Showing posts with label जय माता दी-प्रवास वर्णन. Show all posts
Showing posts with label जय माता दी-प्रवास वर्णन. Show all posts

Saturday, 30 December 2017

चलो दिल्ली (चलो बुलावा आया है भाग 1)

'चलो बुलावा आया है''
(वैष्णवी देवी प्रवास वर्णन) भाग1



"हाँ सीट अवेलेबल है!"असं तत्काळ रिजर्वेशनच्या खिडकीमागच्या एका रेल्वे कर्मचाराने रुक्षतेने म्हटले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

देवाच्या पुढ्यात दानपेटीत पैसे टाकावे इतक्या अदबीने मी टिकीटाचे पैसे खिडकीतून त्याच्या समोर ठेवले.

आणि त्याने दिल्लीचं  तिकीट माझ्या पुढ्यात भिरकावलं.

हे सरकारी कर्मचारी कागद पत्र..तिकीटांसारख्या तुच्छ गोष्टी आपल्यासारख्या तुच्छ लोकांच्या हाती वगैरे देत नसतात.भिरकवण्याचा त्यांना आदेशच असतो बहुदा किंवा तो त्यांच्या ट्रेनिंगचाच एक भाग असावा.

लागलेली लॉटरी कोणी जितक्यांदा तपासणार नाही तितक्यांदा मी ते तिकीट तपासलं.तारीख -वेळ -बर्थ- बोगी सगळं काही. तिकीटावरील कुठल्यातरी फोन कंपनीची जाहीरातही मी त्या आनंदात दोन तीनदा  वाचून काढली.
आनंदच तितका झाला होता ना!

सकाळी साडेनऊ वाजता झोपेत असताना दुर्लक्ष करूनही फोन सतत शहारू लागला तेव्हा इच्छा नसतानाही उचलल्यावर काही मिनीटाच्या Anurag सोबतच्या संवादानंतर मी ताडकन लाथेने सर्वांगावरील गरम ब्लँकेटचे आवरणे दुर करीत रेल्वे स्टेशन गाठले होते.आणि कुठल्याही एजंटाशिवाय स्वतः रांगेत लागुन शक्यता फारच कमी असताना दिल्लीचे टिकीट मिळवले होते.

आजवर उत्तरेकडे नाशिकच्या पलिकडे न गेलेलो मी आयुष्यात  पहिल्यांदाच देशाच्या राजधानीत पाऊल ठेवणार होतो!

पण फक्त हेच कारण नव्हतं त्या आनंदामागे.मी आधीच ठरवलं होतं अनुरागला दिल्लीला भेटायला गेलोच तर वैष्णोदेवीला जायचंच दर्शनाला! बरीच ओळखीची मंडळी जाऊन आली होती.

एरवीही मला कोणी ओळखी अनोळखी वैष्णो देवीला जाऊन आल्याचं भेटलं तर मी शरीराचे सहस्रकर्ण करून त्यांचं प्रवास वर्णन ऐकायचो.मनानेच शाब्दिक दर्शन घ्यायचो.पण आता प्रथमच याची देही याची डोळा दर्शनाची संधी आली होती.
लेकिन दिल्ली अभी दुर थी!!

दुसऱ्या दिवशी फलाट क्रमांक १ वर आलेल्या अग्नीरथाचं मी माप ओलांडलं आणि आमचा रथ उत्तरेकडे कूच करता झाला.

माझी आवडती साईड लोअर सीट मिळाल्याने आनंदात मी खिडकीतुन पळती झाडे पाहु लागलो.

थोड्याच वेळात भारताचे फुफ्फुसं असलेले मध्यप्रदेशचे जंगलं;पाठीमागे रेलुन खिडकीतुन येणारा वारा चेहऱ्यावर घेत डोळे बारीक करत;बघताना आजुबाजुच्या वातावरणापासुन अलुफ होत एका  Equilibrium मध्ये गेलो होतो.

संध्याकाळी पावणे सहाला रेल्वे होशंगाबाद नावाच्या स्टेशनावर थांबली आणि मला ह्या गावाचं नाव खूपदा ऐकल्या-वाचल्यासारखं जाणवू लागलं.
आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला.

की 'नर्मदा परिक्रमेच्या' पुस्तकांमध्ये मी ह्या गावाबद्दल वाचलय.आणि बर्थवर आळसावलेलो पसरलेलो मी उत्साहाने सरसावून बसलो.

मनात एकदम उत्कट अष्टसात्विक भाव दाटून आले.

ज्या नर्मदा दर्शनासाठी मी तळमळत होतो परिक्रमेवरील पुस्तकं वाचल्यापासुन; त्या नर्मदा माईचं दर्शन काहीही कल्पना नसताना होणार या विचारानेच!!

 गाडीने स्टेशन सोडलं. पण कुठलंच चिन्ह दिसेना. मी समोर दृष्टी जाईल तितकं लांब पाहू लागलो.

आणि अचानक जलप्रवाह दुरून दिसू लागला.आणि हळूहळू नर्मदामाईच्या संपूर्ण विशाल पात्राला आमचा अग्निरथ वर पुलावरून ओलांडु लागला.

 '#नर्मदेहर' म्हणत मी शरीराचे सहस्रनयन करत नर्मदादर्शन करत होतो.

सूर्यास्तसमयीच्या केशरी सूर्याच्या साक्षीने खाली नर्मदेचा विशाल प्रवाह पश्चिमेकडे सागराच्या दिशेने वाहत होता.

खाली दूरवर हातात काठी घेतलेला एक वृद्ध नदीच्या तिराने चालताना दिसला. मला गो.नि.दांडेकरांची 'कोणा एकाची भ्रमणगाथा' आठवली.

नर्मदादर्शनाने खूप सुखावलेल्या माझ्या मनाला;आयुष्यात पुढे नर्मदा परिक्रमा करण्याच्या माझ्य  संकल्पाची मला आठवण झाली.

काहीवेळाने भोपाळ आलं. रात्री उशीरा कधीतरी ग्वाल्हेर येऊन गेलं.पहाटे जाग आली तर गाडी आग्रा स्टेशनात थांबलेली दिसली.मला एकदम औरंग्याचा दरबार तिथला मिर्झा राजे,आणि शिवाजी महाराजांनी दाखवलेला तेजस्वी बाणा आठवला.
The great Escape in the world म्हणुन गौरवण्यात यावं ती शिवाजी महाराजांची आग्रयातुन सुटका आठवली.त्यावेळी माझा
'हरी तात्या' झाला होता.

पहाटे पाचला मथुरेला गाडी थांबली. स्टेशन पूर्ण शांत होतं. श्रीकृष्णाच्या भूमीत आल्याचा खूप आनंद होत होता.

 फेब्रुवारीचा पहिला आठवडा असल्याने ब्लँकेटच्या स्वेटरच्या आवरणालाही भेदून थंडी पार हाडापर्यंत जात होती.

 हळूहळू झुंजुमुंजू लागलं. आणि दिल्ली शहराच्या खुणा दिसू लागल्या.
संपूर्ण रस्त्यावर दाट धुकं पसरलं होतं. दिल्लीनं नेहमीप्रमाणे दाट धुक्याची जाड शाल पांघरली होती.

देशातील सर्वात प्रदुषित शहर असलेलं शहर म्हणजे  आपल्या भौतिक प्रगतीची दुसरी काळी बाजू. त्यामुळे दिल्लीत एकवेळ नारळ आणि हापुस पिकेल पण दिल्लीतून आकाश कधीच निळं दिसणार नाही.

गाडी न्यु दिल्ली स्टेशनवर प्रवेशती झाली.आणि मी माझी सखी सोबतिण 'रक सॅक'ला अलगद उचलुन तिला पाठीवर घेत ' इंद्रप्रस्थाच्या'च्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि जीवाची दिल्ली करण्यास सज्ज झालो...

-अभिजित पानसे

तिकीट हाती आले (चलो बुलावा आया है भाग 2)

*चलो बुलावा आया है
वैष्णवीदेवी प्रवास वर्णन भाग 2*

माझ्या सखीला-रक सॅकला उचलुन पाठीवर घेत दिल्लीच्या भुमीवर पहिलं पाउल ठेवलं.
आणि  ''जिवाची दिल्ली'' करण्यास सज्ज झालो.

अनुराग घ्यायला येणार होता. तो येईपर्यंत मी दिल्ली मेट्रो स्टेशनला पोहोचुन नेहमीप्रमाणे आजुबाजुचं निरीक्षण करू लागलाे. हे शहर अनेक गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. हे बातम्यांमधून कळत असतं.
त्याचा संबंध आजुबाजुच्या वातावरणात दृश्यात काही मिळतो का हे शोधण्याचा बालिश प्रयत्न करू लागलो.

एकदाचा अनुराग आला.भेटण्याच्या आनंदात एकमेकांना अभक्ष शिव्यांचे आदान प्रदान..मिठ्या मारणाचा सोहळा पार पडला आणि आम्ही 'रोहिणीला' जायला निघालो.

मेट्रोच्या पहिल्याच भेटीत प्रेमात पडलो. पण लोक मात्र मख्ख चेहऱ्याने प्रवास करताना दिसलेत. यामानाने मुंबईची लोकल खूप जिवंत वाटते. मुंबई स्पिरीटच ते!
त्यावेळी फक्त दिल्ली कोलकात्यामध्येच मेट्रो ट्रेन होती.

फक्त फेब्रुवारी महिन्यातच राष्ट्रपती भवनातील गार्डन सामान्य नागरीकांसाठी खुलं असल्यामुळे अनुरागचा तिकडे जाण्याचा बेत होता.
पण हे गार्डन, उद्यानात जायचं म्हटलं की एरवीही माझ्या चेहऱ्यावर आठ्या उमटतात.म्हैसुरचं वृंदावन गार्डन असो वा काश्मीरचे मुघल उद्याने मला कंटाळाच येतो.

म्युझियम्स,किल्ले,लेणी,किंवा ऐतिहासीक वास्तु,मग ते सुस्थितीत असो वा भग्नावस्थेत,तेथे मी तासनतास एकटा रमु शकतो.वेगळ्याच विश्वात जातो.

त्यामुळे मी अनुरागपुढे पुराना किल्ला,लाल किल्ला कुतुब मिनारची यादी समोर ठेवली.

हे ऐकताच त्याने मला गच्चीवर नेलं आणि तिथे गेल्यावर मी जोरदार ओरडलोच..

कारण त्याच्या गच्चीवरुन समोर दुर कुतूब मिनार दिसत होता.

मी कितीतरी वेळ ते दृश्य पाहत राहिलो.

त्या दिवशी अनुरागसोबत कुतूब मिनार..लाल किल्ला..चांदनी चौक..लोटस टेंपल बघुन  आलो.आणि दुसऱ्या दिवशी जम्मूचं रिजर्वेशन तत्काळमध्ये करण्याचं ठरलं.

कोणाला हाताला सहा बोटं असतात,वर्तमानपत्रात कधी दुतोंडी साप वगैरे जन्माला आलेला दिसतो.

तसंच मला कधी कधी तिव्रतेने वाटतं की विधात्याने माझ्या पोटात मला दोन तीन जठरं का नाही दिलीत!!

अशीच भावना मला चांदनी चौकात पराठा गल्लीतुन आणि इतर भागात फिरताना झाली होती.

  सकाळ आली ती अनुरागच्या तब्येतीचं दुखणं घेऊन आली. त्यामुळे त्याचं येणं रद्द झालं.
 मला मात्र मनात एकटं जाण्याच्या विचारानं हुरहुर जाणवू लागली.

जम्मू काश्मीर म्हटल्यावर डोळ्यांसमोर आतंकवादी कारवायाच येऊ लागल्या. पण घरून निघतानाच मनाशी निश्चय केला होता वैष्णो देवीला जायचेच.

 सकाळी १० ते १२ पर्यंत सुरू असणाऱ्या तत्काळ साठी लोक पहाटेपासून रांगेत लागतात. आणि आम्ही दुपारी साडे अकरा वाजता स्टेशनला जायला घराचा उंबरठा ओलांडला.

१२ फलाटं ओलांडून पहाडगंज भागाकडील तत्काळचं ऑफीस खूप प्रयत्नांती एकदाचं सापडलं.

आत वेळ संपल्याने तिथे कोणतीच रांग नव्हती. आत पोहोंचल्यावर कळलं की मी xerox copy विसरलोय.

मग पहाडगंजचं जंग जंग पछाडल्यावर एकदाची xerox copy काढली.

 पुन्हा ऑफीसात आलो तर जवळचा पेन हरवलेला..!!

 मग कोणी पेन देता का हो पेन..या वेंधळ्या पेंद्याला पेन देता का विचारत
 शेवटी एकदाचा फॉर्म भरून झाल्यावर तो द्यावा तर 'लंच टाइम हो गया' म्हणत तो गिळायला निघून गेला.

तेव्हा निराशेने मी जायचचं रद्द केलं. आणि जवळच्या कॅनॉट प्लेसला जायला आम्ही निघणार होतो.

 पण थोड्याच वेळात तो अधिकारी आला आणि नकार ऐकण्यासाठीच मी खिडकीपाशी जाऊन भरलेला फॉर्म उदास मनाने आत ढकलला.

मनात म्हटलं आज जर तिकीट मिळालं नाही तर वैष्णो देवीचीच इच्छा नाही की मी दर्शनाला यावं. तसंही देवीची  इच्छा असली तरच जाता येतं असं म्हणतात.
 अशी स्वतःची खोटी अयशस्वी समजूत काढू लागलो.
आणि दुसऱ्या दिवशी परतीचं तिकीट काढायला लवकर येण्याचं ठरवलं.

आता रेल्वे अधिकारी दुपारी 2 वाजता फॉर्मवर 'तत्काळ' बघितल्यावर अंगावर खेकसणार याची खात्री होती.

 एवढ्यात त्या खिडकीच्या पलीकडुन अधिकाऱ्याच्या मुखातून तीन शब्दसुमनं सांडलीत आणि मी ती माझ्या कर्णांजलीत अलगद झेलली -'एकही बचा है!'

मला आश्चर्याचा मोठा धक्का होता तो धक्का!!

खिडकीतून एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहून अनुरागलाही खूप आश्चर्य वाटलं! आणि मी आनंदाने  उद्गारलो "चलो बुलावा आया है माताने बुलाया है!"

(क्रमशः)

Wednesday, 27 December 2017

चलो बुलवा है , भाग 3

#चलो_बुलावा_आया_है
#वैष्णवीदेवी_प्रवासवर्णन #भाग_तीन

खिडकीतुन एक गोंडस तिकीट बाहेर आलं.ते पाहुन #अनुरागलाही खुप आश्चर्य वाटलं!आणि मी आनंदाने ,उत्साहाने त्याच्या पोटावर जोरदार बुक्की मारण्याच्या पवित्र्यत उद्गारलो,''चलो बुलावा आया है माताने बुलाया है''!कारण तो सतत म्हणत होता की तुझं जाणं अशक्य आहे टिकिटच मिळणार नाहीये!आणि मीहि ते मनोमन स्वीकारलं होतं!

दिवसभर उत्साहात दिल्ली फिरलो. अक्षरधाम मंदीराला जाउन आलो.

रस्त्यात 'खेलग्राम' लागलं. तेव्हा सुरेशकलमाडींचे कांड आणि नंतर त्यांचा गझनीतील आमिर खान झालेला आठवला.

रात्री मात्र रोमांचाने..अति विचाराने..हुरहुरीमुळे..
थोड्याश्या भितीमुळे झोप येईना. विश्वास बसत नव्हता खरंच मी हिमालयाच्या जवळ जातोय..कारण तोवर मी नाशिकच्या पलीकडे कधी उत्तरेकडे गेलो नव्हतो.

संपुर्ण हिमालय फिरणे,
कैलासपर्वत बघणे,
मानस सरोवराच्या काठी पौर्णिमेची रात्र घालवणे आणि इजिप्तचे पिरॅमिड्स बघणे ह्या माझ्या लहानपणापासुनच्या स्वप्नांपैकी एका स्वप्नाच्या मी काहीसा जवळ जातोय याच आनंदात होतो!

 सकाळपासून काहीशा अस्वस्थतेतच उठल्यावर चलसंगणकावर (laptop)जम्मूच्या प्रसिद्ध 'रघुनाथ मंदिराची माहिती काढू लागलो असतानाच त्यावर आतापर्यंत त्या मंदिरावर झालेले आतंकी हल्ल्यांची त्यात मेलेल्या लोकांची माहिती दिसली!

हा कशाचा संकेत होता?
 मनावरचा ताण आणखीनच वाढला.

बॅगेत गरजेपुरतेच नेमके कपडे कोंबले पण अनुरागमुळे शेवटी मला निघायला उशीर झालाच!

 गाडी सुटेल की काय या ताणात 50 किमी दूर जुन्या दिल्ली स्टेशनाकडे निघालो मेट्रोमधून निघालो.

देव भलं करो बाप्पा त्या
मेट्रो वाल्यांचं!
 ''मत रो जब है मेट्रो'' हा किताब मी
''मेट्रोच्या नावानं चांग भलं'' म्हणत वाहिला.

अत्यंत वेगाने मी जुन्या दिल्लीच्या  गर्दी गोंधळात #धक्का(बुक्की नाही)देत आपल्या फलाटाकडे धावू लागलो.

 कारण मी जर धक्काबुक्की केली असती तर त्या दिल्लीच्या आडमुठ्या लोकांनी मला तिथेच उताणा पाडुन मला लाथा बुक्क्यांनी तुडवला असता.

खाली फलाटावर ' शालीमारएक्सप्रेस' नुकतीच स्नान करून  शुचिर्भूतावस्थेत उभी होती.
आणि मी हुश्श केलं.

मी पुन्हा एकदा आनंदात माझ्या बोगीचं माप ओलांडलं. बहुतेक मी वेळेत पोहचल्याचं पाहुन गाडीने एक जोरदार सुस्कारा टाकला आणि दुपारी ३:५०ला प्रस्थानाचा भोंगा वाजवला.

लवकरच  खिडकीबाहेर अनेक घरं..घरा बाहेर खाट टाकलेली..गाई म्हशी..भिंतींवर शेणाच्या गोवऱ्या थापलेल्या..हुक्का ओढत बसलेले माणसं..बायकांचे ठराविक कपडे दिसताच #हरियाणातून चाललोय हे कळायला वेळ लागला नाही!

रात्री कधीतरी गुंगीत पठाणकोट  आल्याचं ऐकु आलं.1965 च्या युद्धात सर्वात जास्त झळ बसलेलं हे शहर म्हणुन आठवण झाली.

रात्रभर मी वरच्या बर्थवर मोठी बॅग सांभाळत देहाचं मटकुळं करून थंडीत कुडकुडत झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होतो.
बऱ्याच उशीरा रात्री कधीतरी झोप लागली होती.

 पहाटे सव्वा़पाचला "जम्मु आँ गया।"ची लोकांची बांग ऐकू आली! आणि मी रोमांचित झालो! तरिही काहीशा गुंगीतच जड डोक्याने उठलो.

पहाटेच्या काळोखात जम्मूच्या स्टेशनाबाहेर येताच 'कट्रा..कट्रा..' गाडीवाल्यांचे शब्द कानी पडताच माझ्यात उत्साह संचारला.
आणि 'तावी' नदीचे उगवत्या सूर्यासोबत दर्शन घेत गाडी पूर्ण भरल्यावरच एकदाची जम्मूबाहेर पडू लागली.

 आयुष्यात पहिल्यांदाच NH1 वरून जात होतो. मध्येच श्रीनगर..लेह ची पाटी दिसताच काळजात एक नाजुक कळ उमटली.

 थोड्या वेळाने हायवे सोडून गाडी डावीकडे कट्राला जाणाऱ्या कच्च्या घाटाच्या नागमोडी रस्त्यावरून जाउ लागली.

रस्त्यात असंख्य लाल तोंडाची माकडं रस्त्यावर दिसलीत.
आणि एक गोष्ट विलक्षण जाणवली की काही लोकं अगदी त्या गाडीचा कंडक्टरसुद्धा पाव,ब्रेड रस्ताभर माकडांसाठी टाकत होते.

 माकडांनाही याचा सराव असावा. कारण तेही प्रत्येक गाडीच्या खिडक्यांकडे  आशाळभुत नजरेने पाहायचे.दोन पायावर मध्येच उभे राहुन चालायचे.

मला त्या लोकांची ही गोष्ट फार आवडली.
त्यांच्या या कृतीमुळे माकडांचं गावात येण्यापासुन काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होत असावं शिवाय त्यांना त्या निर्मनुष्य ठिकाणी अन्नही मिळत होतं.

मीही वापस जाताना माकडांसाठी ब्रेड घ्यायचं ठरवलं.

कटऱ्याला साडे नऊला पोहोंचलो.

एका मोठ्या राजघराण्यात आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख घालवण्यापेक्षा घराण्यातुन बाहेर पडुन कोणी छोटंसं का होइना स्वत:चं राज्य स्थापन करावं,स्वत:चं नाव, ओळख निर्माण करावी तसा  #हिमालयाचाच मुळचा कुटुंबीय असलेला #त्रिकुटपर्वत आपल्या उंच रांगासहित समोर ताठ बाण्याने उभा होता.
ते दृश्य पाहताच मला प्रचंड आनंद झाला.

मी त्याला नीट बघत होतोच तर पन्हाळ्याला सिद्दीजौहरने घातलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती हॉटेलच्या एजंट्सचा वेढा पडला!

बस्स…

आता वैष्णो देवी आणि माझ्यामध्ये तो प्रसिद्ध १५ किमीचा रस्ता आणि हा माझ्याभोवती पडलेला हा सिद्दी जौहरांचा वेढाच तेवढा होता.

देवीने मला अडथळे दूर करत इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे मी सुद्धा दर्शनासंबंधी एक कडक संकल्प केला.

 पण पुढे लोकांचं बोलणं ऐकून माझा 'तो' संकल्प मी पूर्ण करू शकेन की नाही ही दाट शंका दाटून आली.

-Abhijeet panse

अति उत्साहात एक कठीण संकल्प केला! चलो बुलावा आया है! वैष्णो देवी भाग 4

*चलो बुलवाआयहै प्रवासवर्णनभाग 4

अति उत्साहात एक कठीण संकल्प केला

मी पर्वत रांगा नीट बघत होतोच तर पन्हाळ्याला सिद्दी जौहरने घातलेल्या पक्क्या वेढ्याप्रमाणे माझ्या अवतीभोवती हॉटेलच्या एजंट्सचा वेढा पडला!

बस्स…

आता वैष्णो देवीच्या आणि माझ्यामध्ये तो प्रसिद्ध १५ किमीचा रस्ता आणि हा माझ्याभोवती पडलेला सिद्दी जौहरांचा वेढाच  होता.

देवीने मला अडथळे दूर करत इथपर्यंत आणलं होतं. त्यामुळे मी सुद्धा दर्शनासंबंधी एक कडक संकल्प केला. पण पुढे लोकांचं बोलणं ऐकून माझा 'तो' संकल्प मी पूर्ण करू शकेन का ही दाट शंका दाटून आली.

त्या हाॅटेल एजंट्सच्या च्या जबरदस्त वेढ्यात मी पुरता अडकला होतो.बाहेर पडायला रस्ताच सापडत नव्हता.आणि शेवटी मी गड हरलो.कारण माझा बाजीप्रभु माझ्या सोबत नव्हता.

एका एजंटने माझा पिच्छा शेवटपर्यंत पुरवला आणि तो मला घेउन अनेक गल्ली बोळाच्या भुलभुलैय्यातुन जात
एका सराया प्रकारातील(चाळ) जुन्या कोंदट लाॅजवर घेउन आला.

'अस्वच्छ' हा शब्दही मी म्हणु शकत नाही.कारण त्यातही  'स्वच्छ' हा शब्द येतो.
इतकी ती घाण  खोली होती.वर येतानाच खाली बेसमेंटला साचलेल्या पाण्यातुन रस्ता काढत आलो होतो.

बनारसमधल्या रस्त्यांवरील पांडे,चौरोसिया हलवायांच्या जिलेबी काढण्याच्या कढईवर आणि धोतरावर जसा काळा तवंग साचला असतो तसा त्या खोलीतील ओल्या गाद्यांवर साचला होता.

स्वच्छतागृहात तर आनंदी आनंदच होता. अपेक्षेनुसार नळाला पाणी नव्हतं.
स्वच्छतागृहात गेलेला प्राणी आणखी अस्वच्छ होउनच बाहेर येईल अशी परिस्थिती होती.

मी तिथे थांबण्यासही सरळ नकार दिला.पण अजुन हाॅटेल शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिथेच खाली आॅफिसमध्ये सॅक ठेवण्याचं ठरवलं.

 त्या उत्तरेकडील गावातील प्रचंड थंडीत खालुन कोमट पाणी आणुन स्नान करुन एकदाचा मी त्या कोंदट सरायामधुन बाहेर पडलो आणि स्वच्छ उबदार उन्हात बाहेर आलो.

पोटात पडलेला खोल खड्डा एका पंजाबी हाॅटेलातील कुलचा,छोले आणि वाडगाभर दह्याने काठोकाठ पुर्ण बुजवला.

त्याच हाॅटेलच्या एका स्टाफ प्रमुखाला;वर पोहचायला किती वेळ लागतो..कसा व किती रस्ता आहे वगैरे जुजबी माहिती विचारली असता तो सुरवातीला म्हणाला,''आप साउथ इंडियन हो ना?मै भी साउथसेही ही हु!''

ही अडचण मला नेहमी जाणवते.
 उत्तर भारतात मला  दक्षिणेकडला समजतात.तर तिकडे दक्षिणेत तामिळनाडुत उत्तर भारतीय म्हणुन नाक मुरडले जाते.

त्याने सांगितलं की आता चालणं सुरू केलं तर दुसऱ्या दिवशीच मी परत येऊ शकेल .वर 'भवन' पर्यंत म्हणजे गुहेपर्यंत जायला 8  तास लागतात वगैरे सांगितलं.
त्यामुळे आता झोपुन प्रवासाचा शीण घालवावा आणि रात्री चालायला सुरवात करावी असा मौलीक अनुभवी सल्लाही दिला.

दर्शनाची 'पर्ची' काढावी लागते हे कळल्याने मी जवळच असलेल्या पर्ची काउंटरला गेलो.तिथे एका गोड मुलीने ''नाम और कहा से आए'' वगैरे विचारत फोटो काढत मला पर्ची दिली.

आता मी पुर्णपणे सज्ज झालो होतो माता वैष्णवी देवी दर्शनाला!

दोन किमी चालत गेल्यावर एक मोठं संगमवरी कमान असलेल्या महाद्वारापाशी पोहचलो.इथुनच तपासणी झाली की लोकं चालणं सुरू करतात.

समोर शिखरावर थोडंफार बर्फ असलेल्या पर्वत रांगा दिसत होत्या.

मी सर्वप्रथम पायरीवर डोकं टेकवुन मनापासुन धन्यवाद केलं.

आणि मी माझा तो संकल्प केला.
मी स्पष्ट शब्दात म्हटलं की देवीचं दर्शन होइपर्यंत संपुर्ण पंधरा किमी मी कुठेही खाली बसणार नाही !
कुठेही कशावरही बसुन विश्रांती घेणार नाही.

मी खुपच आनंदात (अति)उत्साहात होतो त्यामुळेही कदाचीत असा संकल्प केला असेल.
पण आता संकल्प केला होता.

और एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो फिर एरवी मै वैसे सबकी सुनता हुं!लेकिन उस दिन किसीकी नही सुनी!खुद की भी नही!

सकाळी साडे अकराला मी चालणं सुरू केलं.जवळच घोड्यांचं काउंटर होतं.घोडा करण्यासाठी घोडेवाले मागे लागत होते.पण या घोड्याने आधीच संकल्प केला होता पायी जाण्याचा!!

आणि एरवीही मी घोड्यावरुन प्रवास करण्यासारखे पोचट प्रकार केले नसतेच!
पायाची रग जिरवायला याहुन चांगली संधी कधी मिळणार!

पण....अहंकाराचा बंगला कोसळतोच!
माझाही चालण्याच्या संकल्पाचा अहंकार देवीने मोडला!

पोटातील कुलचा..छोले..आणि उंटासारखं घशापर्यंत प्यायलेलं पाणी आता शिक्षा ठरू पाहत होतं.पोट टरारून फुगलेलं..वरून उन्ह..प्रवासात रात्री न झालेली झोप..चढा रस्ता..
मला मळमळायला लागलं..
जीव कासावीस व्हायला लागला.
अचानक कंबर,पाठ प्रचंड दुखायला लागली.
एक पाउलही टाकणं अशक्य झालं.

पोटातील छोले आणि इतर पदार्थात द्वंद्व युद्ध सुरू झालं होतं बहुतेक.चण्यांनी आपलं आकारमान वाढवुन अनधिकृतपणे पोटात जागा व्यापली असल्याने त्यांच्यात हाताघाईची लढाई सुरू होती.

आता ही लढाई अधोमार्गाला प्रेरित करते की उर्ध्व मार्गाने बाहेर येउन ते शहीद होतात याचा जालीम ताण मला येउ लागला.

माझ्या शरीररूपी टीमच्या विकेट्स भराभर पडु लागल्या!ओपनर्स,मिडल आॅर्डर तर कधीच कोसळली होती.

मी हळुहळु एकेक पाउल टाकत चालत राहिलो.खाली बसुन विश्रांती घ्यावी असं प्रकर्षाने वाटत होतं.तथाप ती गरज होती.
पण संकल्प केलेला...

पाठ,कंबर भयंकर दुखायला लागल्याने मधुनच कंबरेत वाकुन हात गुडघ्यावर ठेवत डोळे मिटुन काही क्षण श्वास घ्यायचो.
पुन्हा चालणं सुरू करायचो.
अद्याप दोन किमीही चाललो नसेल.

पण लवकरच डोळ्यांसमोर अंधार दाटु लागला..घामाने चिंब भिजलो.जॅकेट काढुन टाकलं.

आता तर एक पाउल टाकणंही अशक्य झाल होतं.कुठल्याही क्षणी मी खाली कोसळुन पडेल असं वाटु लागलं.आणि मग मात्र मी घाबरलो.

घरी न सांगता इथे इतक्या दुर आलो होतो.

जवळच रस्त्याच्या डाव्या बाजुला एक बकुळीच्या झाडाशी साधर्म्य असलेलं एक ठेंगणं झाड होतं.मी हळुवार पावलं टाकत तिथपर्यंत गेलो.आणि चक्कर येउन पडु नये म्हणुन त्याची एक जाडी फांदी डाव्या हाताने घट्ट पकडुन ठेवली.

तिथेच एक लोखंडी बाकडंही होतं.त्यावर बसण्याचा मोह मी प्रचंड प्रयत्नपुर्वक टाळत होतो.

त्या झाडाच्या सावलीत डोळे मिटुन हळु लांब श्वास घेत राहिलो....शरीर थरथरत होतं..

वर 15 किमी चालत जाणं आणि दर्शन आता एक अशक्यप्राय गोष्ट झाली होती..

-अभिजित पानसे

जय माता दी ,वैष्णो देवी प्रवास वर्णन भाग 5

प्रवासवर्णन अंतीमभाग

सर्वांग ठणकत असताना वैष्णवी देवी दर्शन झाल्यावर  दर्शन मी खाली बसणार तर भैरवनाथ शिखरला जायचं आठवल्याने तिकडे निघालो.हा खडा तीन किमी चा रस्ता सरळसोट ६ किमी रस्त्याच्या बरोबर आहे. संपुर्णपणे शरीर पिळवटुन टाकतो.

पोळ्यातील बैलासारखा नाकाने फुस फुस करत दम टाकत शेवटी एकदाचा शिखरावर जाउन पोहचलो!आणि जे अप्रतीम दृश्य दिसलं ते शब्दातीत होतं.

खाली कटरा गावातुन चालणं सुरू करताना वर उंचच उंच पर्वत शिखरे दिसतात ,ते या भैरवशिखरावर आल्यावर व्यक्तीच्या डोळ्यांच्या समांतर येतात.तिथुन संपुर्ण परिसर दृष्टीपथात येतो.पलिकडे काश्मिर खोऱ्याकडे जाणारे डोंगर..अलिकडे कटरा गाव..वाहणारी नदी.आजूबाजूला जंगल..जिकडे बघावं तिकडे पर्वत माळा..लोकांचे कँमेरे सरसावु लागतात.त्या अजस्त्र पर्वतमाळांना आपल्या प्रमाणेच क्षुद्र कँमेरात चित्रबंद करू पाहण्यासाठी!.

भैरवनाथाचं दर्शन घेतलं .दुपारचे साडे पाच वाजले होते. माझा संकल्प पुर्ण झाला होता.आणि मी माझ्या पायांना ,पाठीला,शरीराला,शरीराच्या आतील चैतन्याला धन्यवाद म्हणत जमिनीला कृतज्ञतेच्या भावनेतुन नमस्कार करून एकदाचा खाली बसलो.
हुश्श....!! खुप खुप बरं वाटलं.आराम मिळाला.

सुर्यास्त होउ लागला.नागमोडी वाहणारी नदी क्षितिजाला स्पर्शत होती तिथेच सुर्य ही विसावत होता.जणु भगव्या सुर्यबिंबातून नदी उगम पावतेय भासत होतं.

पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेण्यात मग्न होती.त्यामुळे काही क्षणात सुर्य दिसेनासा झाला.

या जागेवरून सूर्योदय ही खूप सुंदर असा विचार मनात आला.
 सुर्यास्त झाला तशी अचानक इतक्या वेगाने थंडी वाढली की सहन करणं अशक्य होउन बसलं.खाली वैष्णो देवीचं मंदीर लाईट्स ने उजाळुन उठलं होतं.तिथुन नमस्कार करुन मी पळत खाली निघालो.

उतरत्या रस्त्यावर सलग १८ किमी एका लयीत धावत खाली उतरलो.जेव्हा त्या गल्लीबोळातील हॉटेल शोधुन काढत बँग उचलुन बाहेर आलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.फक्त दोन ते अडीच तासात मी न थांबता धावत पोहचलो होतो.

पुन्हा काही खाण्यासाठी परत त्याच हॉटेलला गेलो तो सकाळचाच दाक्षिणात्य मॅनेजर भेटला. त्याला वाटलं त्याने सांगितल्या प्रमाणे मी आता निघतोय वरती चालायला..
त्याला जेव्हा कळलं मी दर्शन करून परत ही आलोय तेव्हा खूप आश्चर्यचकित झाला.

बाहेर येऊन बघितलं तर अजून एक सुखद धक्का चौकात हरियाणा सरकारची कटरा ते दिल्ली बस लागलेली होती.पूर्ण बस रिकामी आणि स्वच्छ होती. सकाळी 10 ला पोहचलो होतो आणि रात्री 10 ला 30 किमी चालत दर्शन आटोपून परत ही निघालो होतो.

 मी निवांत पूर्ण सीटवर झोपलो.जाग आली ती सकाळी हालचाल जाणवल्याने.मी उठून बसलो तर बघितलं संपूर्ण बस सरदारजींनी भरलेली होती.
 काही लोक उभेही होते!पण कोणीही मला उठवलं नव्हतं.मला फार अवघडल्यासारखं वाटलं.बाहेर बघितलं, संपुर्ण रस्ता धुक्याने दिसेनासा झाला होता.स्वच्छ काळाशार NH1 वरून वेगाने बस आणि इतर गाड्या जात होत्या. अंबाला नुकतंच सोडलं होत.दुपारी 1 वाजता दिल्ली काश्मिरी गेट बस स्टॅन्डला बस थांबली .आणि पहिल्या वहिल्या उत्तरेकडील प्रवासाचा शेवट झाला.

त्याच्या पुढच्या वर्षी 13 फेब ला पुन्हा एकदा वैष्णो देवीला जाण्याचा योग आला. दोन दिवसांनी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच होती.यावेळी कटराला ओळख झालेल्या दिल्लीच्या 2 मुलींसोबत संपूर्ण ट्रेक झाला.मागच्या वेळी सकाळी चालत गेलो असल्याने यावेळी रात्री चालण्याच ठरवलं होतं.

उत्तरेकडील थंडी हुकूमशाहा असते तिच्यापुढे झुकावंच लागतं. हे पहिल्यांदा अनुभवलं.अंगावर तीन तीन जॅकेट्स असूनही ते बर्फासारखे थंड पडले होते.रात्रभर आम्ही चालत होतो.काही किमी तर संपुर्ण रस्त्यावर फक्त आम्ही तिघेच होतो!रात्री 2 वाजता मंदिरापशी पोचलो.

 यावेळी आश्चर्यचा मोठा सुखद धक्का बसला.मूळगुफेचा रस्ता उघडा केला होता. मला इतका प्रचंड आनंद झाला होता की मागच्या लोकांना की पुढे जाऊ दिलं आणि मी एका ठिकाणी उभा राहून संपूर्ण गुफा काहीवेळ न्याहाळत राहिलो!!खूप सुंदर पिवळ्या दगडाची गुफा आहे.खाली बर्फासारखं गार पाणी!वैष्णवी मातेचं दर्शन झालं!मागच्या वेळीची गुफेतून जाण्याची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती.

बाहेर येऊन पाय जोड्यांमध्ये घालेपर्यत आपल्यला पाय आहेत याचा विसर पडला होता इतके थंडीने बधीर झाले होते!
काहीजागी उबेसाठी धगधगते निखारे मोठ्या भांड्यात ठेवले होते.लोक तिथे हात पाय शेकत होते.

आम्ही सकाळची वाट न बघता भैरवनाथ ला निघालो.गुफेतून दर्शन झाल्याने उत्साह संचारला होता.रस्त्यात  मुद्दामून त्या हरियाणवी ऍक्सेन्ट मध्ये गंमती सांगत आम्ही चाललो होतो. सोनम ही मूळची हरियाणाची असल्याने ऑनर किलिंग च्या खऱ्या गोष्टी सांगितल्या. हिंदी मुविज मराठी ऍक्टर्स..मुविज यावर ही मी बोललो.

त्यांना तीन चार मराठी वाक्य बोलायला लावलेच!!
मग सोडतो की काय!!!!

भैरवनाथ ला पहाटे पाच वाजता पोचलो! रस्त्यात बरेच ठिकाणी खूप बर्फ पडला होता!

 तिथेही निखाऱ्यांची सोय केली होती.जेथुन आधीच्या वर्षी सूर्यास्त बघितला होता.त्याच जागेवरून पलीकडच्या शिखराआडून पुढच्याच वर्षी 14 फेब्रुवारीला सुंदर सूर्योदय बघितला!
सूर्य पूर्व क्षितिजावर प्रकट होत होता.
सूर्याच्या केशरी किरणांनी संपुर्ण खोरं ..पर्वत शिखरे न्हाऊन निघाले होते..

(समाप्त)