Showing posts with label आमचे 'येथे' लघुकथा मिळतील. Show all posts
Showing posts with label आमचे 'येथे' लघुकथा मिळतील. Show all posts

Wednesday, 14 February 2018

हीच ती वेळ हाच तो क्षण"

त्यालाही ती आवडायची. ती ही त्याला हळूहळू लक्षात घ्यायला लागली. लवकरच तिलाही तो आवडायला लागला होता. शेवटी मागच्यावर्षी त्याने तिला औपचारिकरित्या प्रपोज केलंच. बरेच हिंदी चित्रपट बघितल्याने तिनेही गालावर दोन हात ठेवून सरप्राईजड झाल्यासारखं “ओह माय गॉड!” वाले भाव देऊन ‘हो’ म्हटलं होतं.
‘अशावेळी’ दोघांनाही किस करायचं होतं पण त्यांना प्रायव्हसी  मिळाली नव्हती.

आणि हेच त्याच्या महादुःखाचं कारण होतं. प्रायव्हसी न मिळणे!
वर्ष झालं पण दोघेही आपापल्या कामात, आणि मित्र आणि लोकांच्या गराड्यात !
 आजवर एकांत मिळाला नसल्याने दोघेही, विशेषतः तो वैतागला होता.

14 फेब्रुवारीला ती बऱ्याच महिन्यांसाठी शहराबाहेर जाणार होती. म्हणून दोघांनीही ठरवून तेरा फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे च्या आदल्या दिवशी सुटी घेऊन बाहेर भेटायचं ठरवलं.

 आज त्याने तिला ‘किस’ करण्याचा चंग बांधलाच होता! सोशिअल मीडिया अपडेट्सवरून आज “किस डे” आहे हे कळलं होतं.
वाह आज छान इंग्लिश मुहूर्तही आहे तर! तो स्वतःशीच खुष होता.
तिचीही ‘ना’ नसणारच होती.
“पण किस करणार कुठे?” हा प्रश्न त्याला नेहमीप्रमाणे सतावत होता.

संपूर्ण दिवस आज सोबत घालवायचा ठरवलं होतं.
त्याने क्लुप्ती लढवली, मुव्ही हॉलमध्ये तिला किस करता येईल म्हणून मुव्ही बघायचं ठरवलं! त्याने दुपारी तिला तिच्या बिल्डिंगखालून तिला पिक अप केलं. वर तिच्या मैत्रिणी फ्लॅटमेट्स असल्याने वर जाण्यात काहीच अर्थ नव्हता.

ती खाली आली. तीने नवा हेअरकट केला होता. कॅजुअल्समध्येही ती नेहमीप्रमाणे आकर्षक दिसत होती.
ते मॉलच्या पार्किंगमध्ये पोहचले. त्याने बाईक मुद्दाम बेसमेंटला पार्किंगच्या भागात अगदी शेवटी एका मोठ्या पिलरच्या मागे लावली. तो सतत संधीच्या शोधात होताच.
ती चेहऱ्यावरील स्कार्फ काढत असताना त्याने आजूबाजूला  सगळीकडे दृष्टी फिरवली. कोणीही दिसलं नाही. हीच ती वेळ हाच तो क्षण! तो तिच्या जवळ गेला. तिलाही ते अगदी अनपेक्षित होतं. तो तिला किस करणार तर …
“कौन है उधर पिछे! इतना टाईम क्यू लग रहा है पार्किंग मे!”

“हा बस चाबी गिर गयी थी! जा ही रहे है!”

तिथल्या सिक्युरिटीगार्ड ने त्याचं “मिशन चुंबन” काही पूर्ण होऊ दिलं नाही.
ती ही या सगळ्या मजेदार प्रकारामुळे हसत होती.

ते वरच्या मजल्यावर मुव्ही हॉलपाशी पोहचले. बस हीच ती जागा! जी अजरामर होणार आठवणीत! प्रथम चुंबन स्थळ!
कुठल्या तरी फ्लॉप मुव्हीचं तिकीट काढायचं त्याने ठरवलं होतंच.
पण सर्व चित्रपट याच आठवड्यात रिलीज झालेले.

“टू कॉर्नर सीट्स प्लिज !” त्याने काचेपलीकडील नेव्ही ब्ल्यू कॅप घातलेल्या मुलाला सांगितलं.
“सॉरी टॉपमोस्ट कॉर्नर सीट्स आर नॉट अवेलेबल!” ओन्ली एट मिडल सीट्स आर अवेलेबल!

अरेरे हे काय! ही संधीही जाते काय! बघू आत जाऊन तर!
पण काम-देवाचं नाव घेऊन त्याने उपलब्ध सीट्सपैकी दोन सीट्स बुक केल्यात.

आत संपूर्ण हॉल भरला होता. ते आपल्या सीट्स वर जाऊन बसलेत. हॉलमधील दिवे हळूहळू धूसर होत काळोखाची चादर पसरली. शेजारच्या आणि मागच्या जागेवर कोणीही नव्हतं. त्याला खूप आनंद झाला. तिलाही झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ती मात्र नॉर्मल होती.

 तितक्यात एक घोळका आला. एक मोठं कुटुंब आलं. त्यात काही वृद्ध बायका माणसेही होती. ते त्यांच्या मागे पुढे रिकाम्या आसनावर जाऊन बसलेत.
त्याचा पुन्हा हिरमोड झाला.

पण तिचं अगदी निकटचं सानिध्य अनुभवताना तो रोमांचित झाला होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. बस आता वाट बघायची होती नेमक्या क्षणाची!
लोक चित्रपट बघण्यात गुंग असताना ,हीच ती वेळ हाच तो क्षण , तो तिच्या अगदी निकट पोहचला. त्याने हळूच मागे वळून बघितलं तर मागे दोन म्हातारे भिंगाच्या चष्म्यातून एकटक समोर याच्याकडेच बघत होते.
तो एकदम शरमून बाजूला झाला.
संपूर्ण चित्रपट त्याने चरफडत त्या दोन मागच्या आजोबांसोबत आणि शेजारच्या सतत आवाज करणारया चिल्लर पार्टी मुलांसोबतच बघितला.

एकदाचा रटाळ चित्रपट सम्पला. दोघे बाहेर आलेत. मग मॉलमध्ये गप्पा, इकडे तिकडे फिरून झालं पण त्याला प्रायव्हसी काही केल्या मिळत नव्हती. त्याचं लक्ष बाकी कश्यातच नव्हतं. तिची घरी परत जायची वेळ आली.
सगळ्यात वरच्या मजल्यावरून खाली जाताना येताना त्याच्या डोक्यात एक अजून अनप्रॅक्टिकल आयडिया सुचली. कॅप्सूल लिफ्ट ऐवजी त्याने नॉर्मल लिफ्टने खाली जायचं ठरवलं.

आह वाह संपूर्ण लिफ्ट रिकामी! आत ते दोघेच!
त्याने ‘G’ च्या लाल बटणावर दाब दिला. लिफ्ट खाली जाऊ लागली.
“बस साठ सेकंदस है तुम्हारे पास , इस साठ सेकन्ड्स में अगर तुमने किस कर लिया तो ये साठ सेकंदस जिंदगी भर तुमहें याद रहेंगे! “तो स्वतःला मनातल्या मनात बजावू लागला. ती मात्र त्याच्या या क्लुप्तीपासून अनभिज्ञ होती.
हीच ती वेळ हाच...
 त्याने तिला हळूच जवळ घेण्याचा प्रयत्न केला . तिने सरळ त्याला दूर केलं. “अरे काहीही काय सीसीटीव्ही कॅमेरा असतो लिफ्टमध्ये! ती विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात आठवत नाही का!

 ”हम्म.. त्यांचं त्या जाहिरातपासून सेटिंग जमलं..पण आपलं सेटिंग कधी जमणार!”
तो चरफडत स्वतःशी बोलत दूर झाला.

ते बाईकवरून तिच्या बिल्डिंगजवळ पोहचले. तो प्रवासभर नाराज होता. खाली बिल्डींगपाशी अंधार होता. झाडे वृक्षांमुळे ते जरा आडोश्यात उभे राहिलेत. त्याला पुन्हा संधी मिळाल्याची, हाच तो क्षण हीच ती वेळ असल्याची भावना झाली. “वृक्षवल्ली खरंच सोयरे असतात तरुण लोकांचे नाही! !” त्याने कामदेवाचं स्मरण करून तिच्या जवळ गेला.
तेवढ्यात एक माणूस बाईक थांबवून तिथे फोन वर बोलत राहिला.

त्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
“या देशात कोणी शांत चित्ताने एक किसही नाही करू शकत का!”

तिला तितक्यात एक फोन आला. तो नाराजीने तिला बाय म्हणत जाऊ लागला. त्याची नाराजी, दुःख तिला कळत होतं.
तिचं फोन वर एक मिनिट बोलणं झाल्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यात खट्याळ भाव आणत म्हणाली, “आज फ्लॅटमेट्स बाहेर गेले आहेत ट्रिपला! आज रात्री कोणीही नसणार वर! तू आज रात्री राहू शकतोस! आत्ता तिचाच फोन होता!”

शेवटच्या क्षणाला मरणाऱ्याच्या तोंडी अमृत पडावं आणि तो पुन्हा टवटवीत व्हावा अशी त्याची अवस्था झाली.
त्याने हवेत जोरदार उडी मारली त्याने! उडी मारून हवेत मागे पायाला पाय लावण्याचा हिरोची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला . पण जमले नाही. पायात पाय अडकून आपटायचा राहिला. पण आता त्याची कसलीच तक्रार नव्हती.
मिशन चुंबन आज शांतपणे, पूर्ण प्रायव्हसीमध्ये पूर्ण होणार होतं.

त्याला हॉलमध्ये बसवून ती तिच्या खोलीत गेली. आता त्याला घाईगडबड नव्हती संपूर्ण रात्र त्यांचीच होती! ती काही वेळाने बाहेर आली.
तिने गुडघ्यापर्यंत वन पिस घातलं होतं. केस ओलसर होते. हलकंसं लिपस्टिक लावलं होतं.
ती अत्यंत मादक दिसत होती.
त्याने तिला जवळ ओढलं. तिच्या मानेजवळील परफ्युमचा सुगंध त्याच्या गात्रा गात्रांना, संपूर्ण संवेदनांना पुलकित..जागृत करून गेला.

तो आणखी  तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा त्याने दोन्ही हाताने हलकंसा धरून तिला किस करण्यासाठी सावधान झाला! हो हो हीच ती वेळ हाच तो क्षण!

तिने त्याला दूर केलं.
“ यु गॉट प्रोटेक्षन नो?”

“भुकेला मागतो एक किस आणि देव देतो..” अशी त्याची मनातल्या मनात अवस्था झाली.

तो अगदी चेहऱ्यावर स्वतःबद्दल अभिमानाचे भाव आणून तिच्या दोन्ही खांद्याना दोन हाताने पकडत म्हणाला,
“ तु माझा हा मोबाईल बघितलास?  सहा महिने झालेत अजून त्याचं स्क्रीनकव्हर मी काढलं नाही! मी कधी हेल्मेटशिवाय गाडी चालवताना तुला दिसलो का?  नवी बाईक घेतली तेव्हा कित्येक दिवस तिचं कव्हर काढलं नव्हतं! मित्र त्याला काँडम कव्हर म्हणायचे..बाईकला व्हर्जिन बाईक म्हणायचे!  अगं प्रोटेक्शनशिवाय तर मी काहीच करत नाही! प्रोटेक्शन इज मस्ट!
रुबाबात पॅन्टच्या खिशातून त्याने प्रोटेक्शनचं पाकीट काढलं! तिला दाखवलं!

“ओह्हो”! ‘क्या बात है!”
तिनेच त्याला ओढून आपल्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर ढकललं. ती त्याच्या संपूर्णपणे जवळ आली..पुन्हा एकदा त्याच्या संवेदना जागृत झाल्यात..जोरदार उफाळून आल्यात..त्याला किस करण्यासाठी ती त्याच्या अगदी निकट आली.. बस्स हीच ती वेळ हाच तो क्षण!
ती त्याला किस करणार तितक्यात..
त्याने तिला थांबवलं..
“एक मिनिट! तू आज मला दुपारी भेटायच्या आधी काय खाल्लं होतं? तू जेवली होतीस का?”

“किती रे काळजी करतो माझी!
हो मी तेव्हा घरून फिश आणि चिकन करी खाऊन आले होते! आय एम फुल नाव!
त्याच्या ओठांवर बोट ठेऊन म्हणाली ,
“नाव डोन्ट टॉक ..जस्ट एन्जॉय धिस मोमेंट! वि हॅव ओन्ली वन नाईट फॉर अ लॉंग टाईम!”

त्याला किस करण्यासाठी त्याच्या चेहरा घट्ट तिने पकडला..कोणत्याही क्षणी त्याच्या आयुष्यातील त्याचं पाहिलं किस होणार होतं. दुष्काळ संपला होता. घनन घनन घन गिर जाये बदरा..पार्श्वसंगीत सुरू होतं.
आणि त्याने तिला त्याच क्षणी बाजूला केले . तो उठून बसला.

“काय तू आज चिकन खाल्लंस!
आज महाशिवरात्रीचा मला उपास आहे! मी तुला किस नाही करू शकत! माझा उपास मोडेल ना!
जातो मी! जय शंभो! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
बाय!

आणि तो तडक निघून गेला. तीला काही कळेनासं होऊन ती बघत राहिली!
 आज दुसऱ्यांदा शंकराने कामदेवाला भस्म केलं होतं.

समाप्त.

#किसडे #महाशिवरात्रीपेशल.
१३ फेब्रुवारी 018

-Abhijeet Panse

Saturday, 30 December 2017

अन्नासाठी दाही दिशा


*अन्नासाठी दाही दिशा*


त्या राजाने जनतेचे प्रश्न ऐकायला दररोजप्रमाणे दरबार भरवला होता.जिर्ण मळक्या कपड्यातला एक वृद्ध भिकारी थरथरत्या हाताने काठी टेकवत दरबारात राजापुढे आला आणि अन्नाची याचना करू लागला.

राजाच्या लक्षात आलं की हा भिकारी काही दिवसांपासुन दररोज अन्न मागायला येतोय.
राजा कुत्सितपणे त्या भिकाऱ्याला म्हणाला ;
 "रोज रोज असं भोजन मागायला तुला जराही लाज वाटत नाही ?

तो भिकारी शुन्य भावनेने राजाकडे बघत बोलु लागला; "राजा लाज ही मनात असते.आणि मन हे #ह्रदयात असतं.
'ह्रदय' हे 'पोटाच्या' वर असतं.
आणि पोटात अग्नी असतो.
दरवेळी तुझ्याकडुन अन्न घेताना माझं ह्रदय लाजेने भरून जातं.म्हणुन मी ठरवतो पुन्हा तुझ्याकडे अन्नाची याचना करायची नाही!
पण काही वेळाने माझ्या पोटातील #जठराग्नी पेटुन उठतो.स्वाभाविकपणे अग्नीच्या ज्वाळा या #वरच्याच दिशेने जातात.
त्यामुळे पोटातील पेटलेला अग्नी माझ्या ह्रदयातील लाजेला जाळुन टाकतो.आणि मी निर्लज्ज होउन पुन्हा तुझ्याकडे अन्नाची याचना करत येतो.

त्या वृद्ध भिकाऱ्याचे हे शब्द ऐकुन राजा गदगदुन गेला. आणि राज्यातील सर्व परावलंबी वृद्धांना दररोज भोजन देण्याचं आणि राजवाड्यापासुन संपुर्ण राज्यात कुठेही अन्नाची नासाडी झाल्यास दंड करण्याचे फर्मान काढले.

(International Food Day)
आंतराष्ट्रीय अन्न दिवस निमित्ताने)

-अभिजित दिलीप पानसे

Tuesday, 14 November 2017

'He' too



                             * 'He' Too *

नुकताच बारावीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यामुळे निनाद कॉलेजमधील ऍडमिशनच्या प्रक्रियेत गुंग होता. सहा फूट उंच, मिसरूड फुटलेला फुटबॉलपटू असल्याने शारीरिकरित्या तगडा आक्रमक होता.  रविवार असल्याने सकाळी खेळून आल्यावर त्याने बाईक बिल्डिंगच्या त्याच्या पार्किंग भागात लावली.
 समोरच्या गार्डनमध्ये सोसायटीतील मुलं फुटबॉल , प्लास्टिक बॅट ने क्रिकेट खेळत होती. त्यांच्यातील
 भांडणामुळे , रडण्यामुळे त्याचं लक्ष तिकडे गेलं आणि त्याला धक्काच बसला. सोसायटीतील चवथीतील अंबरने आऊट झाला म्हणून चिडून चक्क बॉलिंग करणाऱ्याला मुलाला "मधलं बोट" दाखवलं.

ते बघून निनादला हसू आलं, वाईट ही वाटलं, आश्चर्यही वाटलं. कुठून शिकतात ही छोटी मुलं ही भाषा आणि या 'हस्तमुद्रा'!

तेवढ्यात त्याचं लक्ष एकटाच मोठी चॉकलेट कॅडबरी खात बसलेला अनयकडे गेलं. त्याची आई लहान मुलांना चॉकलेट्स देण्याच्या विरुद्ध असलेली निनादला माहिती होतं.
त्याला आठवलं तीन दिवसांपूर्वीही अनय मोठं चॉकलेट खाताना बिल्डिंगबाहेर दिसला होता.

थंडीत घरात जाण्याऐवजी थोडं ऊन खावं म्हणून निनाद सहज अनयजवळ बाकड्यावर जाऊन बसला. निनादला बघताच अनय काहीसा दचकला. तो अनयशी गंमतीने गप्पा करू लागला. कॅडबरी कोणी दिली हेही विचारलं. तेवढ्यात निनादला मित्राचा फोन आल्याने तो फोनवर बोलत त्याच्या घरी गेला.

दुपारी जेवण झालं..झोपला..संध्याकाळी  हातात कॉलेजचे प्रोस्पेक्ट्स चाळताना दुपारी अंतर्मनात शिरलेला विचार अचानक त्या शांत क्षणाला मनाच्या पृष्ठभागावर तरंगला.
 त्याला आठवलं दुपारी अनयशी बोलताना तो अस्वस्थ तर वाटला शिवाय तो सतत त्याच्या गुप्तांगाला स्पर्श करत होता.

निनाद खाली पार्कमध्ये गेला . तिथे मुलं खेळत होती, काही मोठी माणसे चालत होती. वृद्ध लोक बाकड्यावर बसले होते .

काही छोटी मुले घसरगुंडीवर घसरत होते. मात्र अनय उकिडवे बसून हातातील छोट्या काडीने गवत उकरून मातीशी खेळत होता.
निनादही त्याच्याजवळ बसुन गंमतीने गप्पागोष्टी करू लागला.
सहज विचारल्या सारखे वाटावे अश्या पद्धतीने त्याने विचारले ,"तुला सकळी चॉकलेट कोणी दिलं होतं?"

"साहिल दादाने!" अनयने एक क्षण थांबून खाली बघतच बोटाने गवत उपटून काढत उत्तर दिले.

हा कोण? कुठे राहतो?

"त्या बिल्डिंगमध्ये!" समोरील इमारतीकडे बोट दाखवत बोलला.

तुझी त्याच्याशी कशी ओळख झाली? तो का देतो तुला इतके चॉकलेट्स नेहमी?

"अनय काही बोलला नाही.
तुझ्या आई बाबांना सांगू का तू बाहेर चॉकलेट्स खातो ?"

"नाही नाही प्लिज नको सांगू  आईला!"

"मग मला सांग नीट सगळं!"

अनय काही बोलला नाही. त्याच्या निरागस चेहऱ्यावरील ताण , गोंधळ ..सांगावं की नाही सांगावं ..कसं कोणत्या शब्दात सांगावं ..हा सारा गोंधळ जाणवत होता.

निनाद ने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत सगळं सांग मी कोणाला नाही सांगणार म्हणत त्याला हळूहळू बोलतं केलं.

त्यानंतर अनयने जे सांगितलं त्याची त्याला थोडी कल्पना आली होती. पण त्या गोष्टीची तीव्रता इतकी असेल याचा विचार केला नव्हता.

"साहिल दादा बाईकवर फिरवून आणतो!

त्याच्या घरीही नेतो..

पण..
 तो माझ्या सुसूला हात लावतो. .

निनाद चा चेहरा कठोर झाला होता ते ऐकताना.
"अजून काही करतो का तो?"

...तो...हो...तो त्याच्या सुसूलाही हात लावायला लावतो मला ! मला नाही आवडत तरी कधीकधी तो जबरदस्ती करतो! मला घाण वाटतं ..कारण थोड्यावेळाने माझा हात चिकट होतो..

मग तो जाताना मला आवडणारे चॉकलेट्स, आईसक्रीम देतो. .

अनयला बोलतं केल्यावर त्याचं सगळं बोलणं ऐकून साहिलचा संताप संताप होत होता.

"आणखी काही केलं नाही ना त्याने तुला?"

" त्याने माझ्या शी करण्याच्या जागेलाही टच केलं..तिथे दुखतं आता!

निनादच्या आता संतापाचा ज्वालामुखी फुटला होता.
स्वतःवर नियंत्रण ठेवत तो अनयशी बोलला,
"मी बोलतो त्या साहिलशी ! पण तू पुन्हा त्याच्याशी बोलू नकोस..काही झालं तरी त्याच्याकडे यानंतर जायचं नाही! कळलं ?"

"नाही नाही तू प्लिज मी तुला सांगितलं हे त्याला सांगू नकोस! पहिले तो प्रेमाने बोलायचा माझ्याशी पण आता कधीकधी तो मला रागावतो! कोणाला सांगू नकोस नाहीतर मारेन म्हणतो!"

"बरं त्याच्याशिवाय आणखी कोणी तुला काही चॉकलेट आईस्क्रीम देतं का..हे सगळं करायला लावतं का?"

"नाही फक्त साहिल दादाच!"

निनादने अनयला धीर देऊन घरी पाठवले.
आणि आपल्या फुटबॉल टीममधील मित्रांना फोन करून ताबडतोब बोलावलं.

रात्री नऊ वाजता, त्या इमारतीमधील फ्लॅटमध्ये  तिघे जणं नोकरीनिमित्त वर्षभरापासून राहायला आले होते त्यात घुसले. साहिलला त्यांनी लाथाबुक्क्याने तुडवला. त्याच्या मित्रांनाही त्याच्या सगळ्या काळ्या कृत्याबद्दल सांगितलं. पोलीस कम्प्लेंट करतो म्हटल्यावर साहिल गयावया करू लागला.
"भडव्या पुनः या सोसायटीमध्ये किंवा कोणत्या लहान मुलांसोबत दिसला तर कापून टाकेन! तुला नाही तुझ्या ****!

 रात्रीतून त्याला जागा सोडायला सांगितली.

 मित्रांनी निनादला विचारलं तुला कसं कळलं हे!

"मला तू  तुझ्या लहानपणी तुझ्या कोण्या नातेवाईकाने तुझं लैंगिक शोषण केलं होतं सांगितलं होतं ना! शिवाय आणखी एक दोन मित्रांनी त्यांच्याबद्दल ,त्यांच्या मित्रांचेही असेच ओळखीच्या लोकांनी, भावाच्या मित्रांनी ,  सोसायटीत मोठया मुलांसोबत खेळणाऱ्या मुलांपैकी कोणी असली छळवणूक केल्याची उदाहरणे सांगितली होती म्हणून मला संशय आला!

निनादने त्याच्या एका समजुतदार मैत्रिणीलाही बोलावून घेतलं . तिला थोडक्यात सगळी परिस्थिती समजावून सांगून ते सर्व मित्र अनयच्या घरी गेलेत.
 त्याच्या आई बाबांना समोर बसवून प्रथम आम्ही जे काही सांगणार आहोत ते शांतपणे समजून घ्या म्हणालेत.
अनयमध्ये काही बदल त्यांना जाणवला का विचारल्यावर त्याच्या आईने सांगितलं की हो आजकाल अनय सतत घाबरायचा.अस्वस्थ वाटायचा..शी ला जायला टाळाटाळ करायचा.. शी धुताना तेथील स्पर्शानेही अस्वस्थ व्हायचा..नीट बसायचा नाही तो !
 तेव्हा निनाद आणि मित्रांनी त्याच्या आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितला.

ते ऐकून त्याची आई रडू लागली.
वडिलांनी चिडून पोलिसात तक्रार करायची ठरवलं.

"मुलांसोबत ही असं होऊ शकतं यावर विश्वास ठेववत नाही हो!अनय ची आई रडत बोलली.

"ताई हा खूप जणांचा गैरसमज आहे की फक्त मुलींचंच लहानपणी शोषण केलं जातं मुलांचं नाही! विकृत लोक कोणतंच लिंग पाळत नाहीत!
लहान वयात कित्येक मुलांचं त्याच्या काका, मामाने, भावाच्या मित्राने, कुल्फी बर्फगोळा विकणारे., वॉचमनने.. अगदी ट्युशनच्या शिक्षकानेही लैंगिक शोषण केल्याच्याही घटना घडल्या आहेत.

"Me too" नावाने स्त्रिया , मुली सोशिअल मीडियावर लैंगिक शोषणाचे आपापले वाईट अनुभव सांगतात. पण मुलं कधीच त्यांचे हे बालपण नासावणारे वाईट अनुभव सांगत नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना याबद्दल कल्पना नाही!

मैत्रीण म्हणाली , "ताई यासाठीच आईने आपल्या मुलांना स्पर्शाची पारख शिकवावी. योग्य आणि अयोग्य स्पर्श ओळखणे शिकवावं. आणि आजची लहान मुलं खूप हुशार आहेत, त्यांना नीट समजावून सांगितलं की त्यांना सगळं समजतं! एक उपजत सेन्स मुलांच्यात असतोच योग्य स्पर्श ओळखण्याचा! आपण फक्त त्यांना त्यांच्या भाषेत नीट सूचना देऊन त्या सेन्सला ऍक्टिवेट करावे"

"बरेचदा परिसरातील मोठ्या मुलांसोबत लहान मुलं खेळतात. काहीवेळा हेच वयाहून मोठी असलेली बाहेरची मुलं लहान मुलांना बिघडवतात..किंवा त्यांचा असा छळ, शोषण करतात! म्हणूंन आई वडिलांनी मुलगा कोणासोबत जास्त वेळ घालवतोय..खेळतोय याकडे लक्ष  ठेवावं.."

अनयची आई ते सगळं ऐकून ओक्साबोक्शी रडू लागली. वडील चिडून पोलिसात तक्रार करण्याची तयारी करू लागलेत. अनय शाळेतील होमवर्क करण्यात गुंग होता.

-अभिजीत पानसे

Thursday, 26 October 2017

गेला यम कुणीकडे!

परवा भाऊबीजेला..जिला "यम द्वितीया"  ही म्हणतात, सकाळपासून यम म्हणजे गॉड ऑफ डेथ गायब झाला होता. त्याच्या बहिणीने यमुनेने त्याला फॅमिली वॉट्सअप ग्रुप वर "हॅप्पी भाऊबीज यम ब्रो"  मेसेज टाकला. वडील सूर्यानेही कौतुकाने त्यावर मेसेज केला. पण यमाचा काहीही रिप्लाय नाही.
 तिने दुसऱ्या भावाला शनीला फोन केला. त्याने नेहमीप्रमाणे फोन उचलला नाहीच.
त्यालाही '' हे हॅपी भाऊबीज बिग ब्रो शनी!" मेसेज करून यमाबद्दल काही माहिती आहे का विचारलं. पण शनीने काही रिप्लाय केला नाही.

इंद्राने त्या संध्याकाळी खास रॉयल डान्स इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. पण यम हरवण्याची बातमी समजताच त्याने सर्व कार्यक्रम रद्द केलेत. आणि काळजीत पडला.
त्याच्या आज्ञेनुसार सगळे देवगण त्यांचे सबऑर्डीनेटस यमाला शोधू लागलेत.

इंद्राने यमाला शोधण्यासाठी देवगणांना यमाच्या मोठ्या टोलेजंगी राजवाडा बंगलोमध्ये शोधायला पाठवले.
आजवर इंद्र काय कोणीही यमाजी पंतांच्या रॉयल बंगलोला भेट दिली नव्हती. नियमितपणे यम आपल्या ऑफिसलाच येत असल्याने शिवाय कधीही रजा न घेत असल्याने कोणालाही त्यांच्या बंगलोमध्ये जाण्याची 'वेळ' आली नव्हती.
पण इतर देवांप्रमाणे यमाचाही लक्झरिअस टोलेजंग बंगला असेलच हे माहिती होतं.

"डेड एन्ड गल्लीत" यमाजीपंतांचं अगदी साधंसं छोटंसं घर होतं. घराच्या बाहेरील भिंतीवर नाव घराचं नाव होतं "रेस्ट इन पीस."
राहणीमान अगदी साधं असायचं त्यांचं.
घराबाहेर गोठ्यात यमाचा जाडा काळाभिन्न रेडा कडबा, गवत खाऊन झाल्याने रवंथ करीत बसला होता.

 यमुनेने संपूर्ण घर धुंडाळलं पण यमाजी पंत आपल्या सदनिकेत नव्हते.
तेवढ्यात यमुनेचा सेल वाजला.
त्यावर शनीचा बराच उशीरा मेसेजला रिप्लाय आला होता. यमुनाबाई मनात बोलल्या "तसाही हा शनी त्याच्या दिरंगाईसाठी प्रदिद्ध आहेच. प्रत्येक गोष्टीला उशिरा करतो. पण चला किमान रिप्लाय आला .
यमुनेने मेसेज वाचला, "यमुने मी माझ्या कामात व्यस्त असल्याने यमुने मला यमाबद्दल  काहीही माहिती नाही. त्यामुळे मी काहीही तुला सांगू शकत नाही!
आणि मला "हॅप्पी भाऊबीज..दिवाळी " सारखे  मेसेजेस मला पुन्हा पाठवू नका! या भावनिक अटॅचमेन्ट गोष्टीत मला रस नाही! तुम्ही लोक तुमचं काम करा मला माझं करू दे!
-तुझा ज्येष्ठ भ्राता शनी सूर्यवंशम!"

यमुनेला शनीच्या या अश्या रुक्ष रिप्लाय ची कल्पना होतीच तरीही तिला यावेळी जरा जास्तच वाईट वाटले.
शेवटी थोडी शोधाशोध करून यमुना आपल्या  उत्तराखंड ..दिल्ली..मथुरा आणि अलाहाबाद प्रयाग अश्या रूटने वाहायला परत गेली.

इकडे देवगण मात्र घाबरलेत जर यम कुठेतरी निघून गेला झाला तर कसं करायचं! आपल्या बॉसेस ला काय सांगायचं!
 त्यांनी 'विष्णूला' यम गायब झालाय सांगण्याचं ठरवलं. पण लक्षात आलं की विष्णू तर अजूनही निद्रेत आहेत. त्यांना उठायला अजून सात आठ दिवस बाकी आहेत. निद्रेतून जागे झालेत की प्रथम ते तुळसीसोबत विवाहाच्या तयारीला लागतील. तो येऊ घातलेला एक मोठा इव्हेंट आपल्याला मॅनेज करायचाय त्यात आता यमाचा इश्यू झालाय.

एका देवाने सुचवलं," देवाधिदेव महादेवांच्या कानी घालायचं का?"
तर इंद्र बोलला " नाही ! महादेव अश्या डोमेस्टिक गोष्टीत लक्ष घालत नाहीत! देवराष्ट्रावर वा पृथ्वीवर काही प्रचंड संकट, इमरंजन्सी आली तरच त्यांना हेल्प मागायची असते!
नाहीतर उगा आपल्यावरच त्यांची थर्ड आय ओपन व्हायची!

इंद्राने सगळ्यांना यमाच्या शोधास पाठवले.
सगळयांना काळजी वाटू लागली यमाची!
शेवटी यम हरवला कुठे?

बराच शोधानंतर एका देवगणाने इंद्राला त्याच्या 'गॉडाफोन' 33G कनेक्शनवरून फोन करून सांगितले की त्यांना यम एका निबिड अरण्यात एका तळाकाठी दगडावर बसलेला दिसला आहे.


घनदाट अरण्यात एका तळ्याकाठी पसरट दगडावर यम दोन पाय खाली करून बसला होता. सोन्याचा मुकुट खाली दगडावर आ वासलेल्या स्थितीत पडला होता.
दुरुनही त्याचा निरुत्साही निस्तेज नाराज चेहरा दिसत होता.
शून्यात नजर लावून म्लान चेहऱ्याने तळ्यात उमटणाऱ्या तरंगाकडे बघत होता.

यमाची दुःखी मुद्रा बघून समोरील तळ्यातून "जल महाभूत" उभं ठाकलं.
"यमराज हे काय बघतोय मी तुम्ही आज दुःखी मुद्रेत! तुमच्यासारखे रुबाबदार , कणखर व्यक्तिमत्त्व आज असं का मलूल झालंय?
कोणतं दुःख आहे तुमहाला?

यम एक दीर्घ उसासा टाकून जल महाभूताला अभिवादन करत बोलला, " संपूर्ण मानव जात माझा तिरस्कार करते! इतर सर्व देवगणाची पूजा होते, त्यांची स्तुती गायली जाते, स्तोत्रे म्हटली जातात! पण माझा मात्र सगळेच दुस्वास करतात!
 माझ्यासाठी नेहमीच राग, अस्वीकार्यता, असंतोष असतो! मी यामुळे खूप दुःखी आहे. माझा कुठेच जयजयकार होत नाही.
म्हणून मी जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्याने इथे दूर येऊन बसलोय.
तुम्ही जीवन.. जल आहात! तुमच्यामुळे मात्र जीवननिर्मिती होते आणि माझ्यामुळे...पुढे भावना अनावर झाल्याने काहीही न बोलता निराशेने यम खाली दगडकडे बघत राहिला.

जल महाभूत यमाचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ जाऊन बोललं, "यमराज तुमच्या दुःखाचं कारण मला कळलं .
ऐका, तुम्ही म्हणता मी जीवनाचा कारक आहे .
पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. मी जीवन निर्मिती करतो तर तुम्ही त्या निर्मितीला योग्य आणि अत्यन्त आवश्यक असा पूर्णविराम देता.
'बदल' हे जसं शाश्वत सत्य आहे तसंच
प्रत्येक गोष्टीला 'शेवट' असणे हेही त्रिकालाबाधित सत्य आहे.
आणि या दोन्ही गोष्टीशी तुमचा जवळचा संबंध आहे.
तुम्ही मृत्यूचे कारक आहात .त्यामुळेच निर्मितीप्रक्रिया अविरत सुरू राहते. आणि निर्मितीमध्ये कालानुरूप योग्य अयोग्य ते बदल होत राहतात.
"Diversity in the unity" कायम राहते.

जल महाभुताचे ते बोलणे काळजीपूर्वक ऐकतानाच तिथे "वायू महाभूत " हजर झाले. यावेळी नैऋत्य मान्सून उशिरापर्यंत टिकल्याने वायू ला ही बराच ओव्हरटाईम करावा लागला होता. आता काही महिने तरी किमान हिवाळा उन्हाळा संपेपर्यंत मे महिनीच्या अखेरपर्यंत निवांत विश्रांती घ्यावी म्हणून तो आता निद्रावस्थेत जाणार होता. फेब्रुवारीत अवकाळी पाऊस , वादळ वारा निर्माण करायला वायूचे जुनीअर्स होतेच.

"आरं आरं यम भौ तुम्ही हिकडं कुणीकडं? तिकडं तुम्हास्नी देवलोक हुडकून ऱ्हायलेत ना!
वायू यमाच्या पायाला नमस्कार करत बोलला.

यमानेही वायूला कसेनुकसे हसून अभिवादन केले.
वायूने यमाला काय झालं म्हणून विचारलं. सर्व वृत्तांत कळल्यावर वायू बोलला, " यम देवा तुम्ही असे दुःखी कष्टी होऊ नका! तुम्ही आम्ही फकस्त आपापले कामं करतोय!आपल्याला त्या जगननियंता निसर्गाने अपॉईंट केलं हाय! जल देव ,मी ,अग्नी आणि तुम्ही स्वतः हे सर्व एकाच शिष्टीमचे भाग हाओत!
तुम्ही हात म्हणून आम्हला महत्व हाये.
 मान्सून महाराष्ट्रात लांबल्याने वायूने गावरान भाषा शिकली होती त्यातच तो बोलत होता.

'अग्नीचा' नामोच्चार झाल्याने तो ही तिथे यमशोधार्थ प्रकट झाला.
अग्नीला ही यमाची सर्व मानसिक स्थिती कळल्यावर तो बोलू लागला.
"यम देवा विध्वंसाबद्दल सगळ्यांचंच मन कलुषित आहे. सगळेजण विध्वंसाला घाबरतात, नाश होण्याला नावे ठेवतात. पण नष्ट होणे , कोणत्याही गोष्टीचे रूप  पालटणे हे महत्वाचे आहे.
मी सगळं काही नष्ट करू शकतो म्हणून पुन्हा उत्पत्ती होत राहते.
बघा ना स्वयंपाक घरात मी पदार्थांना त्यांच्या मूळ रूपाला नष्ट करतो आणीन स्वादिष्ट आणि पचवता येतील असं अन्न निर्माण करतो. तरीही लोक मृत्यूला, नाशाला वाईट समजतात."

 हे सगळं बोलणं सुरू असतानाच एरवी शांत सहनशील असलेलं पण क्वचितच कोपल्यावर मात्र हाहाकार उलथापालथ घडवणारं  पृथ्वीतत्व तिथे हजर होत बोलू लागलं,
"यमराज तुम्ही आहात म्हणून माझं पर्यायाने जीवसृष्टीचं अस्तित्व टिकून आहे. तुम्ही योग्य कर्म करीत आहात! जर मृत्यू नसता तर पृथ्वीवर जीवन माजलं असतं ! मी तरी किती भाजीपाला, झाडे , खनिजसंपत्ती उत्पन्न करणार! तुम्ही नसता तर लोक भुकेने तडफडत राहिले असते. पण मेले नसते! सर्व खनिज, खाद्य संपत्तीचा तुटवडा पडला असता! जीवन हे शाप ठरलं असतं!
तुम्ही संपावर जाण्याची आणि त्यानंतरच्या परिणामाची कल्पनाही करवू शकत नाही!
यमा, मृत्यू आहे म्हणून जीवनाची क्षणभंगुरता कायम आहे,तुम्ही आहात  म्हणून जीवनाचे मोल आहे. मृत्यू आहे म्हणून जीवनाचे महत्व आहे. तुम्ही आहात म्हणून पृथ्वी सुंदर आहे.

मगावसून सर्व संवाद ऐकत असलेलं सर्वच ठिकाणी कायम अस्तित्व "मैं समय हुं" फेम "आकाश तत्व" तेव्हा कुठल्याही रुपात अवतीर्ण न होता फक्त 'वाणी' रुपात बोललं,
"हे यमदेव सर्व जण मृत्यूला घाबरतात म्हणून तर अजूनही कुठंतरी सात्विकता टिकून आहे! फक्त गोडबोले शिक्षक नाही तर कडक, शिक्षा देणारे मास्तर ही गरजेचे असतातच!
जखम झाल्यावर फक्त फुंकर मारणाऱ्यांपेक्षा जबरस्तीने त्या जखमेचं ड्रेसिंग करणारा डॉक्टर महत्वचा असतो.

आणि  मृत्यूबद्दल सगळयांना गैरसमज आहे की मृत्यू हा वाईटच असतो. पण सत्य हे आहे की मृत्यू ही जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट आहे फक्त तो स्वतःहून यायला हवा! हां मात्र स्वतः त्याला कवटाळण्याचा प्रयत्न केल्यास मात्र शिक्षा मिळते.
मृत्यू बद्दल गैरसमज आहे म्हणून तो दुःखाचा कारण समजल्या जातं. खरे तर ज्याचा मृत्यू होतो तो सुखी होतो त्याचे आप्त फक्त त्या व्यक्तीच्या 'वियोगाने' दुःखी होतात आणि मृत्यूला नावे ठेवतात.
या जगात मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. यमा तुमच्यासारखा प्रामाणिक मित्र नाही. तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत असतोच! तो मिठी मारतोच."

यम द गॉड ऑफ डेथ, पाचही महाभूतांचे ते ज्ञानयुक्त कॉन्सलिंग ऐकून त्यांचा निरुत्साह , नैराश्य, तक्रारी दूर पळाल्यात. ते पाचही महाभूत त्यांचे सोबती होते. कारण मृत्यू झाल्यावर शरीराला कोणी 'अग्नीच्या' हवाली करतं, कोणी 'जमिनीत' पुरतं, कोणी 'नदीत' टाकतं, कोणी उघड्यावर पशु पक्ष्यांच्या हवाली करतं .

यमाजीपंत आता पूर्वीसारखे तेजस्वी दिसु लागलेत. मळभ दूर झालं. खाली पडलेला सोन्याचा मुकूट पुन्हा धारण केला. नुकत्याच ट्रिम केलेल्या भरदार मिशीला पिळ देताना मनात  विचार आला आता हे पारंपरिक मिशिवालं,  सोन्याचा हेल्मेट हे राकट रूप त्यागावं आणि स्मार्टफोन, सोशिअल मीडियाच्या काळात जरा मॉडर्न व्हावं.

तोवर त्यांचं पारंपरिक वाहन त्यांचा गुटगुटीत रेडा हजर झाला होता. आपल्या गॉडाफोन 33G कनेक्टिव्हिटी असलेल्या सिमकार्ड सेलवरून इंद्राला मेसेज टाकला, "आय एम कमिंग टू द ऑफिस! नो मोर ब्ल्यूज! हॅपी दिवाळी"

-अभिजीत पानसे

Tuesday, 20 June 2017

वारीची चंद्रकोर, रमजान महिना, निर्गुण निराकार ईश्वर

* दिवेघाटातील सगळ्यात कठीण दिवस , नैसर्गिकरित्या तयार झालेली #चंद्रकोर आणि #रमजानमहिना! *


वारीचा आजचा तिसरा दिवस, संपूर्ण प्रवासातील सगळयात कठीण दिवस..मोठे अंतर.. घाटाचा प्रवास..एकादशीचा उपास..
पुण्याहून निघालेली माऊलींची पालखी दुसऱ्या दिवशी सासवडला बंधूंचे दर्शन घेणार असते.

पण उपाशी पोटी घाटाची चढण कसोटी बघणारी असते..
नवखा तरुण वारकरी ताणात असतो..
शरीरानेच वृद्ध अनुभवी वारकरी नवख्या तरुणाला #माऊलींवर विश्वास टाक म्हणतो, म्हातारा लहान नातीला खांद्यावर बसवून चालू लागतो, म्हाताऱ्या डोक्यावर तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळ्यात समोर गेलेल्याही असतात..

तरुण नवखा वारकरी हे बघून ओशाळतो..फक्त #स्पिरिचुअलट्रेकिंग म्हणूनच आणि सोशल मीडियावर सतत चेक इन करणारा तो फोटोज टाकण्यासाठीच आलेला असतो..भक्ती वगैरे काही नसते..

लूक योग्य साजेसा यावा मिळावा म्हणून कपाळावर उभं गंध लावतो, कानात इअरफोन्स घालून मोठया आवाज वाढवून गाणे ऐकत अधून मधून मोबाईलने फोटो काढत, शूट करत चालू  लागतो..
स्वतःचं आधुनिकत्व दाखवत , इतर वारकर्यांनमध्ये मनाने  मिसळत नाही..तोंडाने माऊलीचं नाव घ्यायला लाज वाटत असते.

सूर्य ढगात लपंडाव करत असतो..घामाच्या धारा लागलेल्या असताना अचानक आभाळातून पर्जन्य धारा बरसू लागतात..

दिवेघाटात पालखी येते..शिस्तीने रस्त्याच्या एका बाजूने वारी जाऊ लागते..रस्त्यावरची पुण्याहून निघालेली, पुण्याकडे जाणारी वाहनातील लोकही कौतुकाने भक्तीने नमस्कार करतात..

घराच्या मागील गल्लीत जाण्यासाठीही गाडी काढणाऱ्या तरुणाची घाटात छाती फुलू लागते..
म्हातारे म्हातारी नाम घोषात, आजूबाजूची सृष्टी ..वारकरी नामघोषात मग्न असतात..

तरुण वारकऱ्याच्या तोंडीही नकळत नाम येऊ लागतं.
कानातील एअर प्लग्स काढून ठेवतो..
आजूबाजुला सृष्टी हिरवीगार झालेली असते..मोबाईलने अधून मधून वारीचेफोटो काढत , सुरकुत्यांचं जाळं पसरलेल्या एखादया जख्ख म्हाताऱ्या वारकऱ्या सोबत   सेल्फी काढत सोशल मीडियावर टाकत राहतो..
घाटात एकाठिकाणी सहज वरती जाऊन अंमळ  विश्रांती घ्यायला आणि "बेटर व्यू" साठी नुकत्याच घेतलेल्या डीएसएलआर ने फोटो काढायला जातो..

वरून जे दृश्य दिसतं त्यामुळे त्याच्या अंगावर शहारे येतात..वरून अंतरावरून बघतांना मानवी चंद्रकोर झालेली असते..वर #ताऱ्याप्रमाणे तळ्याचं टिम्ब ही दिसतं..मुलगा निसर्गाच्या, निर्गुण निराकार ईश्वराच्या दर्शनामुळे चाट पडतो..अष्टसात्विक भाव उचंबळून येतात..

सेल खिश्यात टाकतो आणि नाम गजरात स्वतःला हरवू  लागतो..
पांडुरंग..पांडुरंग..विठ्ठल विठ्ठल...

पालखी सासवडला पोहचते..तोवर तो वेगळा न राहता मनाने सर्व वरकाऱ्यांपैकी एक झालेला असतो.

-अभिजीत पानसे

Tuesday, 13 June 2017

आणि नव्या वर्षाचा सूर्योदय झाला होता.."

आणि 2017चा सुर्योदय झाला होता..*

आई-बाबांच्या विरोधाला न जुमानता मी काल थर्टीफर्स्टच्या पार्टीला मित्रांसोबत गेलो.
पण या ओल्ड जनरेशनला आमचं सेलिब्रेशन कळतच कुठे?

बाबांच्या हुकुमाप्रमाणे नाखुषीनेच रात्री लवकर घरी आलो व झोपलो.

पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले...

मी घनघोर रात्री काळोखात....

नाही! कदाचीत तोही पहाटेचा काळोख असावा!!
एका अरण्यात मी एकटाच फिरत होतो.
मनात भितीचा लवलेशही नव्हता.
चंद्राच्या दुधाळ प्रकाशात मी आपल्याच मस्तीत धुंदीत रानवाटा पालथ्या घालत होतो.मनसोक्त एकटाच  हिंडत होतो.

आणि...तेवढ्यात

अचानक मागून एक खर्जातला पुरूषी आवाज आला!

''व्हेअर आर यु रोमिंग यंग मँन?''

मी दचकुन मागे वळलो.

थोड्या अंतरावरून एक  पांढुरकी आकृती माझ्या रोखानेच पुढे येत होती.

माझ्या पोटात भितीचा गोळा उठला.

ती आकृती माझ्या दृष्ट्रीपथात आली.

एक वय झालेला वृद्ध,जरीकाठी धोतर,शुभ्र कुर्ता,चेहऱ्यावर म्हातारपणीच्या सुरकुत्या पण, तरीही तेजस्वी मुखमंडल होतं.पिकलेले केस आयुष्यातील सर्व अनुभवांचे साक्षी होते.डोळ्यांमध्ये आयुष्याची आपली संपुर्ण कारकीर्द यशस्वी झाल्याचे अपूर्व समाधान झळकत होते.

मी स्वत:ला काही क्षण हरवुन बसलो.

''काय यंग मँन!!''
कुठे भटकतोय इकडे? नवीन वर्षाचे स्वागत करायचे सोडुन तू एकटा इकडे काय करतोय?''
जवळ येत त्यांनी प्रेमळपणे विचारले.

त्यांच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो.मनातील मघाची भिती आता नाहिशी झाली होती.आणि नेहमीप्रमाणे मला पुन्हा तारूण्याच्या आणि इतर अभिमानाने घेरले.त्यामुळे मनात त्या वृद्धाबद्दल नाराजीचा भाव आला.
मनात म्हटलं मघ्येच हा म्हातारा कशाला भेटला?पण आश्चर्य वाटले.हा वृद्ध माणुस आमच्या पिढीसारखाच बोलतोय!

चल चालुया सोबत थोडा वेळ!''तो वृद्ध म्हणाला आणि मी नाराजीनेच त्यांच्यासोबत निघालोसुद्धा.

मनात म्हटलं'' शिट यार हा म्हातारा मध्येच कशाला भेटला!फार बोअर करणार!आमची पिढी तुमची पिढी, न्यु यिअर की गुढीपाडवा..यावर लेक्चर देणार!

मी मुद्दामच खोटं हसत खोचकपणे विचारलं,''काय ओल्डी! इतक्या रात्री!जंगलात!भिती वगैरे नाही वाटत?''

मघाच्याच प्रसन्न मुद्रेने ते बोलले,''अरे मित्रा रात्रीचंच जंगल बघण्यात मजा असते ना!
पहाटेच्या या गडद काळोखानंतरच सूर्योदय होतो ना! आणि आम्हा म्हाताऱ्यांना कसली भिती!
हे बोलतानाही त्यांच्या मुखावरील पुर्णत्वास जाणारं शांत स्मित कायम होतं.

मी उपहासाने पुन्हा म्हटलं,''हे ओल्डी मला वाटतं तुमच्या घरची सगळी मंडळी,नातवंडे सगळेजणं न्यु इअर सेलिब्रेशनमध्ये बिजी असतील!तुम्हाला पटत नाही म्हणुन तुम्ही इकडे रागारागाने किंवा दु:खाने फिरायला आलात की काय?''

ते मोकळे हसले,''अरे बेटा मी निरपेक्ष आहे.मी कधीच कुणाकडुनही दुखावलो जात नाही!
आणि तुला कोणी सांगितलं मला हे न्यु यिअरचे सेलिब्रेशन आवडत नाही! हे आय एम अे मार्डन ग्रँडपा बेटा!अँड आय डोन्ट बिलीव्ह इन जनरेशन gap!''आणि दिलखुलास हसलेत.

त्यांचं ते मोकळं स्वच्छ हास्य निष्पक्ष बोलणं ऐकुन माझी नाराजी कुठल्या कुठे पळुन गेली आणि मला माझ्याच वागणुकीची लाज वाटु लागली.

जंगलात कुठेही न थांबता आम्ही  भटकत होतो.त्या गडद शांततेत खाली पडलेल्या  झाडांच्या असंख्य वाळलेल्या पानांतुन चालताना होणारा आवाज कानाला सुखावत होता.

आमच्या गप्पा अगदी मस्त रंगल्या होत्या.

मला हे आजोबा अगदीतरूण विचारांचे वाटले.ते अगदी मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते.शब्दात अवजडता नव्हती.आम्ही अनेक विषयांवर गप्पा केल्या.
अगदी भारतीय मुलींची ऑलिंपिकस मधील चांगली कामगिरी,भारतीय क्रिकेट टीमचं यश, तर अगदी सर्जिकलस्ट्राईक ते डिमनीटायझेशन पर्यंत..शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या तर भारत पाकिस्तान संबंध..

पण त्यांच्या प्रत्येक उत्तरात,बोलण्यात मला तटस्थपणा,त्रयस्थपणा जाणवत होता.कुठलाही विचार मत ते थोपवत नव्हते.जणुकाही फक्त द्रष्ट्याच्या भुमिकेत होते.

शेवटी ते म्हणाले,''बेटा हा तर काळाचा महिमा आहे!वी आर बाउंड टु चेंज विथ द टाईम फाॅर बेटर!''

त्यांना नवीन वर्षाच्या त्यांच्या काही संकल्पांबद्दल विचारले असता म्हणाले,'' मी कधीच कोणताही संकल्प करत नसतो.फक्त त्या त्या क्षणात पूर्णपणे जगतो..राहतो.!
आणि कुणास ठाउक कदाचित पुढच्या वर्षी मी राहणार देखिल नाही!''

त्यांच्या या शेवटच्या वाक्याने माहित नाही का मला एकदम  गलबलुन आलं...असं कुठलं नातं आमच्यात निर्माण होत होतं!!

जंगलातुन फिरता फिरता आम्ही आता एका माळरानावर आलो.

''मग कसं गेलं वर्ष 2016?'' आजोबांनी विचारलं.

''खुप वाईट गेलं हो हे वर्ष! सगळीकडे अपयशी ठरलो!तसंही मला ज्योतिषांनी सांगितलच होतं की हे 2016वर्ष माझ्यासाठी वाईटच जाणार!

त्या आजोबांनी तडक उत्तर दिलं,''कुठलंही वर्ष कधीच कोणासाठीही वाईट नसतं!काळ काय कोण्या ज्योतिष्याच्या अंकांच्या आज्ञेत आहे काय?
काळावर कोणाचंही आधिपत्य नसतं!तो स्वत: त्याचा अनभिषिक्त सम्राट असतो!ज्योतिषी,अंकशास्त्री भलेही आपल्या अंकाची वजाबाकी-बेरीज,आराखडे काढुन वर्षफल सांगत असेल पण, 'कर्म तर तुमच्या हातात असतं ना!ते तुम्ही करता योग्य केलं का? करता का? ते योग्य केलं तर प्रत्येक वर्ष चांगलच जाणार!त्यामुळे वर्षाला वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे?
ते तर माझ्यासारखच निरपेक्ष असतं!''
शेवटलं वाक्य ते जरा मिश्कीलतेने हसुन म्हणाले.

पुन्हा पुढे म्हणाले ''न्यु ईअरचं सेलिब्रेशन आटोपल्यावर तुम्ही थोडं आत्मचिंतन करा!मी यावर्षी कोणत्या चुका केल्यात आणि निर्णय घ्या की,या पुन्हा होणार नाहीत!स्टाॅप ब्लेमिंग अदर्स अँन्ड बी रेडी टु टेक रिस्पाॅन्सिबिलिटीज आॅफ युअर ओन अॅक्शन्स!''

आम्हा चालतच होतो.ते आजोबा कुठेही न थांबता चालतच होते.समोर हिमाच्छदित पर्वत शिखरं चंद्राच्या प्रकाशात अस्पष्ट चमकत होती.नक्कीच  हिमालय असावा.खुप सुंदर दृश्य होतं.

 ते पुढे बोलु लागले,''मला तुमच्या पिढीवर पूर्ण विश्वास आहे!पण तुम्ही म्हणता मागचे वर्ष किती सहज निघुन गेले कळलेच नाही!
अरे कसं कळणार?
तुम्ही इतके सहज दिवस वाया घालवता!दिवसा दिवसांनीच वर्ष बनतं.दर वर्षी केलेले संकल्प सहज विसरता!पण काळ कधी थांबतो का!तुम्हाला कळतही नाही!मुठीतुन वाळु जशी अलगद निसटते, तसे दिवस जातात आणि शेवटी उरतात त्या कडु गोड आठवणी!

पण आम्हाला गेल्या वर्षाशी काही देणं घेणं नसतं उत्सुकता असते फक्त पुढील वर्षाच्या स्वागताची!
शेवटी मावळत्या सूर्याला कोण नमस्कार करतं?"

जवळुन एक अरूंद नदी खळखळाट करत वाहत होती.माझ्या डोक्यातही आता विचारांचा जबरदस्त प्रवाह वाहत होता.ते आजोबा नदीकडे बोट दाखवत म्हणाले,''आपणही या नदीसारखं वाहतं असावं!कारण जिथे पाणी साचतं तेथे शेवाळ साचतं!''

त्यांच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनात अनेक तरंग उमटत होते.प्रथमच मी एका योग्य दिशेने विचार करत होतो.

चंद्र पश्चिमेकडे कलत होता.एका छोट्या लाकडी पुलावरुन आम्ही नदी ओलांडुन पुढे गेलो होतो.कानावर खळखळाट अजुनही येत होता.बर्फाच्छदीत डोंगरंही आता  जवळ आली होती.

''मी त्या आजोबांना माझ्या दु:खाचं कारण सांगितलं.एका अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा आणि काही जवळच्या नात्यांचा मृत्यु झालेल्याचं सांगितलं.

तेव्हा त्यांनी खाली गळुन पडलेल्या झाडांच्या पानांवरुन सृष्टीचा ''उत्पत्ती स्थिती आणि लय'' हा सिद्धांत समजाउन सांगितला.प्रत्येक  गोष्ट ही काळाच्या उदरात गडप होणारच! 'क्षणभंगुरत्व' एन्जाॅय करायला सांगितलं.वर्तमान क्षण हेच खरा जीवन असत सांगितलं.

पहाट आता संपत आली होती.तेजस्वी #शुक्रतारा पश्चिम क्षितीजाकडे कलला होता.

बऱ्याच वेळापासुन आम्ही एक शब्दही न बोलता चालत होतो.नदीचा खळखळाटहीआता ऐकु येत नव्हता.मी पुर्ण अंतर्मुख झालो होतो.डोक्यातील विचारांचे थैमान आता शांत होत होते.
त्या आजोबांच्या सोबतच्या प्रवासाच्या सुरवातीपासुन तर आतापर्यंत माझ्यात आमुलाग्र बदल होत होता.तारूण्याचा अवास्तवी अभिमान आणि इतर काही न्यूनगंड, पूर्वग्रह केव्हाच गळुन पडले होते.मला हे सगळं नवीन भासत होतं. त्या आजोबांबद्दल मला आता विलक्षण प्रेम वाटत होते.असं वाटत होतं हा प्रवास कधी संपुच नये.

समोर पुर्वेकडे एक विशाल दरी पसरली होती.
ते आजोबा अचानक त्या दिशेने चालु लागले.
माझी मुद्रा प्रश्नार्थक झाली.ते अगदी कड्याच्या टोकाजवळ उभे राहुन माझ्याकडे वळले व म्हणाले,
''बेटा आपला प्रवास येथपर्यंतच होता!तु आता परत जा!''

मला त्यांच्या विरहाची कल्पनाही सोसवत नव्हती आणि माझ्या भावनांचा बांध फुटला.अश्रुंचा प्रवाह पापण्यांचा अडसर झुगारत गालांवर ओघळला.

आणि मी माझ्या मनातील 'तो' प्रश्न त्यांना विचारला.

''आजोबा तुम्ही कोण आहात?''

त्यांनी मंद स्मित केलं व बोलले,''बेटा,तु अजुन मला ओळखलं नाहीस?
अरे मी आहे वर्ष 2016!आणि मला तर गेलच पाहिजे!
काही क्षणात सुर्योदय होणार आहे!नवीन वर्ष जन्माला येणार आहे!

हे सगळं अटळ असतानाही मी त्यांना ''न जाण्याबद्दल'' विनवु लागलो तेव्हा ते म्हणाले,''अरे मला विसरा..मी जातो आहे..पण मी तेव्हाही होतो आणि नंतरही राहील..!फक्त माझे  रूप आणि नाव बदलत राहतील..कारण मी तर अनादी..अनंत आहे..!
आणि बेटा,तुमच्या नवीन वर्षाच्या जल्लोषात मला आता जागा कुठे आहे? मी गेल्यावर माझी साधी आठवणही राहणार नाही.
म्हटलं ना सगळा काळाचा महिमा!

पण बेटा मला विसरा पण मी काय शिकवले ते विसरू नका..!

जा तु आता..तुम्हा सगळ्यांच्या सर्व कटु आठवणी मी घेउन जातोय!''

माझ्या डोळ्यातुन सतत अश्रु वाहत होते.मी त्यांना शेवटची एक विनंती केली त्यांना नमस्कार करू देण्याची!

त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं.त्यांनी माझ्या डोक्यावर वात्सल्याचा हात ठेवला.
मला आशिर्वाद मिळाला होता...प्रत्यक्ष काळाचा..!

क्षणभर सारं स्तब्ध वाटलं..

मी डोळे उघडले...
समोर कोणीच नव्हतं.
फक्त उरली होती जाणीव त्यांच्या स्पर्शाची!

मी पुन्हा गहिवरलो.
मला एकदम त्यांचे शब्द आठवले.
''आली जरी कष्ट दशा अपार
न टाकिसी धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेच खाली
ज्वाळा तरी त्या वरती उफाळे''

 समोर दरीच्या मागे पर्वतापलिकडे केशरी लाल सूर्यबिंब उगवत होते...

माझ्या अश्रुंनी भरलेल्या डोळ्यातुन सोनेरी किरणे चमकत होती.

2017 चा सुर्योदय झाला होता....

_Abhijeet Panse


Thursday, 25 May 2017

"बाधीत"


माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या पुढील गूढ घटनेमुळे, अनुभवामुळे कोणाच्याही व्याधीसंबंधित वा अतींद्रिय अदृश्य शक्तीच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या विश्वास / अविश्वासासंबंधित वा अनुभवांसंबंधित भावना दुखवल्यास तसा माझा उद्देश नव्हता असे समजावे..फक्त सोशिअल अवेरन्स साठी मी हा स्वतः अनुभवलेला अनुभव, घटना सांगतो आहे. घटना थोडी मोठी आहे.


'#अस्तू' चित्रपटात मोहन आगाशे तंद्रीत घर सोडून निघून जातात, त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून माझी एक मैत्रीण सतत तंद्रीत राहायची तिच्या घरच्यांना प्रथम हे लक्षात आलं नाही.पण दोन दिवसांपूर्वी घरातून दुपारी ती अचानक गायब झाली.सगळीकडे शोधाशोध सुरु झाली पण ती दिसली नाही. तिचा फोन घरीच होता.पोलिसात तक्रार करण्याचंही ठरवलं पण तरुण मुलीचं नाव खराब होऊ शकेल म्हणून काही तास वाट बघण्याचं ठरवलं.


घरच्यांनी तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना फोन करणं सुरु केलं. आम्हाला कळल्यावर मी आणि माझा मित्र सुद्धा तिला शोधू लागलो. पण ती न सापडल्याने नक्की काय झालं जाणून घ्यायला काळजीत तिच्या घरी गेलो.


तिच्या घरच्यांनी जी माहिती सांगितली त्यावरून आम्ही विचारात पडलो. गेल्या काही दिवसांपासून ती सतत तंद्रीत जायची. जेवताना , टीव्ही ,लॅपटॉप कडे बघत स्वतःशीच हसायची. तिचं बोलण्यात काही विचित्र , अनाकलनीय शब्द यायचे. भाषा कळायची नाही. मला आठवलं की फोन वर आणि प्रत्यक्षातही ती असेच मधूनच काही विचित्र शब्द बोलायची. पण तिच्या आईने पुढे जी सहज माहिती सांगितली ती किती महत्वाची याची कल्पना नव्हती.


तिच्या आईने सांगितलं की ती वीसेक दिवसांपूर्वी दिवसभर शहराबाहेर पिकनिक आणि चित्रपट बघायला जातेय म्हणून गेली होती आणि रात्री नऊ वाजता घरी आली. तेव्हापासून ती विचित्र वागु ,असंबद्ध बोलू लागली सांगितलं.


काही जागा 'बाधित' असतात असे वृद्ध, अनुभवी लोक सांगतात ..पण माझा कधी विश्वास बसला नाही. मी तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि त्या दिवशी नक्की काय झालं होतं विचारलं. ती सांगू लागली , ते सर्व जण 28 एप्रिलला भर कडकडीत माध्यान्ही शहराबाहेरील तलावाकाठी पोहचले. तिथे खाणं झालं आणि संध्याकाळी चित्रपट बघून प्रत्येकजण आपापल्या घरी परत गेले.


मी तिला पुन्हा विचारलं नक्की आठवून सांग 'ती' सतत

तुमच्यासोबतच होती का..त्या दिवशी काही वेगळं घडलं होतं का!

तिच्या मैत्रिणीने आठवुन तपशीलपूर्वक सांगितलं की 'तिला' दुपारी एक फोन आला होता आणि आम्ही सर्व बसून गप्पा करत खात असताना ती फोन वर बोलत चालत तलावाकडे गेली. तिकडे झाडी होती .त्या निर्मनुष्य भागात त्या बाजुने एक पडकी इमारत होती. जवळ कठडा नसलेली विहीर होती.पण फोनवर बोलत ती त्या बाजूनं गेल्याने दृष्टीआड होऊन आम्हाला दिसू शकली नाही.


पंधरा मिनिटाने ती परत आली.मग आम्ही ग्रुप्स फोटोज , सेल्फीज काढलेत आणि परत निघालो. तिचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. परत येताना आम्ही चित्रपट पहिला आणि घरी पोहचलो.

हे ऐकून मी विचारात पडलो.खरंच लोक म्हणतात की पडक्या इमारती, काही जागा या नकरात्मक शक्तीने भारीत असतात. हे सत्य असेल का?

एकंदर एक गोष्ट नक्की की जे काही तिच्यासोबत झालं होतं ते 'त्या ' दिवशी त्या पिकनिक मुळे झालं होतं.

तिच्या घरचे काळजीत होते.त्यांचे सतत फोन करणे सुरु होते. आम्ही दोघे पुन्हा तिला शोधायला बाहेर पडलो.


आम्ही जिना उतरत होतो तेव्हा माझ्या डोक्यात अचानक विजेसारखा एक विचार चमकून गेला. बरेचदा अंतर्मनातून एक साद येते आणि ती अचूक निघते हा अनुभव खूपदा येतो. मी पुन्हा वेगाने वर तिच्या घरात गेलो. तिच्या घरच्यांना विचारलं की तिचा लॅपटॉप कुठे आहे. आम्ही तिच्या खोलीत गेलो. आत गेल्या गेल्या मला जरा वेगळं काहीतरी जाणवलं. तिचा लॅपटॉप उघडला. नशीब त्याला पासवर्ड नव्हता!

आणि मला धक्का बसला. तिच्या लॅपटॉप मध्ये जे व्हिडीओज होते ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. ते सर्व व्हिडीओज गेल्या वीसेक दिवसात तिने डाउनलोड केले होते.


"ब्लु व्हेल" गेमबद्दल ऐकलं होतं पण तो इथपर्यंत पोहोचेल माहिती नव्हतं. मला थोडी शंका या ब्लु व्हेल गेमची होती की कदाचित ती या विळख्यात तर अडकली नव्हती ना!

पण नाही तसं काहीही नव्हतं. तिच्या लॅपटॉपमधील ते व्हिडीओज आणि बरेच फोटोज बघून मला धक्का बसला! त्याक्षणी मला एक नैसर्गिक इन्स्टिक्ट दाटून आलं. मी काही आडाखे मनाशी बांधू लागलो.

आणि तत्क्षणी घाईत मित्राला घेऊन बाहेर पडलो. कदाचित माझा अंदाज खरा होता. जे काही झालं ते त्या दिवशी घडलं होतं.

कदाचीत मला अंदाज होता ती तेव्हा कुठे असावी!


...


मला ती जागा दिसली. तिथे भव्य इमारत होती. आजवर फक्त पडक्या इमारती, निर्मनुष्य भागातील विहिरी, निर्मनुष्य जागा नकारत्मक शक्तींनी भारित असतात सांगितले, वाचले होते. पण मोठ्या शहरात आजूबाजूला लोकवस्ती,रहदारी अश्या गजबलेल्या ठिकाणीही काही जागा बाधित असू शकतात , लोकांना बाधा होऊ शकते याची तिळमात्र कल्पना त्या दिवसापर्यंत नव्हती. त्या दिवशीपर्यंत कितीतरी वेळा 'त्या' इमारतीजवळून गेलो होतो.बघितली होती. पण आज पाहिल्यांदा 'त्या' इमारतीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला होता. मनावर दडपण होते.

खरंच आत्मा, भूतबाधा या गोष्टी अस्तित्वात आहे का यांचं उत्तर मिळालं नव्हतं. पण त्या दिवशी पाहिल्यांदा तो अनुभव ,उत्तर मिळणार होतं.


आम्ही घाईत गाडी पार्क करून वेगाने त्या बिल्डिंगच्या आत शिरलो. वरच्या मजल्यावर गेलो. 'तो' दरवाजा फक्त लोटला होता. एक लांब श्वास घेऊन हिंमतीने , निग्रहाने आत शिरलो. आत अंधार होता. भर उन्हाळ्यातही त्या अंधारामुळे , दडपणामुळे , अनामिक भीतीमुळे आत शिरल्या थंड लहर अंगावरून गेली.


मोबाईलचा टॉर्च लावून तिला आम्ही शोधू लागलो. माझं अंतर्मन सांगत होतं की ती इथेच भेटणार. आणि त्याक्षणी माझं लक्ष वर गेलं..


तिथे 'ती 'बसली होती.


दृष्टी माझ्याकडे होती. चेहऱ्यावर जणू भक्ष मिळाल्याचं स्मित झळकत होतं. तिला बघून आनंद झाला. आम्ही तिच्याजवळ गेलो. आणि तोवर जी गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती ती तेव्हा कळली. तिची दृष्टी माझ्यावर रोखलेली नव्हती तर समोर होती.मी तिच्या शेजारी उभा राहिलो माझ्या जवळ मित्र उभा . तरी तिचं लक्ष नव्हतं. मी हळूच तिच्या खांद्याला हलवलं, नाव घेऊन बोललो ".... तू इथे एकटी काय करतेयेस!'आम्ही किती शोधतोय तुला!




ती तरीही स्थिर. दृष्टी समोर.

मी पुन्हा तिला थोडं हलवलं.

तिने गर्रकन माझ्याकडे मान फिरवली. मागून अधून मधून येणाऱ्या अस्पष्ट प्रकाशात तिचा चेहरा मी बघितला. एक क्षण तिच्या नजरेत काहीही भाव नव्हते. आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेत अंगार होता..जणू तिच्या आनंदात मी अडथळा आणला होता. पुढे जे घडलं ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.


ती माझ्या अंगावर त्वेषाने उसळून आली !माझा गळा दाबू लागली ! आणि जोरदार किंचाळून बोलली,

"भल्लालदेव मी तुला मारून टाकेन! माझ्या बाहुबलीला धोक्याने मारलंस! माझा महेंद्र बाहुबली येईल! मी तुला संपवणार ! मी तुला आता सोडणार नाही!"


हे तिचं रूप बघून मी गार पडलो! तिला तिच्या नावाने हाक मारू लागलो तशी ती ओरडली " मी ... नाही! मी देवसेना आहे! कुंतल राज्यची राजकन्या! अमरेंद्र बाहुबलीची बायको!" पुन्हा माझा गळा जोराने दाबू लागली!

माझा मित्र हे तिचं भयंकर रूप बघून घाबरून काही पावलं मागे सरला! तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

मला सोडून त्याच्याकडे उसळत ओरडली " सेतुपती!! तू जिवंत कसा! मी तुझे बोटं कापलीत ! माझ्या अमरेंद्र बाहुबलीने तुझा गळा चिरला! तरीही तू जिवंत! ठार मारतेच तुला आज!" आणि एका बाजूला बघत कोणाला तरी हाक मारून बोलावू लागली " कटप्पा! कटप्पा!! लवकर ये! आणि तेलुगूत काहीतरी बोलू लागली "


आम्ही दोघेही तिचे ते रुप बघून थरथर कापू लागलो. तेवढ्यात कोणीतरी ओरडला. मला वाटलं ती ज्या कोण्या कटप्पाला बोलावतेय तो आला की काय!!

" ये बाहर जा के झगडा करो यार! हमको तो पिच्चर देखने दो! साला ब्लॅक मे तिकिटे खरिद के बाहुबली देखने आये है! "


आमच्यामुळे इतरांना बाहुबली सिनेमा बघताना अडचण होतेय, सगळे लोक आमच्याकडेच बघताहेत हे बघून मी ओशाळुन तिला जबरदस्तीने पण तिला सांभाळत सिनेमा हॉल च्या बाहेर घेऊन आलो. तिचं मात्र " मी देवसेना आहे मला सोड ,भल्लाळ सोड मला भल्लाळदेव! मी देवसेना आहे! मी तुला मारेन! "आणि पुन्हा पुन्हा कटप्पा कटप्पा म्हणत कोणाला तरी हाक मारत होती!


बाहेरच्या व्हरांड्यात आल्यावर तिला खांदे धरून हलवू लागलो ..शेवटी बॉटलच्या पाण्याने तिच्या चेहऱ्यावर हबकारे मारले. तशी ती थोडी भानावर आली. मी तिच्या दोन्ही कानात जोरजोराने फुंकर मारली ! "बाहुबली फट स्वाहा! " ती तरीही अस्वस्थ होतीच.

" बस बस झालं ..गेलं गेलं ..जे काही होतं ते गेलं..बस शांत हो ... आता! काही नाही ..काही नाही झालं!"

तिच्या पाठीला थोपटू लागलो.


ऑटोमध्ये बसवून तिला तिच्या घरी आणलं. रस्त्यात कुठेही तिला बाहुबलीचं पोस्टर दिसू नये म्हणून काळजी घेतली.


तिच्या लॅपटॉपमध्ये 'प्रभास' चे सर्व व्हिडीओज, इंटरव्युज, त्याचे सर्व जुने चित्रपट , बाहुबली संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडीओज विडिओज बघितल्यावरच मला संशय आला होता. '#कॅप्शन' नसलेले तेलुगु , तामिळ सर्व व्हिडीओज ती काही दिवसांपासून बघत होती 29 एप्रिल ला शनिवारी ते पिकनिक ला गेले होते.बाहुबली 28 एप्रिल ला रिलीज झाला होता. त्यामुळे माझा संशय बळावला होता.


त्या दिवशी पिकनिकहुन आल्यावर बाहुबली त्यांनी बघितला आणि तिथूनच तिला '#प्रभासची ' बाधा झाली. सर्व चित्रपटगृहे सध्या प्रभास बाधित आहेत. बाहुबलीच्या भुताने पछाडलेले आहेत.

म्हणूनच घराजवळील एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये ती सापडेल माझा कयास होता. असो कुठल्या भागात, पडक्या इमारतीत, विहिरीत काही भुतं खेत नसतं ! असेल तरी ते बाहूबलीच्या या भुतासमोर काही नाही हे कळलय. सध्या घरातील पोरी बळींची काळजी घेणे गरजेचे आहे.

मला ओरडून विचारावं वाटत होतं त्या प्रभासला अरे अजून किती पोरींना आपल्या नादी लावशील रे!


असो सध्या तिला घरी ठेवलय. दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या आहेत. टीव्हीवर वा कुठेही बाहुबली वा प्रभास दिसू नये याची काळजी घेतली जातेय.


आणि हो एक सांगायचं राहिलं जे मी तिच्या घरच्यांना सांगितलं नाही, की त्या दिवशी ती पिकनिकला गेली असताना माझाच तिला फोन आला होता. माझ्याशीच बोलत ती तिकडे चालत गेली होती.



-अभिजीत पानसे.