करीन मोबाईल व जवळचे पैसे लुटू शकेल...

तेवढ्यात त्याने रस्त्यावर गाडी थांबवली.माझ्या मनातील विचारांना दुजोरा मिळणारी ती कृती होती.

तो म्हणला "तुम्ही पहिले माझ्या घरी चला..! अंघोळ करा फ्रेश व्हा..मग मी तुम्हाला  मंदिरात सोडतो.

मी हो म्हटलं.विश्वास टाकायचा ..बाकी लेट्स सी. हेच माझं प्रिन्सि.म्हणुन हो म्हटलं.पण मनावर नकारात्मक विचारांचं दडपण आलं होतं.

मी विचार करू लागलो हा काय करू शकतो.. मोबाईल वा जवळचे पैसे घेउ शकतो..बाकी वेळच आल्यास मी जीवावरती काही प्रसंग उद्भवल्यास मी याला प्रतिकार करत मारू शकतो का..वगैरे विचार करत होतो.

त्याने बाइक मेन रस्त्यावरून काढत छोट्या  रस्त्यांवरून गल्लीतुन नेउ लागला.
तो भाग प्रमुख गावापासुन बाहेर आहे. एका घरापाशी थांबवली. तेच त्याचं घर तो बोलला.

 घराच्या मागे अंधार असल्याने स्पष्ट दिसत नव्हत पण झाडी व शेत असं काहीतरी होतं.
मी शहरापासून दूर होतं हे नक्की.

आत सगळीकडे प्रचंड धूळ कचरा ..सिमेंट ..भग्न भिंती होत्या जागोजागी पांढरे कापड्यांनी वस्तू झाकल्या होत्या.
घरात इतर कोणीही नव्हतं.
मला ते विचित्र वाटलं.

तो म्हणाला घराचं रिनोवेशन सुरु आहे.

त्याने बसायला सांगीतलं आणि तो आत गेला.

मी पहिले रात्रीपासून मेलेला माझा सेल चार्जिंग ला लावला.

थोडयावेळाने तो बाहेर आला; त्याने माझ्यासाठी पाणी तापवून आणलं होतं

माझ्या मनावरचं आता दडपण नाहीस झालं होतं. अंघोळ आटोपून प्रवासातील कपडे बदलवले.फ्रेश वाटत होतं.

तो ही थोड्याचवेळात तयार झाला.

त्याचं आडनाव पवार होतं. पाहिलं नाव विसरलो.दोनेक वर्षांपासुन आठवतोय पण आजवर आठवलं नाही.

घरचे सर्वजण रिनोवेशनमुळे शेजारी दुसऱ्या घरात सध्या राहताहेत त्याने सांगितलं.

पावसाची एक छोटी सर आल्याने त्याने त्याची मोठी गाडी काढली आणि आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे निघालो.

पहाटेचे पाच वाजले होते.
तो गाडीत सांगत होता की तुम्ही पानटपरीवर मंदिराबद्दल विचारतानाच मला इच्छा झाली की तुम्हाला मंदिरात सोडावं !
तुम्ही इतक्या दुरून आमच्या गावात आलात तेही फक्त दर्शनाला ..आम्ही इथल्या इथे असून जात नाही!

त्याने त्याची इतर माहिती सांगितली.
नृसिंहवाडी बद्दल विचारलं असता म्हंटला तुम्ही नशीबवान आहात काल संध्याकाळीच मंदिर मोकळं झालंय कृष्णेच पूर ओसरला!

तुम्ही जाऊन या तिथेही!

त्याने एका मंदिरापाशी गाडी थाम्बवली.
तो म्हणाला चला पहले गणपतीचं दर्शन करू!

 हे आमच्या कोल्हापूरच महत्वाचं मंदिर आहे दशभुजा गणपती!

आत गेलो तर तीच मूर्ती! तेच मंदिर जे मी निघताना टीव्ही वर पाहिलं होतं! आणि विचार केला होता की कधी कोल्हापूर गेलो तर हे मंदिर शोधू!

माझ्या आनंदाला पारावर उरला नाही!
खरच काही गोष्टी.. ..संकेत ..संजोग हे #
'रॅशनली' समजत नाहीत.

तिथून महालक्ष्मी  मंदिरात आलो .नुकतंच पाऊस पडून गेल्याने खाली जमीन ओली होती ..थोड्या साचलेल्या पाण्यात मंदिराचं थोडं प्रतिबिंब दिसत होतं.
 सुखकारक गारवा जाणवत होता.

आत नुकतीच देवीची पूजा आटोपली होती.वातावरण एकदम प्रसन्न होतं. शेवटचा श्रावणी  शुक्रवार म्हणून बायकांची गर्दी होत होती.
दर्शन आटोपलं.

पुजारी त्याच्या ओळखीचे होते.
तो म्हणाला तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घडवलं असतं पण सध्या त्याचा वाद सुरू आहे.

तिथून त्याने एका रेणुका  आणि दत्त मंदिरात नेलं. कोल्हापुरात दत्त महाराज दुपारी भोजनाला येतात ही जी श्रद्धा आहे ती या मंदिरासंबंधी आहे हे कळलं.

शेवटी सकाळी ७:३०ला परत त्याने मला स्टँडवर त्याच पानटपरीपाशी सोडलं.त्याचा नंबर घेतला.मनापासून धन्यवाद म्हणून मी  निरोप घेतला.

तिथून वाडील गेलो कृष्णामाईने दत्त महाराजांना स्नान घडवून ती परत वर्षभरासाठी आपल्या मार्गाने वाहण्यास गेली होती.

पलीकडच्या तीरावरील गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन आलो येथीलच वेल तोडण्याची आणि चौसष्ठ योगिनिंची कथा गुरुचरित्र त सांगीतली आहे.

तेथील एका माणसाशी बोलताना तो म्हंटला की इथपर्यंत आला आहात तर टेम्ब्ये स्वामींच्या माणगाव ला जाऊन या नुकताच जयंती सोहळा आटोपला आहे तिथे!

मीही जायचं ठरवलं .

पण पुन्हा एकदा माणूसकीवर टाकलेला विश्वास ईश्वराने सार्थ ठरवला होता!
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही त्याच्या बाह्य रुपावरून 'जज' करू नये हेही समजलं.
उस जरी डोंगा परी रस नव्हे डोंगा ही म्हण आणि त्या मुलाची गोष्ट आठवली.

मी माणगावला जाण्याची चौकशी करू लागलो.

(क्रमश:)

कोकण- कोल्हापूर-जोतिबा- सावंतवाडी-माणगाव -डोंगर जंगल गुफा रोमांचकारी प्रवास भाग 2

ऑगस्ट 013
प्रवासवर्णन भाग 2 सावंतवाडी,माणगाव

वाडीहुन दुपारी निघायला मला अंमळ उशीर झाला होता.जयसिंगपुरला  बसस्टँडवर बसची वाट बघत असताना एक छान दृश्य दिसलं.

      (सकाळचा चंपक लूक)

पाउस येत असल्याने सगळे लोक आत उभे असताना  बसेस बाहेर दूर थांबायच्या. एक मुसलमानी पेहरावातला पन्नास साठ वर्षाचा एक मुसलमान माणुस छत्री घेउन बाहेरच उभा होता. बस आली की की ती कुठे जातेय आणि तिकडे जाणारे कोणी आहेत का हे आतल्या लोकांना शुद्ध मराठीत हसतमुख मुद्रेने सांगायचा आणि विचारायचा.
 एका वृद्ध बाईंना मिरजेला जायचं होतं.बस आली की तो त्या बाईंना मिरजेची बस नाही म्हणुन सांगायचा. "येइलच आता!" त्यांना म्हणायचा.

हा माणूस मला फार आवडला.सर्व जण असे सद्भावाने राहिलेत तर समाज किती आनंदी आणि  सकारात्मक वातावरण निर्माण होईल असं वाटून गेलं.

थोड्याच वेळात मिरजेची बस आली त्याने त्या बाईंना बसपर्यंत छत्री देत  पोहचवले. त़्यानंतर सांगलीची बस आली.तो त्यात निघुन गेला.
काही लोकं त्यांच्या छोट्याश्या कृतीने लक्षात राहतात. मनाला वेगळा आनंद देउन जातात.

कोल्हापुरची बस उशीरा आल्याने मी दुपारी साडेपाचला कोल्हापुरला पोहचलो. उशीर झाल्याने ज्योतिबा रद्द करावं लागलं.
सावंतवाडीला जाण्याची चौकशी करू लागलो. तेव्हा माहिती मिळाली की सध्या सावंतवाडीची थेट बस नाही.६ वाजता कणकवलीची बस येइल.तिथुन सावंतवाडीची बस मिळू शकेल.
नाहीतर रात्री दहाला पणजीला जाणाऱ्या बसने थेट सावंतवाडीला जाता येईल.

पण पुन्हा रात्री अवेळी अनोळखी छोट्या गावी पोहचणं मला नकोच होतं.आणि मुळात तिथुन सावंतवाडी वा माणगावची बस मिळेल की नाही याची शाश्वती नव्हतीच. म्हणुन रात्रीच्या बसने जाण्याचा निर्णय घेतला.

 समोर बसेसचं येणं जाणं..सततच्या अनॉउंसमेन्ट्स सुरू होत्या..
महा. राज्य डेपोच्या लाल पांढऱ्या, हिरव्या पांढऱ्या बसेस मध्ये ऑड बसेस आऊट असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसही येत जात होत्या.
कुठल्याही सीमालगत भागात गेल्यास अशी विविधता दिसतेच.
नाशिक बस स्थानकावर गुजरात राज्याच्या
बसेस दिसतात. सोलापूरला तर आंध्र, तेलंगाणा, कर्नाटक राज्याच्या बसेस साठी वेगळी स्थानकही प्रसंगी असतात.

पुढच्या मिनिटाला मला अनाउंसमेंट ऐकु आली ती ज्योतीबाला जाणाऱ्या बसची!!
आणि मी स्वत:ला रोखु शकलो नाही.

जाऊन येऊन जास्तीत जास्त दोन तासाचा प्रवास होता. माझ्याकडे साडेतीन तास होतेच.रिस्क घ्यायला हरकत नव्हती.

घेतलं ज्योतिबाचं नाव आणि घुसलो बसमध्ये! ज्योतिबाच्या नावानं चांग भलं

 बसने शहराबाहेर पडल्यावर एक टर्न घेतला तेव्हा पन्हाळा 16 किमी फलक दृष्टीस पडला.मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभु देशपांडेंवर रचलेल्या पोवाड्यातील शब्द आठवलेत.

"श्री बाजी विव्हळ पडला! मागुति तत्क्षणी उठला! बेहोष वीर परि वदला!
तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्युला!!

अगदी लहानपणी DD10 वर "ज्योतीबाचा नवस" हा कोल्हापूर चित्रपटसृष्टीतला तत्कालीन स्टार 'सूर्यकांत' यांचा चित्रपट पाहिला होता. तेव्हा ज्योतिबाची पहिल्यांदा चलचित्र तोंडओळख झाली होती . त्या दिवशी दर्शनाचा योग आला होता.

भरभर पायऱ्या उतरून ज्योतिबाचं फक्त पाच सहा सेकंद दर्शन घेतलं आणि परत निघालो. अंधार झाला असल्याने डोंगराचं सौंदर्य बघता आलं नाही.

रात्री पणजीला जाणारी बस आली. कंडक्टरने सावंतवाडीला पहाटे तीन सव्वा तीनला पोहचणार सांगितलं.
शेवटी पुन्हा तेच झालं! मी कधीही न पाहिलेल्या गावात अवेळी पोहचणार होतो.

पण माझ्या शिवाय इतरही कोणी सावंतवाडीला उतरणारे असतीलच या विचाराने जरा बरं वाटलं!रात्री कणकवली आलं बरेच लोकं उतरलेत. आता थोड्या वेळाने सावंतवाडी येणार म्हणुन मी जागरूक होउन बसलो.

तीन वाजता सावंतवाडी आल्याचं कंडक्टरचा रात्रीचा जड आवाज ऐकु आला. मी सॅक पाठीघेउन उतरू लागलो.मागे वळुन पाहिलं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं!
सावंतवाडीला उतरणारा मी एकटाच होतो. इतर सर्व डोकी मागे टेकून कोणी एकमेकांच्या खांद्यावर पडुन लवंडुन झोपली होती.

लोकांचे बरे गोव्याला जाण्याचे प्लँन्स यशस्वी होतात!!

खाली उतरल्याबरोबर बस पुढे ताबडतोब गोमंतकाकडे निघुन गेली.
आजुबाजुला सर्वत्र सामसूम! कोल्हापुर मोठं शहर असल्याने रात्री स्टँडवर काही लोकं होते पण इथे या गावी चिटपाखरूही नसणार हे पक्कच होतं.

आत स्टँडमध्ये गेलो. एक ट्यूब लाईट अस्पष्टसा आवाज करत प्रकाश फेकत होता. माझा अंदाज चुकला होता. मी आत एकटा नव्हतो. इथेही  सिमेंटच्या बर्थवर काही जणं झोपले होते. पण ती तीन चार काळी पांढरी भटकी कुत्री होती.

चिटपाखरूही नसणार हा अंदाज सपशेल चुकला होता साक्षात  तीन चार सस्तन प्राणी श्वान कंपनि सोबतीला होती. मी जरासा दुर जाउन बसलो.माझी चाहुल लागताच; आपल्या रात्रीच्या अड्ड्यावर कोण आलंय हे एक दोघांनी डोळे उघडुन मान वर करून माझ्याकडे बघुन घेतलं. पण मी त्यांना निरूपद्रवी.प्राणी वाटल्याने शेपुट थोडंसं हलवत पुन्हा मान खाली करून ते झोपी गेले.

कुत्रा हा माझा आवडता प्राणी. जगातील प्रत्येक अन् प्रत्येक नात्यात प्रेम हे टर्म्स अँड कंडिशन्स आर अपलाईड या क्लॉजने येतं. फक्त कुत्रा हाच याला अपवाद आहे. निस्वार्थपणे तो त्याच्या वा मालकाच्या शेवटापर्यंत प्रेम करतो.

कुत्रा ही शिवी कशी काय होउ शकते. ते तर बिरूद व्हायला हवं. माणूस कुत्र्यासारखा वागला तर फार उच्च स्तरावर जाईल.

मी तिथेच मान मागे रेलुन पेपर वाचत बसुन होतो. आमच्यामध्ये camaraderie निर्माण झाली होती.
एकमेकास कंपनि देउ अवघे झोपु समस्त!

 दोनेक तासांनी वर्तमानपत्रांचे गठ्ठे कलेक्ट करणारे विक्रेते येउ लागले. त्यांनी माणगावला जाणारी पहिली बस साडेसातला जवळच असलेल्या दुसऱ्या छोट्या बसस्टँडवरून मिळेल हे सांगितलं. उजाडु लागताच मी चक्कर टाकुन आलो.एक मोठा सुंदर तलाव दिसला .एकंदर सावंतवाडी हे खुपच लोभस स्वच्छ रस्त्यांचं शांत निसर्गसौंदर्याने नटलेलं अस्सल कोंकणी शहर वाटलं.

माणगावच्या बसमध्ये बसलो. बस छोट्या रस्त्यांवरून धावु लागली. अधुनमधुन लहान सहान खेडेगावांमधुन शाळेची छोटी मुलं उत्साहात आवाज करत आत चढत होती.खिडकीतुन आजुबाजुचं हिरवा निसर्ग बघता बघता; दोन दिवसांपासुन झोप न झाल्यामुळे थंड हवा चेहऱ्यावर आदळू लागताच माझं होय होय होय नाही नाही नाही सुरू झालं.

(क्रमश:)

कोल्हापूर, कोंकण- सिंधुदुर्ग- माणगाव डोंगरावरील जंगलातील गुफा दर्शन भाग 3


ऑगस्ट 2013 प्रवासवर्णनभाग3
डोंगरावर जंगलातील त्या गुहेकडे

माझं बसमध्ये नाही नाही हो हो सुरू असताना बसमधून बाहेर गावात सार्वजनिक  गणपतीची तयारी सुरु झालेली दिसत होती.
माणगाव आल्याचं कंडक्टरने सांगितलं.मी खाली उतरलो.आजुबाजुला कुठेही घर नाही गाव नाही. फक्त सरळ मोकळा रस्ता होता.एका माणसाने सांगितलं की हा माणगाव फाटा आहे.गाव उजवीकडुन रस्त्याने ५किमी.
माझी दांडीयात्रा सुरू झाली.

आजुबाजुला धरणीने अप्रतीम हिरवीकंच शिफॉनची साडी..हिरवीपैठणी..हिरवी कांजीवरम साडी नेसलेली होती.

धरणीच पावसाळ्यातील हिरवा शालू  हा लग्नातील मुलीच्या जांभळ्या शालू प्रमाणे आउटडेटेड झालंय आता.लग्नातला मुलीचा जांभळाशालू नामक महावस्त्र) आणि मुलाचा राखाडी रंगाचा सूट हे फक्त आयुष्यभर कपाटाची शान वाढवतात.
फक्त लग्नाचा अल्बम हे जालीम शस्त्र घरी पाहुणे आले की त्यांच्यावर निघत असतं.

सरळसोट छोटा डांबरी रस्ता आणि आजुबाजुला दृष्टी जाईल तिथे हिरवा रंग सांडला होता.डोळ्यांना खुप आनंद मिळत होता.दोन दिवसांपासुनचा थकवा पळुन गेला.
लहानपणी पायात काटा खोल रूतला की तो काढताना आई हिरव्या रंगाकडे म्हणजे बाहेर अंगणात  झाडांकडे पाहायला लावायची.हिरवा रंगाकडे बघितलं की त्रास कमी होतो असं म्हणते.

पण खरंच आहे डोळ्यांना हिरवा रंग फार लाभकारी आणि आनंददायी.
आणि पांढरा रंग डोळ्यांना तितकाच  त्रासदायी अपायकारक.सतत फक्त पांढराच रंग बघत राहिल्यास डोळ्यांची शक्ती कमी होते.

 थोडं चालल्यावर आजूबाजूला काही उतरते कौलारू घरं दिसत होती .अंगणात गुलाबाची व पिवळी इतर वेगवेगळी फुलं.. ..वेल घरावर गेली होती.

मी कानात इअरप्लग्स अडकवून गाणे ऐकत चालू लागलो. मन्नाडे आणि भीमसेनजोशींचं माझं आवडत गाणं सुरु केलं "केतकी गुलाब जुही चंपक बन फूले...."

चालत चालत मंदिरापाशी येऊन पोहचलो.
प्रथम तिथे स्नान करून फ्रेश झालो.सुंदर शांत परिसर होता.येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी हिरव्यागार झाडीत राहायच्या खोल्या होत्या.एक दिवस आईबाबांसोबत गुरुचारित्र पारायणाला यावं ठरवलं.

ते टेम्ब्ये स्वामींच्या समाधीचे शतकीय वर्ष होतं.त्यामुळे कारंजा पासून गरुडेश्वर पर्यंत सगळीकडे उत्सव सुरु होते.आणि काहीही कल्पना नसताना मला इथे येता आलं.

 वासुदेवानंदसरस्वती , गोंदवलेकर महाराज हे समाजात लोकांमध्ये राहिलेत.त्यांचे चरित्र वाचताना छान वाटतं.पुस्तकातुन आधी वर्णन वाचलेल्या ठिकाणी गेल्यावर ती जागा पाहताना वेगळाच आनंद वाटतो.

 टेम्ब्ये स्वामींनी जन्मगाव नेहमीसाठी सोडण्यापुर्वी त्यांनी येथे दत्तमुर्ती स्थापित केली होती.त्यांचं जन्मस्थान आणि पुरातन कोंकणी पद्धतीच ग्रामदैवत यक्षिणी देवीचं मंदिर पाहुन आलो.त्या भागात छोटी चविष्ट केळी मिळतात ती खास घेतली .आणि आवारात फिरताना एकदम डोक्यात प्रकाश पडला की  टेंब्ये स्वामी ध्यान करायचे ती माणगाव ची जंगलातील डोंगरावरची गुहा इथेच तर आहे!

पुण्यातील एका प्रसिद्ध प्रकाशनाने
‬ टेंबे स्वामींचं संक्षिप्त चरित्र प्रकाशीत केलं होतं त्यात एक माणसाला ध्यान करताना त्या गुहेतील विलक्षण अनुभव विशद केला होता.

अश्या थ्रिलिंग जागेकडे मी साहजिकच जायचं ठरवलं.एकाला रस्ता विचारला त्याने मंदिरामागुन शेतातुन डोंगराकडे रस्ता जातो सांगितलं.

हिरव्यागार शेतातुन छोटीशी अस्पष्ट पायवाटेने मी काही फोटोज काढत निघालो.पण जसं जसं मंदीराचा भाग मागे पडत गेला आजुबाजुला किर्रर्र जंगल ..एकही माणुस दिसत नव्हता.डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो.वर जायला कुठलाही स्पष्ट रस्ता नव्हताच.
मनावर थोडं दडपण आलं होतंच.या भागाची काहीही माहिती नसताना इथे आलो होतो आणि आता एका पुस्तकात पाहिलेल्या गुहेच्या शोधात जंगलात शिरत होतो.

तसं बऱ्याच वर्षांपुर्वी मी असाच माहुरच्या वन्य प्राणी असलेल्या जंगलात फिरलो होतो तेव्हा तर जीवावर पुर्णपणे  बेतलं होतं अगदी थोडक्यात वाचलो होतो.ती घटना मी भाऊ अनुरागला सोडुन आजवर कोणालाच सांगितली नाही.

ते सारं आठवत होतं.मी वर दगडातुन झाडातुन गवतातुन वर जात होतो.एकवेळ वाटल वाघ आला तर !पण मग म्हटलं ह्या!! सह्याद्रीच्या जंगलात वाघ राहिलाच कुठे !
अस्वल आलं तर!!हे तर अत्यंत भयंकर वाईट जनावर!!!ह्याच्या लेखी चुकीला काय कशालाच माफी नाही!

साप,अजगर दिसला तर!कोंकणातले साप महाविषारी हे नेहमीच वाचत ऐकत आलो होतो.दडपण वाढलं होतं.
पण तरिही ती गुहा पाहण्याची तीव्र इच्छा होतीच.

बऱ्यापैकी वर चढलो होतो.आणि पुढे जायचा रस्ताच दिसेना.रस्ता असा नव्हताच.पण तोवर एक अंदाज येत होता.आता काय करावं कळेना.मागे वळून पाहिलं  उंचावरून आजुबाजुचा सर्व जंगलाने व्यापलेला परिसर दृष्टीस पडला!पावसाळा असल्याने सगळीकडे हिरवं घनदाट जंगल होतं.

एक बाल माकडांची टोळी जवळुन निघुन.गेल्या एक तासापासुन हे पहिलंच कुठल्याही प्राण्याचं अस्तित्व होतं.
मी निराश होउन परत जायचा विचार करत होतोच तेव्हा गवताने झाकलेल्या एका दगडावर लक्ष गेलं त्यावर केशरी रंगात गुहेकडे लिहुन बाण दाखवला होता.
मी योग्य रस्त्यावर होतो तर .पुढे जाताच स्टिलचे रेलिंग दिसलं.म्हणजे इथे लोक येतात तर!दडपण गेलं.

आणखी वर गेल्यावर थोड्याच वेळात गुहा दिसली.अगदी पुस्तकात होती तशीच!प्रचंड आनंद झाला!!
युरेका युरेका!!

गुहेच्या मुखापाशी आलो.पण आत जायची एकदम हिंमत होइना..आत काहीच दिसत नव्हतं.अंधार होता.

आत कोणता प्राणी ..वा साप वगैरे असेल का!
मुळात या भागाची काहीच माहिती नसल्यामुळे काही अंदाज येत नव्हता.पण इथवर आलोय ते असंच परत जाणार नाही.
हातातील बारकी काडी आत आपटुन थोडा आवाज करून आत कोणी आहे का याचा अंदाज घेतला.
काही क्षण थांबुन हळुच आत डोकावलं आणि आत शिरलो.

आत प्रशस्त स्वच्छ गुहा होती.आश्चर्य म्हणजे आत एक चटई आणि एक केरसुणी ही होती.म्हणजे येथे लोक नियमीतपणे येतात तर!मी एकदम निश्चिन्त झालो.

वरच्या भागात दगडी पादुका होत्या.
पंधरा वीस मिनिटे तिथे बसलो.जोरजोरात उत्साहात दिगंबरा दिगंबराचा..जप केला.गुहेचे फोटोज काढलेत.आणि परत निघालो.

खाली आलो तेव्हा मंदीरात सकाळी साडेअकराची आरती सुरू होती.ती संपल्यावर मस्तपैकी धरतीवरचं अमृत गुलाबीसर सोलकढी आणि भात पोटभर महाप्रसाद खाउन तृप्त झालो.

तिथुन लोकनाथतिर्थ महाराज या महान बंगाली योगींचे चरित्र पुस्तक विकत घेतले आणि परत बसने सावंतवाडीला आलो.

सावंतवाडीहुन संध्याकाळची पुण्याची बस होती.
समोर पाटीवर आरवली गावाची पाटी दिसली.मला हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं.आणि कोंकणातल्या भुतकथा आणि तिथले काही विचित्र मंदीरांच्या कथा नेहमीच वाचल्या होत्या. त्या गावचं #ते वेगळ्याच दंतगोष्टीसाठी प्रसिद्ध असलेलं वेताळाचं मंदीर आठवलं..विचार करू लागलो; जायचं का तिथेही!!!

-अभिजित दिलीप पानसे